
अहिल्यानगर, ता. १९ : "सध्याच्या बदलत्या जागतिक आणि सामाजिक स्थित्यंतराच्या काळात केवळ संकुचित विचार करून चालणार नाही, तर समाजातील प्रत्येक घटकामध्ये व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन रुजवणे ही काळाची गरज आहे. 'राष्ट्र प्रथम' ही भावना प्रत्येकाच्या मनात बिंबवून व्यक्ती निर्माणाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने वैभवशाली राष्ट्र उभारणीचे ध्येय साध्य होऊ शकते," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांनी येथे केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त द. अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने येथील पटेल मंगल कार्यालयात 'संघशताब्दी मंथन' या विशेष जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर द. नगर जिल्ह्याचे सहकार्यवाह दिनेश कारंडे आणि जिल्हा कार्यवाह हिराकांत रामदासी उपस्थित होते.
संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचे विश्लेषण करताना अग्निहोत्री म्हणाले, "संघाचे सक्षम नेतृत्व, हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान आणि तळागाळातील 'शाखा' या तीन भक्कम स्तंभांवर संघाची शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल उभी आहे. कुठल्याही संस्थेचे मूल्यमापन तिचे नेतृत्व, विचारसरणी आणि तळागाळातील प्रत्यक्ष कार्यावरून ठरते. संस्थापक डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांनी प्रसिद्धीपासून दूर राहत निरलसपणे संघटना उभारली. 'हा देश हिंदूंचा असून हिंदुत्वाच्या संघटनातून देशाला परमवैभवाकडे नेणे' ही संघाची स्पष्ट विचारधारा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणून त्यांच्यात राष्ट्रीय दृष्टिकोन रुजवण्याचे काम संघाने शतकभरात अविरत केले आहे."
या वेळी जिल्हा सहकार्यवाह दिनेश कारंडे यांनी संघ शताब्दीनिमित्त समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी 'पंच परिवर्तन' ही संकल्पना मांडली. यामध्ये सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्य या पंचसूत्रीची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- थेट संवादातून शंकांचे निरसन
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित प्रबुद्ध नागरिकांशी वक्त्यांनी थेट संवाद साधला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून वर्तमान सामाजिक परिस्थिती आणि संघाची भूमिका यावर चर्चा झाली. समाजात जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या विविध गैरसमजांचे आणि शंकांचे तार्किक निरसन या वेळी करण्यात आले. या बौद्धिक मंथन कार्यक्रमाला अहिल्यानगर शहरातील माध्यम क्षेत्रातील नामवंत पत्रकार, कायदेतज्ज्ञ, प्राध्यापक, विचारवंत तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स व प्रबुद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ कुलकर्णी यांनी केले. सामूहिक पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
--------