कारगिल विजय दिवस हा 1999 साली कारगिल युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ दर वर्षी 26 जुलैला साजरा केला जातो. पाकिस्तानची ही खोडसाळ वृत्ती राहिली आहे की काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करायचा आणि भारताविरुद्ध कट-कारस्थान करायचं... आणि समृद्ध भारतातलं राजकीय वातावरण दूषित करायचं. पण दरवेळी ही पाकिस्तानची खेळी अयशस्वी होते हे पाकिस्तानला समजत नाही. पाकिस्तान हा इतिहासातून धडे घेत नाही आणि त्याची परिणती ही पाकिस्तान देश म्हणून अस्थिर होण्याकडे होते. त्याचंच एक उदाहरण म्हणजे 1999 ला झालेलं कारगिल युद्ध! कारगिल युद्ध समजण्याआधी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. आपल्या सगळ्याना हे परिचित आहे की ब्रिटिशानी 1947 ला भारताची फाळणी केली आणि भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण केले. यावेळी भारतातल्या संस्थानाना पर्याय दिले गेले की तुम्ही एकतर भारतात विलीन व्हा अन्यथा पाकिस्तानात विलीन व्हा. आणि यानुसार जम्मू आणि काश्मीरचे राजे असलेल्या हरीसिंह यांनी आपण भारतात विलीन होत असून ‘इन्स्ट्रुमेंट ऑफ अॅक्सेशन या करारावर 26 ऑक्टोबर 1947’ ला सह्या केल्या. पाकिस्तानला वाटलं की जम्मू आणि काश्मीर राज्य हे पाकिस्तानात विलीन होईल, पण तसं न घडल्याने पाकिस्तानचा तीळपापड झाला. आणि पाकिस्तानने भारतावर हल्ला केला... वर्ष होतं, 1947. अर्थातच पाकिस्तानला या युद्धात हार पत्करावी लागली.
काश्मीर काहीही करून भारताकडून हिसकवून घ्यायचं या एकाच द्वेशाने पाकिस्तानला पछाडलं होतं. 1965 ला काश्मीर बळकवण्याच्या हेतूने पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जनरल आयुब खान यांनी भारताबरोबर असंच युद्ध छेडलं. आयुब खान यांनी इसकांदार मिर्झा या पाकिस्तानच्या तत्कालीन अध्यक्षांकडून सत्ता आपल्या हातात घेतली. देशात मार्शल लॉं लागू केला. आयुब खान इतके गाफील होते की त्यांना वाटलं भारतीय लोक कमजोर आहेत आणि म्हणून आपल्याला भारताबरोबरचं युद्ध जिंकता येईल काश्मीर घेता येईल. पण त्यांच्या या मनसुब्यानवर पाणी फेरलं आणि भारताने 1965 ला युद्ध जिंकलं. नंतर अश्याच दुसऱ्या एका अतिआत्मविश्वास असलेल्या जनरल याया खान यांनी 1971 ला परत भारतावर आक्रमण करून काश्मीर परत मिळवण्याचा निर्धार जाहीर केला. अर्थातच भारताने पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांग्लादेश या राष्ट्राची निर्मिती केली. पाकिस्तानची सैन्यदल इतकी अंधारात होती की पाकिस्तानच्या तत्कालीन नौसेनेच्या प्रमुखाना भारताने हवाई हल्ला केला आहे हे पाकिस्तानच्या रेडियो वरुन समजलं.
पाकिस्तान 1947,1965 आणि 1971 या तीनही वेळी भारताबरोबर युद्ध हरूनही गतकाळातल्या चुकांमधून शिकला नाही आणि 1999 ला भारताबरोबर कारगिल युद्ध केलं. या घटनेलासुद्धा एक पार्श्वभूमी आहे. पाकिस्तानी सैन्यातला ले. कर्नल जावेद अब्बास याने तीन वर्ष अभ्यास(?) करून 1990 ला ‘इंडिया – अ स्टडी प्रोफाइल’ नावाने त्याचा अहवाल प्रसिद्ध केला. यात त्याने भारताबरोबर युद्ध केलं जाऊ शकतं आणि भारतातल्या देशांतर्गत प्रश्नांचा फायदा उचलून भारतीय सैन्य दलांवर ती संखेने मोठे असली तरीसुद्धा त्यांच्यावर नियंत्रण आणलं जाऊ शकतं, आणि भारताचे तूकडे केले जाऊ शकतात असा निष्कर्ष काढला. या निष्कर्षाने तत्कालीन जनरल मुशर्रफ भलतेच खुश झाले. पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाने याआधी दोन वेळा भारतावर हल्ला करण्यास नापसंती दर्शवली होती. पण नवाज शरीफ पंतप्रधान असताना जनरल मुशर्रफ यांनी या वेळी संधी साधली. कारगिल भागात पाकिस्तानने युद्धाची योजना आखली. या कारगिल युदधमागे पाकिस्तानच्या मुशर्रफ मिळून एकूण तीन लष्करी अधिकाऱ्याचा हात होता. ले. जन. मोहम्मद आजिज खान, ले. जन. मेहमुद खान आणि मे. जन. जावेद हसन. या हल्ल्याचा उद्देश श्रीनगर आणि लेह यांच्यामधला राष्ट्रीय महामार्गावरचा पुरवठा खंडित करणे हा होता, म्हणजे भारतीय सैन्यदल याना प्रतिकार करत येणार नाही किंवा भारतीय सैन्यदल प्रतिहल्ला करू शकणार नाही, आणि मोठा उद्देश अर्थातच कारगिल वर चढाई करून तिथल्या जागांवर कब्जा मिळवणे हा होता. काश्मीर तर केंद्रस्थानी होताच. आधी कारगिल हा भाग, पाकिस्तानने गिळंकृत केला होता. पण 1965 आणि 1971 च्या युद्धानंमद्धे तो भारताने परत मिळवला. आता हा भाग परत भारताकडून हिसकावून घ्यायचा असा मुशर्रफ यांचा उद्देश होता. भारताने तत्काळ ‘ऑपरेशन विजय’ सुरू केलं आणि 30,000 सैनिकाना मोबीलाईझ केलं. 13 जून 1999 ला भारतीय सैन्यदलाने तोलोलिंग शिखर ताब्यात घेतलं. 20 जूनला 1999 ला पॉइंट 5140 परत ताब्यात मिळवला. 4 जुलै 1999 ला टायगर हिल पाकिस्तानकडून परत घेतले. अश्या प्रकारे बटालिक भागातले सगळी शिखरे भारतीय सैन्याने काबिज केली. भारतीय सैन्याच्या 14 व्या रेजिमेंटने ताकदवान बोफोर्स तोफानचा हल्ला चढवला आणि भारतीय हवाई दलाने LOC वर हल्ला चढवला. सुरवातीला भारतीय सैन्यदलांना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याची व्याप्ती कळली नाही. पाकिस्तानने सुरवातीला हा हल्ला पाकिस्तानी सैन्याने केला नसून मुजाहिदीन म्हणजे अतिरेक्यानी केला असं दर्शवलं. 3 मे 1999 ला पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली आणि कारगिल युद्ध सुरू केलं. नवाज शरीफ म्हणाले त्यांना युद्धाबद्दल पूर्वकल्पना नव्हती. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री यांनी तर सांगितले की त्यांना 17 मे 1999 ला पाकिस्तानने भारतावर आक्रमण केला आहे हे कळले. इकडे मुशर्रफ म्हणाले की त्यांनी हल्ल्याची कल्पना पंतप्रधान शरीफ याना आधीच दिली होती.
भारताच्या इतिहासतला हा एक मोठा आणि महत्वाचा कालखंड होता. कारगिल युद्ध हे कंनव्हेनशियल वॉरफेअर होतं. भारताने बहुमोल असे 527 अधिकारी आणि सैनिक या युद्धात गमावले. हा भारताने सांगितलेला अधिकृत आकडा आहे. पाकिस्तानने त्यांच्या सैनिकांची शव घायला सुद्धा नकार दिला होता. पाकिस्तानची परिस्थिति तर इतकी वाईट होती की भारताने पाकिस्तानी मृत सैनिकांचे शवविच्छेदन केले असता त्याना सैनिकांच्या पोटामध्ये गवत आढळले, म्हणजे पाकिस्तानी सैनिकाना खायला काहीच नव्हते तर त्यांनी गवत खाल्ले... पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर सैनिक मारले गेले, पाकिस्तानने त्याबद्दल अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध केली नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानुसार पाकिस्तानचे 700 सैनिक मारले गेले. तर नवाज शरीफ यांनी तर पाकिस्तानच्या मृत सैनिकांचा आकडा 4000 इतका सांगितला होता.
भारतात दरवर्षी 26 जुलैला कारगिल युद्धात मिळालेल्या विजयाचा आणि वीर मरण आलेल्या भारतीय सैनिकांप्रीत्यर्थ त्यांची आठवण म्हणून कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. अश्या या वीर जवानांचं स्मरण आपणही करूया, त्यांच्या सर्वोच्च बलिदानाची जाणीव ठेवूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया.
लेखन – निखिल कासखेडीकर
Nice article, aptly phrased, nikhil, goodone.
Sanjay Neve
27 Jul 2023 22:28
खूप छान माहितीपूर्ण लेख.
Manohar Puntambekar
27 Jul 2023 17:08
Very much informative article.
Thanks for sharing.
Yogesh Bhope
26 Jul 2023 16:20
कारगील vijayachi पार्श्र्वभूमी आणि पर्यवसान सगणारा अभ्यासपूर्ण लेख.
Bhaskar Girdhari
26 Jul 2023 16:11
उत्तम लेख. अभिनंदन
Suhas Deshpande
26 Jul 2023 15:35
तुम्ही लिहिलेल्या लेखाचे विवेचन उत्तम आहे. ....
प्राची कपाळे
26 Jul 2023 13:18
अतिशय मुद्देसूद आणि आटोपशीर विवेचन असलेला लेख. निखिल तुझे अभिनंदन!
हेमंत कासखेडीकर
26 Jul 2023 12:15