
शिवराज्याभिषेकाचा सोहळा हा हिंदू साम्राज्य उत्सवच आहे. म्हणूनच त्या दिवशी समस्त भारतीय समाजात एक चैतन्य लहर निर्माण होते. हे कसे? याचा आणखी एक पैलू या ठिकाणी उलगडून पाहूया. शिवराज्याभिषेकाच्या आधीही शिवाजी महाराजांचा राज्यकारभार चालूच होता आणि तो प्रामुख्याने फारसी शद्बांवर चालत होता. पण राज्याभिषेकानिमित्ताने राज्याचे व राजाचे सार्वभौमत्व, वैशिष्ट्य, स्वत्वाची ओळख हे सर्वच लक्षात येते. त्यामुळे शिवराज्याभिषेक या सोहळ्याची अखिल भारतीय ओळख होते व त्या दिवसाचे महानपण जाणवते.
राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराज यांनी नवीन राज्य व्यवहार कोष तयार करून घेतला. पण एवढेच याचे महत्त्व नाही, तर हा राज्य व्यवहार कोष संस्कृत भाषेत आहे. जर शिवाजी महाराजांच्या मनात हे मराठी राज्य असते, तर हा कोष तत्कालीन मराठीतही बनू शकला असता. पण तसे घडायचे नव्हते.
हा कोष बनवण्याची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य यांच्यावर सोपवली व त्यांनी ती जबाबदारी धुंडीराज म्हणून विद्वानांच्या मदतीने पूर्ण केली. १३८० फारसी, उर्दू शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द दिलेला बृहद् ग्रंथ अस्तित्वात आला.
संस्कृत भाषेची अक्षम्य हेळसांड झाल्यामुळे स्वतंत्र भारतात सुध्दा राष्ट्रीय एकात्मतेसाठी किती अडचणी येत आहेत ते आपण पहातो. त्याकाळी सकळ राष्ट्र एकात्म करणारी संस्कृत भाषा ही कोषाची भाषा ठरली. त्यातूनच शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय अस्मितेच्या प्रकटीकरणाचा सोहळा आहे हे निश्चित झाले व संपूर्ण देश मोहरून गेला.
या प्रत्येक वैशिष्ट्याने हे सिद्ध केले की, एक सामान्य राज्याभिषेक नाही, तर राष्ट्र अस्मिता जागरणाचा हा सोहळा आहे. म्हणून त्याचे ३५० वे स्मरण संपूर्ण देशाला आवश्यक व गरजेचे आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे हिंदू साम्राज्य उत्सव आहे हे समजणे गरजेचे आहे.