विश्व संवाद केंद्र - पुणे
1 day ago
इथे घडतात कार्यकर्ते... (भाग ३)

संघाच्या उन्हाळी वर्गांचे व्यवस्थापन हा कार्यकर्ता जडण-घडणीतील एक महत्त्वाचा पैलू आहे. विविध प्रकारच्या अडीअडचणींवर मात करत या वर्गांचे व्यवस्थापन अतिशय उत्तमरीतीने केले जाते. कोणीही थक्क व्हावा, अशी एक संघकार्यकर्त्यांची मोठी यंत्रणा या व्यवस्थापनात अहोरात्र राबत असते.
'संघ शिक्षा वर्गां'चे व्यवस्थापन ही काही सोपी गोष्ट नाही. पूर्वी तर या वर्गांमधील शिक्षार्थ्यांची संख्या हजार-बाराशे पर्यंत संख्या असायची. वर्गांच्या स्थानांची संख्या वाढल्यानंतर ही संख्या विभागली गेली. तरीही वर्गासाठी आलेल्या तीन-चारशे स्वयंसेवकांची निवास, भोजनादी सर्व प्रकारची व्यवस्था करणे हे मोठे अवघड काम असते. शिवाय वर्गाचे वेळापत्रक अत्यंत काटेकोररीत्या पाळले जाते. त्यामुळे न्याहारी किंवा भोजन असो वा ध्वनी यंत्रणा असो, वर्गातील प्रत्येक व्यवस्था वेळेवरच पूर्ण करावी लागते.
ज्या शहरात किंवा जिल्हा किंवा तालुका स्थानी हा वर्ग असतो, तेथील स्वयंसेवक किमान दोन, तीन महिने आधीपासूनच वर्गाच्या व्यवस्थांचा बारकाईने विचार करून तयारीला लागलेले असतात. त्या त्या गावातील शंभरएक जणांचा संच वर्गाच्या व्यवस्थांमध्ये राबत असतो. अनेकजण तर नोकरीतून रजा काढून या वर्गाच्या व्यवस्था विभागात काम करत असतात. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यानंतर पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत ही मंडळी सतत व्यग्र असतात, हेतू हा की, व्यवस्थेमध्ये कोणतीही कमतरता राहू नये.
कधी पाऊस, कधी वादळ...
हे वर्ग प्रामुख्याने उन्हाळ्यात होत असले, तरी अनेकदा जोरदार पावसाचा तडाखा देखील या वर्गांना बसतो. कधी वादळ येते. अशा अचानक उद्भवणाऱ्या अडचणींवरही मात करत वर्गाच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव राहणार नाही, याची काळजी संघाचे स्थानिक कार्यकर्ते मनापासून घेत असतात. नागपुरात जो वर्ग होतो, त्याला साऱ्या देशातून शिक्षार्थी येत असतात. नागपूरचा उन्हाळा भाजून काढणारा असतो. मात्र आलेले शिक्षार्थी संघभक्तीने भारावलेले असतात. ते उन्हाळ्याचा त्रासही सहजतेने सहन करतात.
चाळीसगावच्या वर्गातील पाऊस
महाराष्ट्र प्रांताचा प्रथम आणि द्वितीय वर्षाचा 'संघ शिक्षा वर्ग' १९८७ साली जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला होता. चाळीसगावात तसे पावसाचे मान कमीच. पण ज्या वर्षी वर्ग होता, त्या उन्हाळ्यात अधूनमधून पाऊस पडत होता. वर्गासाठी जी शाळा घेतली होती, ती तशी लहान होती. म्हणून बाहेरही एक मंडप उभारण्यात आला होता. वर्गाच्या दिनक्रमाप्रमाणे एके दिवशी दुपारी बौद्धिक वर्गाची वेळ होत असताना पावसाला सुरुवात झाली.
चाळीसगावात त्या दिवशी तुफान पाऊस झाला. त्या वादळी पावसाने वर्गाचेही खूप मोठे नुकसान केले. मंडप कोसळला. ज्या मंडपात भोजन तयार केले जायचे तेथून पाण्याचे लोंढे वहात होते. त्या पाण्यात भोजनगृहातील अनेक भांडीही वाहून गेली. अर्थात, अशाही परिस्थितीत डगमगतील तर ते स्वयंसेवक कसले...? पाऊस कमी होताच व्यवस्था विभागातील स्वयंसेवकांनी तातडीने पर्याची व्यवस्था करायला सुरुवात केली आणि तासा-दोन तासात सारी व्यवस्था पुन्हा उभी राहिली. वर्गाचे सारे कार्यक्रम पूर्वनियोजनाप्रमाणे पुन्हा सुरू झाले. कोणत्याही प्रकारची अशी आपत्ती आली तरी वर्गाच्या कार्यक्रमात किंचितही बदल होत नाही, हे या वर्गांचे एक मोठे वैशिष्ट्य आहे.
वर्गासाठी आलेले शिक्षार्थी वर्गासाठी केल्या जाणाऱ्या साऱ्या व्यवस्थांचा अनुभव घेत असतात. त्या व्यवस्थांमध्ये काम करणाऱ्यांशीही त्यांचा संवाद होतो. त्यातून अशा मोठ्या कार्यक्रमांच्या व्यवस्था कशा करायच्या असतात, याचेही शिक्षण शिक्षार्थ्यांना मिळते.
विविध भाषांचा एकोपा
देशात उत्तर विरुद्ध दक्षिण असे वाद हेतूतः निर्माण केले जात आहेत. राज्या-राज्यांमध्ये वाद उत्पन्न केले जात आहेत, तसे भाषा-भाषांमध्येही वाद उत्पन्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संघाचा नागपुरात होणारा वर्ग हा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरावा.
या वर्गात देशाच्या सर्व राज्यांमधून स्वयंसेवक आलेले असतात. स्वाभाविकच ते विविध भाषी असतात. सर्वांसाठी व्यवहाराची भाषा हिंदी असते. ती न समजणारेही कितीतरी शिक्षार्थी वर्गात असतात, पण या साऱ्यांचा परस्परांमधील एकोपा, जिव्हाळा अनुभवण्यासारखा असतो. बंधुत्वाचे नातेच किती श्रेष्ठ आहे, याची साक्ष या वर्गात साऱ्यांना पटते. सारा देश जोडण्याचे हे सूत्र. नागपूरच्या वर्गात त्याचीच अनुभूती येत असते. हीच अनुभूती घेऊन, प्रेरणा घेऊन या वर्गातून सारे जण आपापल्या क्षेत्रात जातात.
संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे आणि या उन्हाळी वर्गांचे नाते शब्दशः अतूट आहे. हे नाते समजून घेऊ या पुढील भागात...
- विश्व संवाद केंद्र - पुणे
Share With Friends
अभिप्राय
अभिप्राय लिहा