उद्घोष भारतीयत्वाचा
भारतीय अवधारणा – आपल्या समृद्ध वारशाचा आधुनिक शोध आणि जागतिक सुसंगतता

‘भारत’ हा शब्द उच्चारताच मनात एक अद्भूत ऊर्जा आणि अभिमानाची भावना दाटून येते. 'भा' म्हणजे ऊर्जा आणि 'रत' म्हणजे अखंड प्रवाह. अर्थात भारत म्हणजे ऊर्जेचा अखंड प्रवाह. आपल्या डोळ्यांसमोर हिमालयाची उत्तुंग शिखरे, गंगेचा पवित्र प्रवाह आणि डौलाने फडकणारा तिरंगा अभिमानाने उभा राहतो. भारत म्हणजे नकाशा नसून ती हजारो वर्षांपासून प्रवाही असलेली एक महान 'अवधारणा' आहे, एक जिवंत अनुभूती आहे. आपण जागतिक पातळीवर प्रगतीची नवी शिखरे सर करत आहोत, तेव्हा आपली ही मूळ ओळख आणि संस्कृती आपल्याला अधिक समृद्ध आणि सक्षम बनवत आहे.
'अवधारणा' म्हणजे एखाद्या गोष्टीकडे, संपूर्ण विश्वाकडे आणि स्वतःच्या अस्तित्वाकडे पाहण्याचा आपला विशिष्ट दृष्टिकोन. आपली जीवन जगण्याची कला, लहानपणापासून आपल्यावर झालेले सखोल संस्कार, जगातील एकमेवाद्वितीय अशी भक्कम एकत्र कुटुंब पद्धती आणि समाजात कोणत्याही व्यक्तीवर संकट आले असता संपूर्ण गावाने किंवा गल्लीने एकत्र येऊन एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची आपली मूळ वृत्ती म्हणजे 'भारतीय अवधारणा' सध्याच्या गतिमान, स्पर्धात्मक आणि 'ग्लोबल' जगात भौतिक सुखांच्या मागे धावताना माणूस स्वतःला हरवून बसत आहे, अशा वेळी आपली ही मूळ ओळख, आपली पाळेमुळे नेमकी कुठे रुजलेली आहेत, हे समजून घेणे गरजेचे बनले आहे.संस्कृती बदलत राहते, पण माणसाला माणूस म्हणून जगवणारी मूल्ये कधीच बदलत नाहीत. भारतीय अवधारणा याच शाश्वत मूल्यांचा पाया आहे.
आधुनिक कॉर्पोरेट जगात संपूर्ण जगाला केवळ एक 'मार्केट' (बाजारपेठ) समजण्याची संस्कृती वाढीस लागली आहे, जिथे प्रत्येक नात्याकडे आणि वस्तूकडे नफा-तोट्याच्या गणितातून पाहिले जाते. परंतु, हजारो वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला एक 'कुटुंब' समजण्याची उदात्त संस्कृती आणि विचार भारताने जगाला दिला. वसुधैव कुटुंबकम् म्हणजेच संपूर्ण पृथ्वी हेच माझे घर आहे, हा आपल्या रक्तामध्ये आणि दैनंदिन व्यवहारात भिनलेला विचार आहे.
याचे अगदी जिवंत उदाहरण पाहायचे झाले तर, आपल्याकडे रस्त्याने जाणाऱ्या अगदी अनोळखी व्यक्तीलाही आपण थेट 'काका', 'मावशी', 'दादा' किंवा 'ताई' म्हणून हाक मारतो. पाश्चिमात्य देशांत अनोळखी व्यक्तीला 'सर' किंवा 'मॅडम' म्हणून संबोधले जाते, जे अंतर राखणारे औपचारिक शब्द आहेत. पण आपल्याकडे जोडला जाणारा हा नात्याचा धागा नकळतपणे याच महान अवधारणेचे पालन करणारा आहे. ही मूल्येच आपल्याला संपूर्ण जगाशी एका कौटुंबिक नात्याने जोडत आहेत.अनेकांचा गैरसमज असतो की, भारतीय अवधारणा म्हणजे केवळ जुन्या, कालबाह्य कथा किंवा अंधश्रद्धा आहेत. परंतु, बारकाईने अभ्यास केल्यास लक्षात येते की, आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या परंपरेमागे, सणांमागे एक सखोल शास्त्र आणि विज्ञान दडलेले आहे. आपले पूर्वज निव्वळ कर्मकांड करणारे नव्हते, तर ते निसर्गाचे आणि मानवी शरीराचे थोर अभ्यासक होते.
आपण जेव्हा हात जोडून नमस्कार करतो, तेव्हा तो समोरच्या व्यक्तीबद्दलचा आदर आहेच पण विज्ञानाच्या दृष्टीने, दोन्ही हातांची बोटे एकमेकांवर दाबली गेल्याने शरीरातील अॅक्युप्रेशर पॉइंट्स सक्रिय होतात, त्यामुळे समोरच्या व्यक्तीची प्रतिमा आपल्या स्मरणात दीर्घकाळ राहते. तसेच, शारीरिक स्पर्श न केल्यामुळे संसर्ग टाळण्याची ही अत्यंत सुरक्षित आणि शास्त्रीय पद्धत आहे, ती कोरोना काळात संपूर्ण जगाने स्वीकारली.
आयुर्वेद म्हणजे केवळ आजारी पडल्यावर घ्यायची जडीबुटी किंवा औषध नाही. 'आयुष्याचे वेद' म्हणजे आयुर्वेद. माणसाने निरोगी राहण्यासाठी त्याचे ऋतूमानानुसार खानपान कसे असावे, मानसिक शांतता कशी राखावी, याचे सविस्तर मार्गदर्शन आयुर्वेदात आहे. म्हणजेच, कोणताही आजार बरा करण्यापेक्षा आजार होऊच नये यावर भर देणारा जीवनमार्ग आहे.
आपण पिंपळ, वटवृक्ष, तुळशीची पूजा करतो, नद्यांना 'माता' मानतो. धार्मिक भावनेसोबतच पिंपळ आणि वडासारखे वृक्ष चोवीस तास ऑक्सिजन देतात, हे आपल्या पूर्वजांना ठाऊक होते. नद्या पाण्याने समृद्ध राहिल्या तरच मानवी संस्कृती टिकेल, हे भान आपल्याला हजारो वर्षांपूर्वी होते. निसर्गाचे शोषण करण्याऐवजी त्याचे संवर्धन करणे, हा या पूजेमागचा खरा वैज्ञानिक विचार आहे.
जगाचा इतिहास पाहिला तर अनेक देश केवळ एका भाषेमुळे, एका विशिष्ट पेहरावामुळे किंवा एका धर्मामुळे एकत्र आलेले दिसतात आणि तिथे थोडाही बदल झाला की, संघर्षाची ठिणगी पडते. पण भारताचे सौंदर्य काही वेगळेच आहे. आपल्याकडे दर बारा कोसांवर भाषा बदलते, बोलण्याची ढब बदलते, सण साजरे करण्याची पद्धत बदलते आणि जेवणाची चवही बदलते. एवढी विविधता असूनही भारतावर कोणतेही संकट आल्यावर सर्वजण एकाच ताकदीने आणि एकाच भावनेने तिरंग्याखाली उभे राहतात. आपल्याकडील ही 'विविधतेत एकता' आपले सर्वांत मोठे सामर्थ्य आहे. वेगवेगळ्या विचारांना, संस्कृतींना स्वतःमध्ये सामावून घेण्याची आणि त्यांना आपलेसे करण्याची लवचिकता हेच भारतीय अवधारणेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.आज आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा (चांद्रयान मोहीम) जगातील पहिला देश बनलो आहोत. जगातली सर्वात मोठी आणि वेगवान 'डिजिटल अर्थव्यवस्था' म्हणून भारताचा डंका वाजत आहे. रस्त्यावरील भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या मॉलपर्यंत प्रत्येक जण मोबाईलवर डिजिटल पेमेंट करत आहे. पण हे अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारताना आपण आपली मूळ संस्कृती विसरलो आहोत का? तर त्याचे उत्तर 'नाही' असे आहे.उलट, आज जेव्हा संपूर्ण जग मानसिक ताणतणावाखाली जगत आहे, तेव्हा ते शांततेसाठी भारताच्या 'योग' आणि 'प्राणायामा'कडे वळत आहे. आरोग्याच्या तक्रारींवर मात करण्यासाठी पाश्चिमात्य देश आज आपल्या घरातील हळदीच्या दुधाला 'टर्मेरिक लाटे' म्हणून मोठ्या आदराने स्वीकारत आहेत. एकेकाळी आपण ज्या गोष्टींना 'जुनाट' समजून मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो, आज संपूर्ण प्रगत जग त्याच गोष्टींचा स्वीकार करून स्वतःला समृद्ध करत आहे.
भारतीय असणे म्हणजे भारताच्या भूमीवर जन्म घेणे इतका संकुचित अर्थ नसून भारतीय मूल्यांना, इथल्या संस्कृतीला आणि विचारसरणीला आपल्या मनात जपणे. केवळ व्यापारी दृष्टिकोन न ठेवता, समाजातील प्रत्येक घटकाशी भावनिक आणि कौटुंबिक नाते जोडणे ही आपली ताकद आहे. 'मी' कडून 'आम्ही' कडे जाण्याचा हा मूळ भारतीय मार्ग आहे. आपल्या पूर्वजांच्या चालीरितींना अंधश्रद्धा न मानता, त्यामागील वैज्ञानिक, मानसिक आणि आरोग्यदायी दृष्टिकोन शोधून तो आजच्या तरुण पिढीला त्यांच्याच भाषेत पटवून देणे आवश्यक आहे.निसर्गाचा अमर्याद उपभोग घेण्याऐवजी,त्याचे संवर्धन करून सहअस्तित्व राखणे हाच आजच्या जागतिक तापमानवाढीसारख्या मोठ्या संकटांवर एकमेव जागतिक उपाय आहे. तंत्रज्ञानात आणि अर्थव्यवस्थेत जगात आघाडीवर राहताना आपली नैतिक मूल्ये, आदरयुक्त कुटुंब व्यवस्था आणि मानवी संवेदनशीलता टिकवून ठेवणे हेच खऱ्या प्रगतीचे लक्षण आहे.झाडाची पाने गळतात, तेव्हा झाड रडत बसत नाही, तर ते नवीन पालवी (नवीन सुरुवात) फुटण्याची तयारी करत असते. तसेच, वादळात लवचिक असते फक्त तेच झाड टिकून राहते. हाच संयम आणि लवचिकता आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते.पटतंय ना !!!
•तुमच्या घरातली अशी कोणती छोटी गोष्ट, सवय किंवा संस्कार आहे, जो तुम्हाला आजही 'भारतीय' असल्याचा सार्थ अभिमान मिळवून देतो? नक्की विचार करा.
•आपल्या घरातील 'एकत्र कुटुंब पद्धती' किंवा घट्ट नाती ही एखाद्या वडाच्या झाडाच्या मुळांसारखी असतात. ती वरून दिसत नसली, तरी वादळात झाडाला घट्ट धरून ठेवण्याचे आणि त्याला जिवंत ठेवण्याचे खरे काम करतात.
•परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसले, तरी त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे आपल्या हातात असते. जेव्हा मोठा पाऊस येतो, तेव्हा एक व्यक्ती चिखल झाला म्हणून चिडते; तर दुसरी व्यक्ती तहानलेल्या धरणीला पाणी मिळाले म्हणून आनंद व्यक्त करते. पाऊस तोच असतो, फक्त पाहणारा दृष्टिकोन बदलतो.
•आपण एखाद्या कागदाची घडी घातली किंवा तो चुरगळला, तर नंतर आपण त्याला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी त्यावरचे चुरगळल्याचे डाग पूर्णपणे जात नाहीत. माणसाच्या मनाचेही तसेच असते; म्हणूनच विचार करून बोलणे ही आपली कौटुंबिक आणि सामाजिक संस्कृती आहे.
झाडाची पाने गळतात, तेव्हा झाड रडत बसत नाही, तर ते नवीन पालवी (नवीन सुरुवात) फुटण्याची तयारी करत असते. तसेच, वादळात लवचिक असते फक्त तेच झाड टिकून राहते. हाच संयम आणि लवचिकता आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते.पटतंय ना !!!
अंजली तागडे
संपादक विश्व संवाद केंद्र,पुणे