
वीर योद्धा - लछित बोरफुकन
पुण्याच्या 'राष्ट्रीय रक्षा अकादमी (एनडीए)' च्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट सैनिकी प्रशिक्षणार्थीला "लछित बोरफुकन स्वर्ण पदकाने सन्मानित करण्यात येते. १९९९ पासून सुरु करण्यात आलेला झालेला हा पुरस्कार 'लछित बोरफुकन' यांच्या शौर्याचे व बलिदानाचे प्रतीक व तीनही भारतीय सैन्य दलांना प्रेरणास्त्रोत म्हणून प्रदान केले जाते. वीर योद्धा लछित यांची रणनीती भारतीय नौसेना रणनीतीचा पाया रचणे, नौदल सशक्त करणे, आंतरदेशीय जल परिवहन सुदृढ करणेयासाठी अभ्यासली जाते. अशा थोर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची काळाआड गेलेली ही संक्षिप्त शौर्यगाथा !
लछितची शौर्यगाथा
आसाम प्रदेशात इ.स. १२२८ च्या कालखंडात वसलेल्या अहोम साम्राज्याने शतकानुशतके खिलजी, तुघलक, इलियासशाहि,लोदी, बेंगाल सुलतान इत्यादींच्या आक्रमणांपासून आपल्या साम्राज्य आणि संस्कृतीचे मोठ्या शौर्य सामर्थ्याने, आस्थेने संरक्षण केले. परंतु सततची परकीय आक्रमणे आणि इ.स. १६३८ मधील प्रचंड मुघल आक्रमणाने अहोम साम्राज्याचे आर्थिक नुकसान झाले. अशातच इ.स.१६६१ मध्ये औरंगजेबच्या मिर जुमला आणि दिलेरखान या सरदारांच्या अजस्त्र आक्रमणामुळे अहोम राजा जयध्वज सिंगची पीछेहाट होउन त्याला अपमानकारक तहात राज्याचा विस्तृत पूर्वोत्तर भाग, धनसंपत्ती, सैन्य, एवढेच नव्हे तर आपल्या सहा वर्षीय कन्येला सुद्धा मुघलांच्या हवाली करण्याची वेळ आली. या धक्क्याने राजा जयध्वज सिंगचा मृत्यू होऊन राजा चक्रध्वज सिंगच्या हाती अहोम राज्याची सूत्रे आली. लयाला चाललेल्या अहोम साम्राज्याच्या याच कालखंडातील लछितची शौर्यगाथा आहे.
सन १६२० मध्ये जन्मलेले लछित याचे पिता 'मोमई तामुली बार्बरु' उच्चपदस्थ अधिकारी होते. लहानपणापासूनच चाणाक्ष, नेतृत्वकुशल असलेले लछित स्वपरिश्रमाने अल्पावयातच महत्त्वपूर्ण अशा राज्याच्या प्रधान सचिवपदी नियुक्त झाले. अहोम सेनेची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. दहा सैनिकांचा दलप्रमुख 'देका', वीस सैनिकांचा दलप्रमुख 'बोरा', १०० सैनिकांचा दलप्रमुख 'सैंकिया', १००० सैनिकांचा दलप्रमुख 'हजारीका', ३००० सैनिकांचा दलप्रमुख 'रामकुवा', ६००० सैनिकांचा दलप्रमुख 'फुकन', व या सर्व सैन्यदल प्रमुखांचा संचलन करणारा सरसेनापती म्हणजे 'बोरफुकन'असे नामाभिधान होते. खिळखिळ्या झालेल्या अहोम राज्याची मुघल आक्रमणापासून रक्षणाची जबाबदारी एकमुखाने लछितवर सोपवली गेली व ते राज्याचे सरसेनापती म्हणजेच "लछित बोरफुकन" झाले.
दिलेरखान आणि शाहिस्तेखानासारख्या सरदारांची विशाल, सशस्त्र आणि संघटित मुघल सेना आणि हतबल, वैफल्यग्रस्त, विस्थापित अहोम सेना अशा प्रतिकूल आव्हानात्मक परिस्थितीत लछितने संपूर्ण नैपुण्य पणाला लावून सेना निर्माण, शस्त्रास्त्रे निर्मिती, नव सैन्य भरती, प्रशिक्षण, सामर्थ्यशाली युद्ध कुशल नौसेना रचना , अनुकूल नौका आणि शस्त्रास्त्रे निर्मिती, गुप्तहेर खातं सक्षमीकरण, किल्ल्यांची डागडुजी तसेच सुरक्षा व्यवस्था , अन्नधान्य साठा, स्वराज्य-स्वधर्म-स्वसंस्कृती रक्षणासाठी प्रजेचे मनोबल, एकात्मता व समर्पण भावना वृद्धिंगत करणं इत्यादी सर्व आवश्यक पातळ्यांवर कमालीची गोपनीयता बाळगत अत्यंत प्रभावी कार्य केलं.
एकूणच मुघलांची पिछेहाट होताना पाहून भडकलेल्या औरंगजेबाने सत्तर हजारांच्या सशस्त्र सेनेसह मिर्झाराजा जयसिंगपुत्र राजा रामसिंगला आक्रमणासाठी पाठवले. त्याने कटकारस्थानाने लछितच्या सेनेला प्रमुखांना फितूर केले. भौगोलिक परिस्थिती मुळे घोडदळात कमकुवत असलेल्या अहोम सेनेला खुल्या युद्धाचे आव्हान दिले.
राजा रामसिंगने गुवाहाटीवर कब्जा करण्याच्या उद्देशाने ब्रह्मपुत्रा नदी जवळ मुघल नौसेना उभारली. मार्च १६७१ मध्ये अभूतपूर्व इतिहास प्रसिद्ध सराईघाट युद्धाला सुरुवात झाली, जे पूर्णतः ब्रह्मपुत्रेच्या विशालकाय पात्रात लढले गेलेले भारतवर्षातील एकमेवाद्वितीय रोमांचक नौकायुद्ध होते. युद्धात गंभीर जखमी होऊनही आपल्या प्रकृतीची पर्वा न करता लछित आपल्या सैन्याच्या नेतृत्वास सज्ज झाले. आपल्या अथक, परिपूर्ण नौका युद्ध सरावाचा आणि कौशल्याचा अहोम सेनेने उपयोग केला. आधुनिक शस्त्रास्त्रे तसेच जलद नाविन्यपूर्ण नौकांच्या सहाय्याने त्यांनी सर्व बाजूंनी मुघल सेनेवर आक्रमणाचा भडीमार केला. महाभयंकर जल युद्धात मुख्य मुघल सरदार मुनव्वर खान आणि अनेक सरदार मारले गेले. मुघल सैन्याची वातहात झाली. या सैन्याला लछित बोरफुकनच्या सेनेने मानस नदीच्या पार हुसकावून लावले. सराईघाटाच्या विजयानंतर काही दिवसांतच गंभीर आजाराने लछित यांचा मृत्यू झाला. या विजयाच्याच आधारावर १६८२ मध्ये शेवटची लढाई होऊन अहोम सैन्याने मुघलांपासून आसाम पूर्णतः मुक्त केला आणि त्यानंतर मुघल पुन्हा कधीही आसाम कडे फिरकू शकले नाहीत.
मुघलांच्या आक्रमकतेने येऊ घातलेल्या शासनकालात आसामने केवळ धार्मिक-सांस्कृतिक विनाश व आत्मघातक गुलामगिरी अनुभवली असती. पण लछित बोरफुकन यांच्या प्रभावशाली नेतृत्व, शौर्य आणि बलिदानावर नवसंजीवन प्राप्त झालेल्या आसामने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास अनुभवत स्वराज्याचा मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय विकास केला. म्हणूनच आसाम मध्ये दरवर्षी '२४ नोव्हेंबर' हा दिवस "लछित दिन" नावाने अतिशय गौरवाने व अभिमानाने कृतज्ञतापूर्वक साजरा केला जातो. अशा अनभिज्ञ राहिलेला योद्धा सर्व पिढ्यांचे प्रेरणास्त्रोत आहे.
▪️कविता शेटे▪️
जनजाती कल्याण आश्रम, पुणे.