जनजाती संस्कृतीचे विराट दर्शन

दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या जनजाती सांस्कृतिक समागमात पश्चिम क्षेत्रातील विदर्भ,देवगिरी,पश्चिम महाराष्ट्र,कोकण व गोवा प्रांतातील २८ जिल्ह्यातून,१०० तालुक्यातून,२३५० गावातून ४७ जनजातींचे १३ हजार ९४५ प्रतिनिधी सहभागी झाले होते.तर देशभरातून ११ क्षेत्रातून ४० प्रांतातून दिडलाखाच्या वर प्रतिनिधी उपस्थित होते. खरच अविस्मरणीय व ऐतिहासिक क्षण होता तो २४ मे २०२६ - जनजाती सांस्कृतिक समागम. दीड लाखांपेक्षा अधिक असा प्रचंड जनसागर. १ वर्ष आधीच तिथी निश्चित झालेली. पूर्व नियोजन व पूर्ण नियोजन काय असते,याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम.
जनजाती क्रांतीकारक भगवान बिरसा मुंडा यांचे १५० वे जयंती वर्ष म्हणून या विशेष कार्यक्रमाची योजना करण्यात आली होती. जनजाती नेता आणि पूर्व केंद्रीय मंत्री स्व. कार्तिक उराव यांचे स्वप्न होते की, धर्मांतरित समाज जनजाती यादीतून वगळण्यात यावा,या मुख्य मागणीसाठी सुद्धा हा प्रचंड जनसमुदाय दिल्लीत एकत्रित आला होता.तालुक्यात,जिल्ह्यात,प्रांतात,क्षेत्रात त्या त्या कार्यकर्त्यांचे प्रवास होत होते,अधिकाधिक संख्येने दिल्लीला जायचे आहे, किंबहुना मला दिल्लीला जायचेच म्हणून सर्व जनजाती समाजात प्रचंड उत्साह दिसून येत होता. आपल्या गावापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत जनजाती समाज विविध गावातून स्वतःच्या खर्चाने उपस्थित झाला होता. विविध कार्यकर्त्यांनी समाजाकडून आर्थिक सहाय्य मागून दिल्लीला जाण्यायेण्याची व्यवस्था,भोजन व पाण्याची व्यवस्था पूर्ण केली होती. काही नागरिक प्रथमच रेल्वेत बसले होते, डोळ्यात कुतूहल होते,उत्सुकता होती पण आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही,याचेही भान या समाजाला होते,म्हणून गाडी जाताना व येताना स्वच्छ होती. कुठलाही गोंधळ नव्हता. तोंडी हरिपाठ होता,भजने होती,सोबत टाळ मृदुंगाची साथ होती,मनात भक्तिभाव होता. संपूर्ण २० डब्यांचे नेतृत्व वनवासी कार्यकर्ताच करत होता,प्रत्येक बोगीचा प्रमुख नियोजित केला होता,आपल्या सोबत आलेल्या बंधू भगिनींची काळजी तो घेत होता.३४ तासांच्या रेल्वेमधील प्रदीर्घ कालावधीनंतर २३ मे रोजी दिल्ली गाठली होती,सर्वांमध्ये संयम आणि शिस्त होती.
दिल्लीत विविध ठिकाणी(स्थानकावर) या सगळ्या विशेष गाड्या थांबण्याची व्यवस्था केली होती. आमची गाडी शकुर बस्ती येथे थांबली होती.तिथे सुगंधित गुलाबपाकळ्यांचा वर्षाव झाला.थंड पाणी,निवासस्थानी नेण्यासाठी बसेसची व्यवस्था,कुठेही गडबड/गोंधळ होऊ नये म्हणून बाहेर आल्यावर स्थानकावर व्यवस्थित शामियाना टाकून सर्वांना तिथे बसवून,पंखे व कुलर लावून शिस्तबध्दतेची अनुभूती आम्ही घेत होतो. उन्हापासून संरक्षण होत होते,तिथेही अँब्युलन्स ठेवल्या होत्या. कुणाला काही उन्हाचा त्रास झाला तर लगेच सुविधा मिळत होती. विविध प्रांतातून आलेल्या जनजातीय नागरिकांची व्यवस्था विविध विद्यालयामध्ये केली होती.आम्ही दिल्लीच्या पटेल नगरातील सर्वोदय बाल विद्यालय,शादी खामपुर येथे उतरलो होतो तिथे लक्षिता दीदी व दीप्ती दीदी या जैन साध्वींकडून संपूर्ण १४०० लोकांना २ वेळेचे भोजन, नाष्टा व चहा सरबत देण्यात आले,अशा विविध विद्यालयामध्ये उतरलेल्या नागरिकांची निवास व्यवस्था शीख समुदाय, जैन समुदाय व परिवारातील विविध संघटनेकडून व्यवस्थितपणे करण्यात आली होती. रा.स्व.संघ,विश्व हिंदू परिषद,दुर्गा वहिनी,राष्ट्र सेविका समिती,सेवा भारती अशा परिवारातील विविध संघटनांचे कार्यकर्ते देशभरातून आलेल्या प्रतिनिधींना कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्या त्यानिवास स्थानांवर पाहुण्यांची आत्मीयतेने काळजी घेत होते.
२४ मे ला दुपारी जेवण करून आपले सामान घेऊन बस मधे बसायचे होते.शोभायात्रा जिथून सुरू होणार होती तिथे सर्वांना बसने सोडण्यात आले आणि भव्य दिव्य शोभायात्रा सुरू झाली पारंपरिक वेशभूषा,विविध वाद्य व रांगेत व शिस्तीत चालणारा,नृत्य करणारा विशाल जनजाती समुदाय.शोभायात्रेतील संपूर्ण वातावरण देशभक्तीचे होते.ठिकठिकाणी विविध मंडळींकडून,संघटनांकडून भव्य स्वागत,सुगंधी ,देशी गुलाब पाकळ्यांचा होणारा वर्षाव दुपारी भरपूर उन असल्याने थंड पाणी, ताक व सरबताची व्यवस्था,खाण्यासाठी सुद्धा पाकिटात घालून दिलेला गरमागरम ब्रेडवडा, काही ठिकाणी केळी,शेवेची छोटी छोटी पाकिटे व आणखी काय..दिल्लीकरांच्या प्रचंड उत्साहाचा प्रत्यय क्षणोक्षणी येत होता. विविध प्रांतातील जनजाती बांधव आपली पारंपरिक वेशभूषा घालून वाद्यांसह नृत्य करीत होते. भारत माता की जय,वंदे मातरम्,जय श्रीराम या घोषणांनी परिसर देशभक्तीमय,राममय झाला होता.
जनजाती सुरक्षा मंचचे ध्वज प्रत्येकाच्या हातात देण्यात आले होते. शोभायात्रेची संपूर्ण व्यवस्था अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली होती.
दिल्लीतून विविध ठिकाणाहून ५ शोभायात्रा निघाल्या होत्या. देशभरातून ५५० जनजातीचे ते विराटरूप,भारतमातेचे ते विलोभनीय रूप लाल किल्ला मैदानावर उठून दिसत होते. प्रत्येक क्षेत्राला,प्रांताला मैदानावर थांबण्यासाठी एक स्वतंत्र ब्लॉक तयार केला होता,म्हणजे कुठेही गडबड गोंधळ होणार नाही ,तिथे प्रांताचे,क्षेत्राचे नाव लिहिले होते,कोणी कोणत्या द्वारातून जायचे याचे अचूक नियोजन केले होते! प्रत्येक क्षेत्राला विशिष्ट रंगाची टोपी व बॅच देण्यात आला होता. गुलाबी,केशरी,लाल,पिवळा,निळा,हिरवा अशा विविध रंगी टोप्या डोक्यात घालून उपस्थित सर्व रांगेत बसले होते रंगांचे व रांगेचे ते सौंदर्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते!! रांगेत बसलेल्या रंगाचा तो सोहळा नेत्रदीपक होता!
मंचावर , गृहमंत्री श्री अमित शहा, वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्रजी सिंह,पद्मश्री पुरस्कार प्राप्त बुधरी दीदी, जनजाती सुरक्षा मंचचे राष्ट्रीय प्रमुख गणेशरामजी भगत ,उपाध्यक्ष तेची गोविनजी उपस्थित होते.
जनजाती क्रांतिकारकांचे वंशज या कार्यक्रमात उपस्थित होते त्यांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला.पश्चिम क्षेत्रातील विदर्भ,देवगिरी,पश्चिम महाराष्ट्र,कोकण व गोवा प्रांतातील २८ जिल्ह्यातून,१०० तालुक्यातून,२३५० गावातून ४७ जनजातींचे १३९४५ प्रतिनिधी या जनजाती सांस्कृतिक समागमात सहभागी झाले होते. देशभरातून ११ क्षेत्रातून ४० प्रांतातून दिडलाखाच्या वर प्रतिनिधी उपस्थित होते.तू मैं एक रक्त ची प्रचिती येत होती आणि मनात एका गीताच्या ओळी घुमत होत्या..
"संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगो में हिंदू है।
विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदु है।।"
वैशाली दिनकर देशपांडे,पुणे