शिक्षक दिनानिमित्त गावोगावी शाळा शाळांमध्ये विविध उपक्रम साजरे होत असतात. पण ईशान्य भारताच्या मणिपूर परिसरात 70 वर्षापूर्वी जिथे शाळा म्हणजे काय, हेच माहिती नाही अशा प्रदेशात शाळांची स्थापना करणारे ध्येयनिष्ठ शिक्षक शंकर दिनकर तथा भय्याजी काणे. या महाराष्ट्रीयन माणसाची फारशी कुणाला माहित नसलेली एक विलक्षण सत्यकथा शिक्षक दिनी "पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान" ने आयोजित केलेल्या एका विशेष समारंभात सर्वांसमोर येत आहे.
स्वयंप्रेरणेने हाती घेतलेल्या या स्वयंप्रकाशी कार्याला ध्येय, जिद्द आणि चिकाटीची जोड आहे. मणिपूरच्या आदिवासी जनजातींमध्ये भाषेचा अडसर दूर सारून प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत शिक्षणाचे बीज मोठ्या जिद्दीने रूजवणारे भय्याजी काणे यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२४ रोजी नाशिक येथे झाला. सांगली, पुणे, नाशिक येथे त्यांचे शिक्षण झाले. संस्कृत विषयात पदवीधर असलेल्या भैय्याजींनी काही काळ वायुदलात सेवा बजावली. पण मूळ पिंड शिक्षकाचा असल्याने त्यांनी पुन्हा शिक्षकी पेशा स्वीकारला. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड अशा अतिशय दुर्गम डोंगरी भागात भय्याजींनी शिक्षक म्हणून काम केले आणि त्याच वाटेने चालत मणिपूर ही त्यांची कर्मभूमी निश्चित ठरली.मुख्यतः उखरुल, चींगजिरोय, न्यू तूसोम हे भैय्याजींचे कार्यक्षेत्र होते.
शिक्षण हाच पर्याय
भारतीयांपासून काहीसा तुटल्यासारखा ईशान्य भारताचा हा प्रदेश आंतरराष्ट्रीय सीमारेषेने वेढलेला आहे. म्यानमार, चीन, बांगलादेशच्या सीमा अगदीच लागून असल्याने त्यांच्या भाषा, धर्म आणि संस्कृतीचा प्रभाव जास्त प्रमाणात आहे. या प्रदेशांची उन्नती साधायची असेल तर शिक्षण हाच पर्याय आहे, अशी भय्याजींना खात्री होती. सुरवातीला छोट्याशा खोलीत सुरू असलेल्या शाळा आता मणिपूर परिसरात भव्य इमारतींमध्ये भरत आहेत. इम्फाळ पासून काही अंतरावर प्रतिष्ठानची विद्यालये ७५ ते १६५ कि.मी.वर असून इथे अभ्यासाबरोबरच आरोग्य आणि सांकृतिक कला व क्रीडा यात विद्यार्थी प्रगती करीत आहेत. स्वातंत्र्यदिन कधीही साजरा न करणारे हे नागरिक आता १५ ऑगस्टला शाळेतल्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात.
ओजाशंकर
सीमेपलीकडून भारतात अवैध घुसखोरी करून मद्य, ड्रग्ज आणि बेकायदा शस्त्रास्त्रे यांच्या व्यवसायात अडकलेल्या युवकांना भय्याजींच्या शाळांनी प्रामाणिक जीवनाची वाट दाखवली. या परिसरात ओजा असा शब्द पूजनीय अर्थाने वापरला जातो. म्हणून मणिपूरच्या एका शाळेला ओजाशंकर असे नाव दिलेले आहे.
सहृदयी शिक्षक
शिक्षणाच्या मार्गाने प्रगतीच्या वाटेवर ईशान्य भारताला नेणारा भय्याजींचा भविष्यवेधी विचार सार्थकी लागलेला दृष्टीपथात येतो. एका शिक्षकांनी मनात आणले तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ते किती आभाळा एवढे कार्य ऊभे करूशकतात, याचे भय्याजी हे आदर्श उदाहरण आहेत. साने गुरूजी म्हणत असत, "शिक्षक हा सहृदयी हवा!" भय्याजी काणे हे असेच सहृदयी शिक्षक होते. जन्म शताब्दीनिमित्त त्यांच्या पुण्य स्मृतींना विनम्र अभिवादन!