'शास्त्र आणि शस्त्राची सांगड घालूनच राष्ट्र वैभवशाली होईल'
संगणक अभियंता निरंजन पेंढारकर; औंधमध्ये हिंदू संमेलन उत्साहात

पुणे, औंध, (प्रतिनिधी):
"हिंदू संस्कृती ही केवळ परंपरा नसून ती कर्तव्यदक्षता आणि विनम्रतेची शिकवण देणारी जीवनपद्धती आहे. समर्थ राष्ट्र उभारणीसाठी शास्त्राच्या ज्ञानाला शस्त्राचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संतांच्या मार्गदर्शनातून आणि रामायण-महाभारताच्या प्रेरणेतून शास्त्राला शस्त्राची जोड दिली, म्हणूनच हिंदवी स्वराज्य उभे राहू शकले. आजच्या काळातही सामाजिक समरसता आणि संघटन हीच काळाची गरज आहे," असे प्रतिपादन नामवंत संगणक शास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक अभ्यासक निरंजन पेंढारकर यांनी केले.
नागरस रोड वस्ती (औंध) येथील हिंदू संमेलन समितीच्या वतीने सोहो लॉन्स येथे आयोजित 'हिंदू संमेलनात' ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्त्या सीमा सिंह, ओंकार पांडे, हिंदू संमेलन समितीच्या अध्यक्षा सीमा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. मातृशक्तीचे संबोधन करताना सीमा सिंह यांनी 'पंचपरिवर्तन' विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, "सध्याच्या डिजिटल युगात कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. अशा वेळी भोजन, भजन, भाषा, भूषा आणि भ्रमण या पंचसूत्रीचा अवलंब करून कुटुंब संस्था वाचवणे आवश्यक आहे. नागरी शिष्टाचार, पर्यावरण रक्षण आणि स्वबोधाची जाणीव ठेवूनच आपण सामाजिक समरसता साधू शकतो."
संघाच्या कार्याचा आढावा घेताना ओंकार पांडे म्हणाले की, डॉ. हेडगेवारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघाची स्थापना केली. केवळ संघटना वाढवणे हा उद्देश नसून, व्यक्ती निर्माणातून समाजजागृती करणे आणि देशाला वैभवशाली बनवणे हे संघाचे ध्येय आहे. गोवा मुक्ती संग्राम असो वा युद्धाचा काळ, संघाने नेहमीच राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. कार्यक्रमाला औंधच्या माजी नगरसेविका सपना छाजेड, प्रतिष्ठित नागरिक मदनजी नागरस यांच्यासह विविध गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशालीजी व रितुजी यांनी केले, तर आभार प्रदर्शन नंदकिशोर खंडेलवाल यांनी केले. 'वंदे मातरम'ने कार्यक्रमाची सांगता झाली.
(छायाचित्र - निरंजन पेंढारकर)