विकसित भारताची निर्मिती आर्थिक समृद्धीने नाही, तर संस्कारित नागरिकांच्या निर्मितीने होईल – दत्तात्रेय होसबाळे

“विकसित भारतासाठी शिक्षण” या विषयावर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मंथन
मुंबई, १ ऑगस्ट २०२६: विकसित भारताचे ध्येय केवळ आर्थिक समृद्धी किंवा भौतिक साधनांपर्यंत मर्यादित राहू शकत नाही; तर संस्कारित, चारित्र्यवान, आत्मविश्वासी आणि जबाबदार नागरिकांच्या निर्मितीतूनच हे ध्येय साध्य होईल. ज्ञान, कौशल्य आणि चारित्र्य या तिन्हींचा संगम म्हणजे शिक्षण, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी येथे केले.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) येथे 'शिक्षण संस्कृती उत्थान न्यास' आणि 'मुंबई विद्यापीठ' यांच्या संयुक्त विद्यमाने "विकसित भारतासाठी शिक्षण" या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे (संगोष्ठी) आयोजन करण्यात आले होते. होसबाळे पुढे म्हणाले की, आज ज्या संस्थांनी सादरीकरण केले आहे, त्या समाज आणि शैक्षणिक संस्थांच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण आहेत. आज संवादाचा अभाव निर्माण झाला आहे, हा संवाद आपल्याला पुन्हा प्रस्थापित करायचा आहे. आपण जे शिकलो आहोत आणि जसे शिकलो आहोत, तसेच आजच्या पिढीला शिकवू शकत नाही; त्यांच्या गरजेनुसार आपल्याला अध्यापन पद्धती विकसित करावी लागतील. राधाकृष्णन आयोगाच्या अहवालाच्या शेवटी लिहिले आहे की, आपण एखादी फॅक्टरी तयार करत नसून एक सभ्यता घडवत आहोत. त्यामुळे आपल्या देशाच्या संस्कृतीला साजेसे असे मानव आणि त्याच्याशी संबंधित सर्व पैलूंवर काम करण्याची गरज आहे. विकसित भारत २०४७ हा एक टप्पा आहे, तिथे पोहोचल्यावर हा प्रवास थांबणार नाही. प्रत्येक धोरण हे विशिष्ट कालखंडासाठी असते, आपल्याला आपल्या मुळांना न सोडता आवश्यकतेनुसार त्यात बदल करावे लागतील.
त्यांनी सांगितले की, विकसित भारताची निर्मिती केवळ आर्थिक समृद्धीने होणार नाही, तर संस्कारित, चारित्र्यवान, आत्मविश्वासी आणि उत्तरदायी नागरिकांच्या निर्मितीने होईल. भारतीय ज्ञान परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांच्या समन्वयावर आधारित शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी शिक्षण, उद्योग, शासन आणि समाजातील सर्व घटकांना विकसित भारत-२०४७ या राष्ट्रीय संकल्पाच्या पूर्ततेसाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.
या राष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, धोरणकर्ते, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, तंत्रज्ञान संस्थांचे संचालक, राज्यांचे शिक्षण व कौशल्य विकास मंत्री तसेच सामाजिक क्षेत्रातील विचारवंतांनी सहभागी होऊन विकसित भारत-२०४७ च्या निर्मितीत शिक्षणाची भूमिका यावर सखोल विचार-विमर्श केला.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलनाने झाली. स्वागताध्यक्ष म्हणून 'शिक्षण संस्कृती उत्थान न्यास'च्या अध्यक्षा डॉ. पंकज मित्तल यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० (NEP 2020) हे भारतीय शिक्षणाला जागतिक नेतृत्व प्रदान करण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व भागधारकांचा (Stakeholders) सहभाग आवश्यक आहे.
गतवर्षी केरळमधील कोची येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी यांच्या उपस्थितीत आयोजित 'ज्ञानसभेत' देशभरातील सुमारे ५०० प्रमुख शिक्षणतज्ज्ञांनी "विकसित भारतासाठी शिक्षण" या विषयावर मंथन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली यांसह विविध राज्यांमध्ये ज्ञानसभांचे आयोजन करण्यात आले. त्याच मालिकेचा पुढचा भाग म्हणून शिक्षण क्षेत्रासोबतच उद्योग आणि आर्थिक क्षेत्रातील नेतृत्वाला एकाच मंचावर आणून या संवादाचे आयोजन करण्यात आले.
चर्चासत्राच्या प्रास्ताविकात न्यासाचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी म्हणाले की, विकसित भारताचे ध्येय केवळ आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही. तर भारतीय ज्ञान परंपरा, नैतिक मूल्ये, पर्यावरणविषयक जाणीव, नागरिक कर्तव्यबोध आणि कौशल्यआधारित शिक्षणाच्या समन्वयातूनच हे ध्येय साध्य करता येऊ शकते. विकासाचा अर्थ केवळ भौतिक साधने नसून आध्यात्मिक आणि चारित्र्यसंपन्न मूल्येही तितकीच महत्त्वाची आहेत. सरकार आणि समाज हे एकाच गाडीचे दोन चाक आहेत, दोघांनी मिळून काम करण्याची गरज आहे.
चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात विकसित भारताच्या दिशेने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील निवडक संस्थांनी आपल्या नवकल्पनांचे आणि कार्याचे सादरीकरण केले. या सत्राचे अध्यक्षस्थान नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे एमडी आणि सीईओ आशिष चौहान यांनी भूषवले. दुसऱ्या सत्रात “विकसित भारत @२०४७ : शिक्षण, संशोधन, उद्योग आणि सामाजिक क्षेत्राची भूमिका” या विषयावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत शिक्षण, संशोधन, उद्योग आणि समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांना विकसित भारतासाठी अनिवार्य मानले गेले.
समारोपाच्या भाषणात सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे जी यांनी पुनरुच्चार केला की, भारतीय शिक्षण व्यवस्थेला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले राहून आधुनिक विज्ञान, नवसंशोधन (Innovation), संशोधन आणि कौशल्य विकासासह पुढे जावे लागेल. शिक्षण, उद्योग, शासन आणि समाज यांचे समन्वित प्रयत्नच विकसित भारत-२०४७ चा राष्ट्रीय संकल्प साकार करू शकतात. राष्ट्रीय चर्चासत्राची सांगता राष्ट्रगीताने झाली. यात देशभरातून सुमारे १०० विशेष आमंत्रित प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि विकसित भारताच्या निर्मितीत शिक्षणाची भूमिका अधोरेखित करणारे अनेक मोलाचे सल्ले व संकल्प मांडले.