महात्मा बसवेश्वर आणि सामाजिक समरसता
जातीभेदांचा तीव्र निषेध करीत सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेले महात्मा बसवेश्वर सामाजिक समरसता तत्त्वाचे मुकुटमणी शोभतात. समरसता ही मनाची एक संवेदना आहे .ती प्रत्यक्षात आचरणात आलीच पाहिजेत असा आग्रह धरणाऱ्या म. बसवेश्वरांनी आपल्या उक्ती - कृतीतून हिंदुत्वाचा परिघ अधिक व्यापक केला. समाजातील एका घटकांने दुसऱ्या घटकाच्या सुखदुःखांशी एकरूप होणे आणि परस्परांच्या एकात्मतेची प्रचिती देत परस्परांशी बंधूभावाचे नाते प्रस्थापित करणे म्हणजे सामाजिक समरसता होय याचे भान महात्मा बसवेश्वरांनी प्रथमतः ठळकपणे जागृत केले.
सामाजिक समरसता म्हणजे कालानुरूप बदललेल्या हिंदुत्वाच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे,असे आपण ज्यावेळी म्हणतो वेळी वीरशैव उर्फ लिंगायत संप्रदायाचे प्रमुख प्रचारक असलेल्या म.बसवेश्वरांच्या सामाजिक समरसतेचा मुख्य धागा हिंदुत्वाशी अर्थात व्यापक व संमिश्र अशा हिंदू धर्माशी निगडित होता हे आवर्जून ध्यानात घ्यायला हवे .
मेधावी बुद्धिमत्ता, विविध भाषांचा, शास्त्रांचा अभ्यास आणि कुशल अर्थतज्ज्ञ असलेल्या बसवेश्वरांना राजा बिज्जलाच्या दरबारात महत्त्वाची पदे मिळाली. लोककल्याणाची आस असलेल्या बसवेश्वरांनी मिळालेल्या मंत्रीपदाचा डामडौल कधीच मिरवला नाही. लिंगभेदांपलीकडे जाऊन माणूसधर्माचा जागर ,पढीक विद्वत्तेचा निषेध आणि स्वातंत्र्य, स्वाभिमान व स्वत्वावर घाला घालणाऱ्या वृत्तीविरुद्ध केलेले लोकसंघटन आणि धर्मरक्षणाचा आजीवन घेतलेला ध्यास ही बसवेश्वरकार्याची मर्मस्थाने आहेत.
मन:परिवर्तनातून समाजपरिवर्तन ही भूमिका असलेल्या म. बसवेश्वरांनी अडीच अक्षरांची( प्रेमाची )भाषा वापरली. विधायक मार्गाने परिवर्तन व्हावे आणि या परिवर्तनाने लोकसंस्थांचे संवर्धन संरक्षण करावे यासाठी दक्ष असलेल्या म.बसवेश्वरांच्या सामाजिक समरसता कार्याचे मुख्य मर्म हिंदू धर्म आणि त्यातून विकसित झालेल्या हिंदुत्वात लपलेले आहे. म्हणूनच त्यांनी भारतीय तत्त्वपरंपरेतील वीरशैव उर्फ लिंगायत संप्रदायाचा आधार घेत, त्यातील सत्यांशाचे ,सत्वांशाचे कालसापेक्ष असे सार ग्रहण केले आणि लोकभाषेच्या माध्यमातून जनतेमधील जनार्दन जागविला. त्यांच्या मते,' सनातन वैदिक धर्माच्या वेगवेगळ्या मार्गांवरून जाणारे पंथ म्हणजे आपले संप्रदाय. मात्र संप्रदाय ही केवळ विविध अंगांनी अभिव्यक्त होणारी धर्मपद्धती नसते. त्यामागे आचार- विचार आणि धर्माची कालसापेक्षता यांचा त्रिवेणी संगम झालेला दिसतो .संप्रदाय केवळ विशिष्ट प्रवक्त्यांशी, विशिष्ट उपास्यदैवतांशी किंवा विशिष्ट ग्रंथसंपदांशी किंवा विशिष्ट आचारपद्धतींशी निगडित नसून ;त्यामधून राष्ट्राला, या समाजाला एकात्म करणारा चैतन्यरस वाहत असतो. प्रवाहित होत असतो. व्यापक अशा राष्ट्रसंस्कृतीचा तो एक अनोखा पैलू असतो. त्यामुळेच सांप्रदायिक तत्त्वज्ञानातून व्यक्त होणाऱ्या सामाजिक जाणीवांमधून त्या संप्रदायाची स्थिती- गती प्रकट होते. त्यातून त्या त्या संप्रदायाची, पर्यायाने विशिष्ट समाजघटकांची मानसिकता,त्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते . जाचक रूढी- परंपरांपासून धर्माला मुक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
धर्म म्हणजे तरी शेवटी काय ? 'धारयिती इति धर्म:'. धर्म हा समाजाला धारण करतो म्हणजेच निरोगी लोकसंस्थांचे रक्षण करतो. एका अर्थाने व्यापक राष्ट्रधर्माची पायाभरणी स्वधर्माच्या भक्कम पायावर होते .दुर्दैवाने ही बाब आज विसरली जाते आहे. मानवतेला कलंक लावणारे वातावरण वाढत चालले आहे. त्यामुळे व्यक्ती - व्यक्तीचा ,संप्रदाय - संप्रदायांचा संघर्ष होणार नाही. दुसऱ्यांच्या हक्कांवर अतिक्रमण करणार नाही; हे पाहण्याची जबाबदारी धर्मनिष्ठ म्हणणाऱ्या आपलीच आहे याची जाणीव महात्मा बसवेश्वरांनी समाजामध्ये निर्माण केली.
डॉ. श्यामा घोणसे
(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन प्रमुख व प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)