'स्त्रीशक्ती हीच सृजनाचा आधार; पाश्चात्त्य संस्कृतीचे आंधळे अनुकरण नको' – डॉ. मोहन भागवत

विश्व मांगल्य सभेच्या दक्षिण भारत प्रबोधन बैठकीत ‘युगानुकूल मातृत्व’ विषयावर मंथन; हैदराबाद येथे दोन दिवसीय कार्यक्रम संपन्न
भाग्यनगर (तेलंगणा):
विश्व मांगल्य सभेच्या (संस्कार, सामर्थ्य, सदाचार, सेवा) वतीने २५ आणि २६ जुलै दरम्यान हैदराबाद (भाग्यनगर) येथील 'युसूफगुडा NI-MSME' आणि 'सेवालाल बंजारा भवन' येथे आयोजित दोन दिवसीय 'दक्षिण भारत प्रबोधन बैठक' अत्यंत उत्साहात पार पडली. या बैठकीच्या समारोप सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी 'युगानुकूल मातृत्व' या विषयावर उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, "मातृत्व हा मानवी अस्तित्वाचा, लालनपालनाचा आणि सृजनाचा मुख्य आधार आहे. भारत ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असल्याने आपल्या देशातील मातृत्वाची परंपराही तेवढीच अथांग आणि प्राचीन आहे." कोणत्याही विषयावर बोलताना अनुभवापेक्षा मोठा कोणताही अधिकार नसतो, असे सांगत, "अशा अथांग अनुभव असलेल्या मातांसमोर मला बोलायला सांगणे, ही माझीच एक प्रकारे परीक्षा आहे," अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
- 'युगानुकूल' चर्चेची गरज
गेल्या काही शतकांत भारत परकीय राजवटीखाली राहिल्यामुळे परकीय संस्कृतीच्या प्रभावातून आपल्या परंपरा आणि दैनंदिन जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या बदलत्या काळात 'युगानुकूल मातृत्व' या विषयावर सखोल चर्चा आणि मंथन होणे अत्यंत गरजेचे व कालसुसंगत ठरते, असे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.
कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी पती-पत्नीच्या परस्पर जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. विवाहसंस्था ही कुटुंबाचा पाया असून, कौटुंबिक मूल्ये ही त्यागाच्या भावनेवर टिकून असतात. समाजात स्त्री आणि पुरुष प्रत्येक क्षेत्रात समान आहेत. मात्र, स्त्रियांकडे 'सृजनाची' एक अद्वितीय आणि विशेष शक्ती आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीला 'शक्तीचे रूप' मानले गेले आहे, त्यामुळे बदलत्या काळात स्त्रियांना दुय्यम स्थान देणे अजिबात योग्य किंवा स्वीकारार्ह नाही, असेही सरसंघचालक म्हणाले.

- पाश्चात्त्य संस्कृतीचे आंधळे अनुकरण टाळा
समाजाची विचारसरणी काळानुसार बदलणे स्वाभाविक आहे. मात्र, बदल स्वीकारताना आपण पूर्णपणे प्राचीन काळात मागे जाऊ शकत नाही; त्याच वेळी पाश्चात्त्य संस्कृतीचे आंधळे अनुकरण करणेही समाजासाठी घातक आहे, असा इशारा सरसंघचालकांनी दिला.
- विविध सत्रांचे आयोजन व प्रमुख उपस्थिती
या दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत रविवारी हैदराबाद येथील 'कोमाराम भीम आदिवासी भवन' येथे 'युगानुकूल मातृत्व' या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
या प्रबोधन बैठकीत खालील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले:
- श्री जितेंद्रनाथ महाराज जी (संस्थापक, विश्व मांगल्य सभा)
- डॉ. वृषाली जोशी (राष्ट्रीय संघटन मंत्री)
- प्रशांत जी (अखिल भारतीय मार्गदर्शक)
- नलिनी हावडे (राष्ट्रीय अध्यक्षा)
- सूरज जी डामोर (राष्ट्रीय उपाध्यक्ष)
- भगवती जी बालद्वा (स्वागत समिती अध्यक्षा)
-श्रुती बोड्डूपल्ली (सहसचिव)
या बैठकीत तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या दक्षिण भारतातील राज्यांमधून सुमारे १५० हून अधिक महिला प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.