गुढी पाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
गुढी पाडवा..नव संकल्प दिन
भारतीय कालगणना : ऋषी मुनींची जगाला देणगी "
भारतीय सनातन हिंदू धर्माचे वैशिष्ट्य हे की, तो अनेकानेक विविधतेने नटलेला आहे. ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, महाकाव्ये ही जागतिक दर्जाची आहेत. शौर्य, चौसष्ठ कला, रसिकता, निसर्ग वैविध्य, सहिष्णुता,यासाठी भारताला जगात मान आहे. योग, विविध खाद्य संस्कृती, भाषा वैविध्य, संस्कृत व्याकरण हे सर्व आपण " विश्व गुरु " असल्याचे द्योतक आहे.
वेद, उपनिषदे, पुराणे, औषधी निर्मिती, वस्त्र ते शस्त्र निर्मिती, खगोलशास्त्र आणि बरेच काही आमची राष्ट्रीय संपत्ती आहे. विरासत आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे, आमच्या पुरातन सुवर्ण काळा पासून मुळात अचूक कालगणना आणि खगोलशास्त्र ही हिंदू ऋषी मुनी यांनी जगाला दिलेली प्राचीन तरीही अमूल्य अशी देणगी आहे. त्या भारतीय कालगणनेमुळे सूर्य नारायण आणि त्यांची ग्रहमाला यांचे अव्याहत चालणारे भ्रमण आजही अचूक कळते. तेच सूत्रबद्ध स्वरूपात " वार्षिक पंचांग " या सर्व परिचित पुस्तकात आपल्याला मिळते. हिंदू पंचांग आणि दिनदर्शिका पूर्ण विज्ञाननिष्ठ असल्याचा आपल्याला अभिमान हवा. यातून आपल्या सृष्टीचे गूढ सोडवण्यास मदत होते आणि दैनिक सूर्योदय, सूर्यास्त यांची अचूक वेळ देखील कळते. इतर सर्व ग्रह यांचे स्थान नेमके आज कोठे आहे हे पण कळते . मुख्यतः दिनमान, महिने, वर्ष आणि संवत्सर हे कळते. हे सर्व खगोलीय गणित आपल्या थोर ऋषी मुनी यांनी सूक्ष्म निरिक्षणातून नोंदवून ठेवले आहे. आधुनिक खगोल शास्त्र देखील ते मान्य करते.
विश्व गतीचे कालमान
श्रीसूर्य सिद्धांत मताने जगाची उत्पत्ती , स्थिती आणि लय अखंड घडत असते. ब्रह्मा, विष्णू , महेश , सूर्य , चंद्र , मंगळ , बुध , गुरु , शुक्र , शनी , राहू , केतू हे ग्रह तारे आपल्या वैयक्तिक , कौटुंबिक आणि राष्ट्रीय जीवनात सुख , समृद्धी , आरोग्य , स्थिरता , एकी प्रदान करत असतात . वर्षप्रतिपदे निमित्त त्यांचे भ्रमण , श्रद्धेने अभ्यासले तर त्याची शुभ फळे मिळतात असे आपले धर्म ग्रंथ सांगतात . श्रीमद्भगवत गीतेमध्ये सुद्धा आठव्या अध्यायात अव्यक्त परमेश्वराचे " अक्षय निधान " हे या वैश्विक कालचक्राचे पल्याड असल्याचे भगवंत सांगतात !! हे सांगताना ते वैश्विक घोर कालचक्राचे मोजमाप मांडताना अर्जुनास सांगतात की , " सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः । रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ ८-१७ ॥ अर्थ : ब्रह्मदेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्रही एक हजार चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्त्वतः जाणतात, ते काळाचे स्वरूप जाणणारे होत. ॥ ८-१७ ॥ अशी चतुर्युगाची वर्षे मिळून अहोरात्र निर्मिती करणाऱ्या सध्याच्या ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहे !! त्यातील पन्नास वर्षे झाली आहेत . ब्रह्मदेवाचे " एका दिवसात " चवदा मनु होतात . त्यातील एकेका मनुचे काळात , ४३ लाख २० हजार मानवी वर्षे मोजली जातात . एकूण ७१ महायुगे होतात . सध्या सातवे " वैवस्वत " मन्वंतर चालू आहे . त्यातील २७ युगे संपून २८ वे महायुग चालू आहे . ( युगे अठ्ठावीस विटेवरी उभा... ही आरती आठवा ) . या वैवस्वत मन्वंतरातील कृत , त्रेता , द्वापार संपून आता कलीयुग चालू आहे . त्या कली युगातील एकूण चार लाख बत्तीस हजार वर्षातून केवळ ५१२६ वर्षे संपली आहेत . अजून ४२६८७४ वर्षे शिल्लक आहेत . ती संवत्सरे म्हटली जातात . तीच आपली मानवी वर्षे .
" हे वर्ष विश्वावसुनाम संवत्सर "
३० मार्च २०२५ या दिवशी गुढी पाडव्याच्या सुमूहूर्तावर " विश्वावसुनाम " संवत्सर प्रारंभ होते. वर्ष प्रतिपदा हा राष्ट्रीय सण आहे. एकूण साठ संवत्सरे असलेले ऋतू चक्र आहे. त्यातील हे ३९ वे संवत्सर आहे. याचे स्वागत करताना जाणून घेऊ की, संवत्सर म्हणजे आपले एक वर्ष. संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो. " सम्यक् वसन्ति मासादया:अस्मिन् l " (ज्यात मास /महिना आदी विभाग व्यवस्थित सामावतात त्याला संवत्सर असे म्हणतात) . शिवाय , गुरूच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेचा १/१२ अंश काळ म्हणजे एक संवत्सर होय . त्यालाच " शक " म्हणतात . महाराष्ट्रात " श्रीमन नृप शालिवाहन शक १९४७ विश्वावसुनाम संवत्सर " असे आगामी संवत्सराचे पूर्ण वर्णन आहे .
शालिवाहन शक आणि पंचांग वाचन
इसवीसनाच्या सध्याचे आकड्यामधून ७८ वजा केले की शालिवाहन शकाचा आकडा मिळतो . जसे ( २०२५ वजा ७८ = शके १९४७ ) असे मोजावे . चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे ३५४ दिवसांचा असतो. यास 'चांद्र वर्ष' असेही म्हणतात. गुढी पाडवा या दिवशी एक शक किंवा एक संवत्सर संपून दुसरे सुरू होते . त्यात बारा महिने असतात, प्रत्येकी दोन पक्ष असतात. पंधरा तिथी , सात वार , सत्तावीस नक्षत्रे, विविध योग, विविध करण या पाच अंगानी बनलेले कोष्टक म्हणजे आजचे " पंचांग " होते . पंचांग हे सर्व ग्रहांची आकाशातील , दैनिक सद्यस्थिती व स्थान दर्शवते . प्रत्येकाने प्रतिदिनी दैनिक पंचांग ब्राह्म मुहूर्तावर अवश्य वाचावे . त्याने पुण्य , आयुष्यवृद्धी आणि संकटांशी लढण्यास बळ मिळते , असे आपले धर्मग्रंथ सांगतात . सध्या प्रसार माध्यमांवर दैनिक पंचांग उपलब्ध असते , ते वाचावे . तत्पूर्वी श्री गणेश , कुलदैवत , मातापिता , आणि श्री सूर्यनारायण यांचे स्मरण व वंदन करावे . सूर्य नारायण हे अव्यक्त परब्रह्माचे व्यक्त स्वरूप मानावे आणि त्यास अधिष्ठान मानून स्नान , अर्घ्य , देवपूजा , सर्व जपजाप्य करावे . सूर्य हे अखंड कर्मयोगीचे प्रतीक आहे . सर्वांशी समान वागून आणि समरस होऊन सृष्टीला फुलवण्याचे कार्य सूर्यनारायण करतात . त्या सूर्याप्रमाणे सर्वांनी कर्मयोगाचे आचरण करुन प्रगती करावी हा धर्माचा संदेश आहे . सूर्य देवतेला निष्काम भावनेने अर्पण केलेले ते ते कर्म , अव्यक्त परब्रह्मा पर्यंत पोहोचते , अशी आध्यात्मिक धारणा आहे . या वर्षप्रतिपदे पासून प्रत्येकाने अशी उपासना स्वतःसाठी आणि राष्ट्रासाठी करावी .
" गुढीची विजय गाथा "
गुढी उभारणे मुख्यत्वे महाराष्ट्रातील प्रथा आहे. अर्थात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा जपून, हा वर्षाचा प्रथम दिवस तेथे साजरा केला जातो . गुढीला " धर्मध्वज " देखील म्हणतात. गुढ्या तोरणे उभ्या करून विजय मिरवणुका आणि राजाचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे . वर्ष प्रतिपदा आणि वार्षिक कालगणना ही सृष्टीच्या निर्मिती बरोबरच श्री ब्रह्मदेवांनी सुरु केली म्हणून गुढीला " ब्रह्मध्वज " देखील म्हटले जाते . परंपरे प्रमाणे यात " कळक " म्हणजे एक प्रकारच्या बांबूची उंच काठी असते. त्याची पूजा करुन वर्ष सुरु होण्याच्या आदल्या दिवशी जमिनीत रोवून स्थापना केली जात असे. " पाडवा " याचा अर्थ शुभ आरंभ . पाडव्याला त्या उंच बांबूची पूजा करुन रेशमी वस्त्र , कडुनिंब डहाळी , आंब्याची डहाळी , साखर गाठी आणि चमचमता कलश अर्पण करून त्याची विधिवत पूजा केली जाते. नव वर्षाचा आरंभ असा केल्यास सुख, समृद्धी , संरक्षण आणि देवराज इंद्रांसह सर्व देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात , अशी धार्मिक धारणा आहे . त्रेता युगात प्रभू श्रीरामचंद्र यांनी रावणाचा वध करुन , स्वपराक्रमाने पत्नी सीतामातेला सोडवून , सीतेसह अयोध्येत प्रवेश केला , तो दिवस वर्ष प्रतिपदा होता . त्यावेळी त्या पराक्रमाच्या स्मरणार्थ विजयगाथेसाठी गुढ्या तेंव्हाही उभारल्याचे सांगितले जाते .
गुढीचे पौराणिक संदर्भ
महाभारत ग्रंथात आदी पर्वातील अंशावतरण पर्वातील त्रेशष्टव्या अध्यायात गुढीचा लेखी संदर्भ आहे . महाभारत काळात पुरुवंशातील थोर राजा आणि मुनी असलेला , " उपरिचर " हा कल्याणकारी राजा होता . त्याच्या तपश्र्चर्येने इंद्रदेव त्याला प्रसन्न झाले . त्यांनी राजाला तप सोडून राजधर्माचे पालन करण्याचा आदेश दिला . राजाचा सन्मान केला. पृथ्वीचे मोठे राज्य दिले. पृथ्वीवरील इंद्र असे त्याला संबोधिले. त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे केला. त्याला एक आकाशात फिरण्यासाठी विमान, शस्त्रांपासून संरक्षणासाठी एक न कोमेजणारी वैजयंती माला दिली . शिवाय श्रेष्ठ पुरुषांचा रक्षक असा , एक कळकाचा उंच बांबू दिला . बांबू हे कधी न संपुष्टात येणारे झाड आहे . अक्षयतेचे प्रतीक आहे . राजाने ती उंच छडी जमिनीत रोवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी ती उंच छडी किंवा बांबू उंच ठिकाणी ठेऊन , नववर्षाला त्याला वस्त्र , हार , माळा घालून त्याची व इंद्रदेवाची स्थापना करुन विधिवत पूजा केली . त्याने प्रसन्न होऊन श्री इंद्रदेवानी आशीर्वाद दिला की , " उपरिचर राजा प्रमाणे कोणीही व्यक्ती किंवा राजे माझी अशी वर्षप्रतिपदेला गुढी उभारुन पूजा करतील , उत्सव करतील त्यांना आणि त्यांच्या राष्ट्राला धनधान्य , अष्ट लक्ष्मी आणि विजय मिळत राहील . याने सर्व जनता प्रगती करेल आणि राजावर प्रसन्न राहील . त्यातून पांडवांनी , राजे रजवाडे यांनी गुढ्या उभारल्या . त्याचा प्रसार देशात सर्वत्र झाला. थोरांपासून सामान्य नागरिकांनी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा पुरातन काळा पासून आहे . आजही मोठ्या जोमाने पाळली जाते . शिवाय शोभायात्रा काढल्या जातात . अशा परंपरा हीच आपली भारतीय संस्कृती आहे . यामध्ये सर्व जातीपाती , गरीब श्रीमंत आपापल्या घरांवर उंच गुढी उभारतात . मुळात जो उंच बांबू आहे त्याचे पूजन करावे . तो बांबू धर्म दंडाचे प्रतीक आहे .
नव्या पालवीचे करुया स्वागत
वर्ष प्रतिपदेला , चैत्र महिन्या मध्ये वसंत ऋतु , वसंत_संपात या खगोलीय स्थितीत येतो . विषुव वृत्त आणि क्रांती वृत्त वर्तुळे एकमेकांना छेद देतात . तेव्हा वसंत ऋतु बहरतो . " ऋतूनाम कुसुमाकर: " असे भगवंत गीतेतील दहाव्या अध्यायात वसंत ऋतुला स्वतःची एक विभूती म्हणून सन्मानित करतात . जुनी पाने गळतात . वठलेल्या झाडाना पालवी फुलते . वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते . सुगंधी फुलांचा सुवास दरवळतो . निसर्ग पुन्हा फुलू लागतो . जुने गळून जाते . त्याचे दुःख न करता , नव्या पालवीचे स्वागत करावे . जीवनातही नव्याचे स्वागत करावे . युवा पिढीला प्रोत्साहन द्यावे . राग , द्वेष , कर्मठपणा , भेदाभेद यांची पाने गळूदे . नवे विचार , नव्या संकल्पना आत्मसात करुया . भारतीय संस्कृती ही सर्व समावेशक आहे . आपण खरे संस्कृतीचे शिलेदार होऊया . संस्कृतीला नवे पैलू पाडूया . विश्वाला गवसणी घालूया .
वर्ष प्रतिपदा : नाविन्याचे स्वागत
कवी केशवसुतांचच्या शब्दात निसर्ग संकेत देतो की , ...." जुने जाऊद्या मरणा लागून , जाळून किंवा पुरुनी टाका . ....... प्राप्तकाल हा विशाल भूधर. सुंदर लेणी तयात खोदा. निजनामे त्यावरती नोंदा. बसुनी का वाढविता मेदा? ....विक्रम काही करा, चला तर! घातक भलत्या प्रतिबंधांवर . हल्ला नेण्या करा त्वरा रे! .....उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे! वीरांनो! तर पुढे सरा रे . आवेशाने गर्जत हर-हर! ....पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर . तुंबळ संग्रामाला करिती . संप्रति दानव फार माजती . देवावर झेंडा मिरवीती ! देवांच्या मदतीस चला तर! ..... एक तुतारी द्या मज आणुनि . फुंकिन मी जी स्वप्राणाने .... ...
नवी पालवी आपल्या प्रतिभेला येऊ देत . नव संकल्प करुन आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घ्यावी . नवनवे उपक्रम सुरु करण्यासाठी गुढीपाडवा हा संकल्प दिन आहे . आपण नवे उन्मेष आणि नव्या प्रागतिक कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा गुढी पाडवा हा शुभ दिन आहे . शिक्षण आणि संस्कृती , प्रेम आणि सुरक्षा , बलसाधना आणि सामाजिक समरसता , समता आणि बंधुभाव , विश्वास आणि स्त्री दाक्षिण्य , विविधता आणि एकात्मता , यांची गुढी आपण देशात उभी करुया . देश सेवेचा वाटा उचलूया . गुढी पाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
विवेक प्रभाकर सिन्नरकर
स्तंभ लेखक
9371003748