धर्म हा भारताचा प्राण आहे. देवभक्ती हा भारतीय समाजातील सामान्य माणसाचा सहज स्वभाव आहे. यालाच आधार बनवून देवभक्तीतून देशभक्तीचे जागरण वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी वयाच्या 21व्या वर्षापासूनच आपल्या भजनातून आणि भाषणांमधून केले आहे. 1930 मध्ये वैदर्भीय गोंडवाना सत्याग्रही शिबीरात राष्ट्रचेतना जागविणारे भजन म्हटले , त्यातून हजारो क्रांतिकारक निर्माण झाले.
झुठी गुलामशाही क्या डर बता रही है ?
जुल्मोका खौफ देकर किसको डरा रही है ?
आजादी हमारा हक है, लेकर रहेंगे अब हम ।
चाहे प्राणों की बली देकर, मर मिटेंगे अब हम ।
परकीयांची सत्ता केवळ राजसत्तेपर्य॔त मर्यादित नसते, तर राजसत्ता अबाधित राहावी यासाठी गुलाम देशातील जनतेचे मानस बदलून टाकण्याचा ही सत्ता प्रयत्न करीत असते. धर्म व संस्कृती यावर सतत आक्रमण करून समाज मनात स्वत:विषयी हीन भावना निर्माण करण्याचे काम ही सत्ता विविध मार्गाने करीत असते.
देश, समाज व राष्ट्रीयत्व निरंतर बलशाली ठेवण्याचा मुख्य आधार संस्कृतीचे श्रेष्ठत्व मनीमानसी रुजविणे हा आहे. आपल्या संतांनी पिढी दर पिढी हे कार्य केले आहे. ब्रिटिशांविरुद्धची लढाई समाजात स्वत्व जागविणारी होती. गावखेड्यातील जनांमध्ये क्रांतीची मशाल पेटवणारी होती. भारताच्या प्राचीनतम राष्ट्रजीवनाचा परिचय वं. महाराज 1932 सालात एका भजनाच्या शब्दांमधून उपस्थित सत्याग्रहींना करून देतात.
प्यारा हिन्दुस्थान है, गोपालोंकी शान है ।
वीरों का मैदान इसमें, भक्तोंके भगवान है ।
आवो इसे जगाएंगे, भारत को बदलाएंगे ।
बाल वीरो उठो तुम तो, ॠषियोंकी संतान है ।
हा देश भगवान श्रीकृष्णांचा, ज्यांनी प्रत्यक्ष गाईंच पालन केले. राम आणि कृष्ण हे आपले मानबिन्दू ; समाजाचे भावविश्व या दोन चरित्रांनी व्यापून टाकले आहे. 'स्व'ची आठवण झाली की, समाज पारतंत्र्य सहनच करीत नाही. याच आधारावर संपूर्ण हिन्दुस्थान जागवू या. ही भूमी पराक्रमी वीर पुरूषांची आहे. याच प्रेरणेतून नवा स्वतंत्र भारत निर्माण करूया. हे बालवीरांनो आपण साक्षात महान संत, दार्शनिक, तपस्वी ऋषिमुनींचे संतान आहात. हे सर्व आपले आदर्श आहेत. हा दीर्घ, मंगल व पवित्रतम वारसा जपणारे आम्ही परकीयांच्या गुलामगिरीत राहू शकत नाही. या 'स्व'जागृतीमुळे 1942चा स्वातंत्र्य संग्राम गावागावातील स्त्री-पुरूषांनी पुढे चालविला.
16 ऑगष्ट 1942, नागपंचमीचा दिवस आष्टी आणि चिमूरच्या लढ्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासात अंकीत झाला. दोन्ही ठिकाणी भीषण संघर्ष झाला. देशभक्तांचे बलिदान झाले. याचा बदला जनतेने ताबडतोब घेतला. पोलीस ठाणे जाळून टाकले. या ज्वाळांनी क्रान्तिकारकांचे मनोबल वाढले. ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले. संपूर्ण विदर्भात झालेल्या या संघर्षाने चले जाव चळवळीला बळ मिळाले.
वंदनीय महाराजांनी भजनातून भारताची ओळख करून दिली. यहां पर भी हनुमान थे, अर्जुनसे बलवान थे ।
सामर्थ्य जागविण्यासाठी भारताच्या जनमानसाला बजरंगबली हनुमानाचे चरित्र प्रेरित करते. त्याप्रमाणे भगवान कृष्णाने कंसाचा केलेला वध याचीही आठवण जनतेला करून देणे महाराजांना आवश्यक वाटते. राजा कंस उमंग उमंग उमंगे, लीला कर वधवाई ।
राजा कंस सर्व दृष्टीने शक्तिशाली होता. परंतु मोठाच अहंकारी होता. प्रजेवर अत्याचार करणारा हा राजा कृष्णाचा सख्खा मामा होता. कंसाला ठार करून भगवान कृष्णाने जनतेला मुक्त केले, स्वतंत्र केले. इंग्रजांची राजसत्ता ही एका अर्थाने अत्याचारी व अहंकारी कंसाच्या राजसत्तेसारखी आहे, हे वंदनीय राष्ट्रसंत आपल्या भजनातून पटवून देतात व समाजाला स्वत्व व धर्म रक्षणाची जाणीव करून देतात. संस्कृती, परंपरा, गौरवशाली इतिहास यातून भारताची ओळख व राष्ट्रीयत्व मजबूत होत असते. याचा प्रत्यय वंदनीय तुकडोजी महाराजांच्या स्वातंत्र्य आंदोलनातील योगदानातून स्पष्टपणे दिसून येतो. राष्ट्रसंत पुन्हा पुन्हा योगेश्वर कृष्णाला साद घालतात. कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।
जनतेच्या रूपातील कृष्ण वं. राष्ट्रसंतांना त्या क्षणी अपेक्षित आहे. देव, देश व धर्म गुलामगिरीत सापडला आहे.
अती गुलाम जन जाहले, येणेची राष्ट्र नासले ।
तोडण्या येई बंधना । गुलामगिरीच्या श्रृंखला तोडण्यासाठी परमेश्वरा धाव घे.
तुकड्याची आस कर पुरी, तू गरूडसावरी हरी, घे धाव नंद नंदना, पाहण्या भारत अपुला पुन्हा !
हे राष्ट्र जागरण ; ही स्वत्वाची ओळख,हा जागर संस्कृती व राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठीचा.
1947ला देश स्वतंत्र झाला. पुढे "स्वराज्याकडुन सुराज्याकडे जायचे" हा मंत्र सामान्य जनांमध्ये दृढ करण्यासाठी वंदनीय महाराज आयुष्याच्या अंतापर्यंत प्रबोधनाचे कार्य करीत राहिले.
भारत माता की जय !
सुभाष लोहे (संयोजक, भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांत, आष्टी, जि.वर्धा)