हिंदू समाजाचे 'सोशल लिंचिंग'

मोबाईलवर रील्स स्क्रोल करताना हिंदू सणांबद्दल नकारात्मक कंटेंट तुम्ही नक्की पाहिला असेल. एखाद्या न्यूज चॅनेलवर किंवा वर्तमानपत्रातही हिंदू सणांच्या वैचारिक, शास्त्रीय आणि व्यावहारिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लेख किंवा चर्चा आता सवयीच्या झाल्या आहेत. या सर्व कंटेंटचा उद्देश हिंदू सणांमध्ये सकारात्मक सुधारणा करण्याचा नाही, तर हिंदू समाजाचे 'सोशल लिंचिंग' करण्याचा आहे. हा एक अत्यंत पद्धतशीरपणे राबवला जाणारा 'प्रोपगंडा' आहे.
हिंदू समाजातील विविधतेचा गैरफायदा घेऊन समाजात दरी निर्माण करण्याचे प्रयत्न गेली कित्येक शतके सुरू आहेत. यामध्ये समाजातील काही अंतर्गत त्रुटींबरोबरच, हा प्रोपगंडा राबवणाऱ्या बाह्य शक्तींचा मोठा वाटा आहे. वास्तवात समाजसुधारकांचे कार्य आणि घटनात्मक लोकशाहीमुळे हिंदू समाजात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत आणि हा समाज नेहमीच शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कार करत आला आहे. याच कारणामुळे आज जगभरात स्वखुशीने हिंदू धर्माचा स्वीकार करणाऱ्या साधकांची संख्या वाढते आहे.
मात्र, एकेश्वरवादी विचारांच्या शक्तींना ही गोष्ट मान्य नाही. म्हणूनच भारत आणि जगभरात हिंदूंचे सोशल लिंचिंग करण्याचा घाट घातला जात आहे. यामध्ये परदेशात हिंदू सण साजरे करणाऱ्यांवर टीका करणे, त्यांना मागासलेले ठरवणे किंवा सणांमधील काही एकांगी गोष्टींचा विपर्यास करून त्यांची बदनामी करणे, अशा प्रकारांचा समावेश आहे.
"गणेशोत्सव कुणी सुरू केला?"
"विज्ञानवादाने गणपतीला नाकारले आहे."
"बलिप्रतिपदा म्हणजे भूमीपुत्रावरील अन्यायाचे प्रतीक आहे."
"होळी म्हणजे मूळनिवासी होलिकाचे दहन..."
असे एक ना अनेक भ्रम पसरवले जात आहेत. शास्त्रांचा अर्धवट अर्थ काढून आणि बुद्धीभेद करून हा कुप्रचार चालवला जातो. यामागे ठराविक एकेश्वरवादी विचारांच्या आर्थिक आणि वैचारिक शक्ती कार्यरत आहेत.
- हिंदू असुरक्षित कसा? (अपप्रचाराची नवी पद्धत) :
सणांवर होणाऱ्या या 'सोशल लिंचिंग'बद्दल जर तुम्ही बोलायला सुरुवात केली, तर "हिंदू कसा धोक्यात आला?" असे उपरोधाने विचारून तुमचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. "महागाई वाढल्यावर हिंदू धोक्यात येत नाही का?" , "खराब रस्ते, अपघात किंवा समाजातील वाईट घटनांबद्दल तुम्ही का बोलत नाही?"
असे प्रश्न विचारून हिंदू समाजाच्या मनात एक प्रकारचा गिल्ट (अपराधाची जाणीव) निर्माण केला जातो; जेणेकरून तुम्ही या सांस्कृतिक आक्रमणाविरुद्ध उघडपणे बोलू शकणार नाही. मात्र, या शक्ती अत्यंत पद्धतशीरपणे हिंदू संस्कृती, सण आणि परंपरा या अवैज्ञानिक व अमानुष असल्याचे भासवतात. या परंपरांमधून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचा आभास निर्माण केला जातो. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरील अनेक चॅनेल्स, पोस्ट्स आणि चळवळी केवळ याच कामासाठी चालवल्या जात आहेत. दुर्दैवाने, यात काही स्थानिक संघटना आणि जातीय गटही सहभागी झाले आहेत, ज्यांचा वापर बाह्य शक्ती आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करत आहेत.
गंमत म्हणजे, आपल्याकडे 'नास्तिक' म्हटले की केवळ हिंदू देव-देवतांना नाकारणारी व्यक्ती असेच चित्र उभे केले जाते. इतर धर्मांमध्ये नास्तिक नाहीत का? मग त्यांच्या नास्तिकतेचे किंवा त्यांच्यावरील टीकेचे उदात्तीकरण का केले जात नाही?
- सांस्कृतिक मार्क्सवाद आणि प्रोपगंडा :
'कल्चरल मार्क्सिझम' (Cultural Marxism) च्या सिद्धांतानुसार, जर एखादा नवा समाज किंवा विचार लादायचा असेल, तर आधीच्या संस्कृतीची श्रद्धास्थाने नष्ट करावी लागतात. याच तत्त्वावर आधारित हा प्रोपगंडा चालवला जात आहे. सोशल मीडियावर हिंदूंचे सोशल लिंचिंग करणाऱ्या प्रोफाईल्सचे सूक्ष्म निरीक्षण केले, तर ही बाब सहज लक्षात येते. दुर्दैवाने, आता हिंदूविरोधी शक्ती एकत्र आल्या असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ देऊन अशा मोहिमा, चळवळी आणि समाजात भेद निर्माण करणारे लिखाण चालवले जात आहे.
आज सर्वच माध्यमे आणि उद्योगांना हिंदू सणांच्या माध्यमातून मोठी जाहिरात, खरेदी आणि आर्थिक फायदा होतो. परंतु, दुर्दैवाची बाब म्हणजे, हीच माध्यमे वेळोवेळी हिंदू सणांचे लिंचिंग करण्यासाठी सरसावलेली दिसतात. एक जागृत हिंदू म्हणून आपण ही छुपी रणनीती ओळखायला हवी. आपल्या संस्कृतीतील सकारात्मक आणि विज्ञानाधारित बाबी ठामपणे समोर आणून हा प्रोपगंडा हाणून पाडला पाहिजे!