९ जून १९०० रोजी भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश तुरुंगात अखेरचा श्वास घेतला, पण त्यांनी मागे ठेवलेला वारसा आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. ते अवघे २५ वर्षांचे होते, पण आपल्या अल्पायुष्यात त्यांनी 'उलगुलान' नावाची क्रांती घडवून आणली. ही केवळ आदिवासींची प्रतिकार चळवळ नव्हती, तर सभ्यतेच्या संरक्षणासाठी पुकारलेला एक लढा होता. आज भारत बहुलवाद आणि विविधतेचा गौरव करण्यासाठी प्रयत्न करत असताना, भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसंग्रामातील गौरवशाली अध्यायांची आठवण करून देते – जे जंगलांच्या बोलीभाषेत लिहिले गेले, डोंगर-दऱ्यांच्या गाण्यांमधून गायले गेले आणि धनुष्यबाणाने, शौर्याने आणि दृढ विश्वासाने लढले गेले.
- विवेकानंद नरताम
सहाय्यक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, श्याम लाल कॉलेज, दिल्ली विद्यापीठ

- सरकारचे प्रयत्न आणि 'जनजातीय गौरव दिवस'
गेल्या काही वर्षांपासून भारत सरकारने भगवान बिरसा मुंडा आणि इतर आदिवासी नायकांचा वारसा राष्ट्रीय चेतनेत आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. २०२१ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त – १५ नोव्हेंबर रोजी – त्यांना आदरांजली वाहताना या दिवसाला "राष्ट्रीय श्रद्धेचा दिवस" म्हणून घोषित केले. १० नोव्हेंबर २०२१ रोजी भारत सरकारने १५ नोव्हेंबर हा दिवस 'जनजातीय गौरव दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, जो आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांना आणि आदिवासी समाजाच्या समृद्ध वारशाला सन्मानित करण्यासाठी एक वार्षिक राष्ट्रीय उत्सव आहे. हा ऐतिहासिक निर्णय 'आझादी का अमृत महोत्सव' चा भाग होता, जो भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे स्मरण करतो.
- वारशाचे महत्त्व आणि 'जल, जंगल, जमीन' चा लढा
या घोषणेचे महत्त्व केवळ प्रतीकात्मक नाही. आदिवासी समुदायांनी भारताच्या राष्ट्रीय जडणघडणीत बजावलेली आणि आजही बजावत असलेली महत्त्वाची भूमिका ही एक प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली मान्यता आहे. भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष केवळ ब्रिटिश आर्थिक आणि राजकीय शोषणाविरोधात नव्हता, तर आदिवासी ओळख, श्रद्धा आणि जल, जंगल, जमीन (पाणी, जंगल आणि जमीन) यावरील हक्कांचे एक शूर संरक्षण होते. वसाहतवादी राजवटीत, आदिवासी समाजाला सक्तीचे विस्थापन, वनक्षेत्रांपासून दुरावले जाणे आणि सांस्कृतिक विनाशाचा सामना करावा लागला. आदिवासी स्वायत्तता नष्ट करण्यासाठी ख्रिस्ती धर्मांतर आणि वडिलोपार्जित जमिनीतून विस्थापन ही तंत्रे वापरली गेली. भगवान बिरसा मुंडा, ज्यांना अनेकदा 'धरती आबा' (पृथ्वीचे जनक) असे म्हटले जाते, त्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उचलला. त्यांच्या 'उलगुलान' चळवळीचा उद्देश केवळ ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवणे हा नव्हता, तर सन्मान परत मिळवणे हा होता. जरी ते ब्रिटिश सामर्थ्यासमोर नतमस्तक झाले असले तरी, त्यांच्या प्रतिकारामुळे एक ज्योत प्रज्वलित झाली, ज्याने अनेक स्वातंत्र्यसैनिकांना मार्ग दाखवला. भगवान बिरसा मुंडा यांचा ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्धचा लढा महत्त्वपूर्ण आहे कारण त्याने राष्ट्रीय जागृती घडवून आणली.

- स्मारक आणि संग्रहालये
त्यांच्या स्मृतीला संस्थात्मक रूप देण्यासाठी, भारत सरकारने रांची, झारखंड येथे पहिले आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय स्थापन केले आहे. हा एकच उपक्रम नाही, तर आदिवासी वारसा आणि शौर्य साजरे करणारी संग्रहालये विविध राज्यांमध्ये विकसित केली जात आहेत – गुजरात (गरुडेश्वर, राजपीपला), आंध्र प्रदेश (लम्मासिंगी), छत्तीसगड (रायपूर), केरळ (कोझिकोड), मध्य प्रदेश (छिंदवाडा), तेलंगणा (हैदराबाद), मणिपूर (मखल गाव, सेनापती), मिझोरम आणि गोवा. ही केंद्रे केवळ शिक्षण देण्यासाठीच नाहीत तर मुख्य प्रवाहातील कथांमध्ये अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी प्रदेशांमध्ये अभिमान आणि पर्यटनाला चालना देण्यासाठीही आहेत.
- भगवान बिरसा मुंडा यांचा जीवंत वारसा
आज भगवान बिरसा मुंडा यांचे नाव केवळ संग्रहालयेच नव्हे तर संपूर्ण भारतातील संस्था आणि महत्त्वाच्या स्थळांनाही दिले गेले आहे – रांचीमधील बिरसा मुंडा विमानतळ, सिंद्री येथील बिरसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि रूरकेला येथील जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम. त्यांचा वारसा शैक्षणिक संस्था, विद्यार्थी वसतिगृहे, लष्करी रेजिमेंट्स आणि अगदी विद्यापीठांच्या उत्सवांमध्येही जिवंत आहे. भारतीय लष्कराची बिहार रेजिमेंट “बिरसा मुंडा की जय” या युद्धघोषणेने आपला रणनाद करते, जो प्रतिकार आणि भूमीवरील निष्ठेची भावना दर्शवतो.
सर्वात महत्त्वाकांक्षी स्मारक प्रकल्पांपैकी एक म्हणजे झारखंडमध्ये प्रस्तावित १५० फुटांची “उलगुलानची मूर्ती”, जी स्थानिक घराघरातून गोळा केलेल्या दगडांचा वापर करून बांधली जाणार आहे

– लोकांच्या सहभागातून साकारलेली एक योग्य श्रद्धांजली.
केंद्र सरकार विविध माध्यमांद्वारे आदिवासी नायकांचा सन्मान करत आहे, जसे की भारतातील विविध विद्यापीठांमध्ये आदिवासी अभ्यासाचे अभ्यासक्रम सुरू करणे. यासोबतच, आदिवासी समुदायांचे शोषण, विस्थापन आणि बहिष्करण याबद्दल अभ्यास करण्यासाठी आणि धोरणात्मक सूचना देण्यासाठी संशोधकांना आणि विद्यापीठातील प्राध्यापकांना संशोधन प्रकल्प देण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. एक समाज आणि राष्ट्र म्हणून, भगवान बिरसा मुंडा यांचा वारसा केवळ औपचारिक न राहता, मजबूत धोरणनिर्मितीला प्रेरणा देणारा असावा हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे – भूमी हक्कांचे संरक्षण, वन प्रशासनात सुधारणा, शिक्षण आणि आरोग्यसेवेत समावेश आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदिवासी भाषा, विधी आणि जागतिक दृष्टिकोनांचे संरक्षण.
- भविष्याकडे वाटचाल
भारत जेव्हा भविष्याकडे वाटचाल करत आहे, तेव्हा त्याने आपल्या आदिवासी भूतकाळाचे शहाणपण सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. बिरसा मुंडा यांचे जीवन सर्व भारतीयांसाठी एक संदेश होता: की स्वातंत्र्य केवळ राजकीय स्वातंत्र्याबद्दल नाही, तर सांस्कृतिक अस्तित्व, पर्यावरणीय सुसंवाद आणि सर्व ओळखींसाठी सन्मानाबद्दल देखील आहे. ९ जून, भगवान बिरसा मुंडा यांचा स्मृतिदिन, केवळ एक कॅलेंडरवरील घटना न राहता, भारताच्या आत्म्याला पुन्हा शोधण्याची हाक असावी, जिथे भारताचा आदिवासी वारसा परिघावर न राहता, पायाभूत असेल.
--------
- लेखक - विवेकानंद नरताम
सहाय्यक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, श्याम लाल कॉलेज, दिल्ली विद्यापीठ
(अनुवाद - सायली क्षीरसागर-कोकीळ)