दिनदर्शिका विमोचन सोहळा : जनजाती कल्याण आश्रम पुणे महानगरात उत्साहात संपन्न

पुणे, दि. ५ ऑक्टोबर २०२५ :
अखिल भारतीय जनजाती कल्याण आश्रम संलग्न पुणे महानगरतर्फे आयोजित दिनदर्शिका २०२६ विमोचन कार्यक्रम आज सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रल्हादजी राठी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री चैत्रामजी पवार उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पुणे महानगर अध्यक्ष मा. प्रकाशजी धोका यांनी शाल-श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सचिव श्री. सतीश मोकाशी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती शोभा जोशी यांनी यंदाच्या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य सांगितले. पारंपरिक माहितीसह यंदा दिनदर्शिकेत पद्मश्री सन्मानित जनजाती कार्यकर्त्यांचा परिचय व रानभाज्यांवरील विशेष माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
या प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पुणे महानगर अध्यक्ष मा. प्रकाशजी धोका यांच्या पंचाहत्तरीनिमित्त विशेष अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक योगदानावर आधारित एक माहितीपटही दाखवण्यात आला. सन १९७४ पासून त्यांनी औद्योगिक क्षेत्रासह समाजकार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते पद्मश्री चैत्रामजी पवार यांची प्रकट मुलाखत, जी प्रा. सुधीरजी गाडे (माजी सहसचिव, एम.ई.एस. सोसायटी) यांनी घेतली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा गावचे रहिवासी असलेले चैत्रामजी पवार यांनी उभारलेले वनव्यवस्थापन आणि ग्रामविकास मॉडेल देशभरात आदर्श ठरले आहे.
त्यांच्या कार्यात जंगल, जल, पशुधन, जनधन व स्थानिक संसाधन हे पाच मुख्य स्तंभ मानले गेले आहेत. वृक्षलागवड, जलसंधारण, दुबार शेती उत्पादन, रानभाज्यांचा प्रसार, महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न, ग्रामविकासातील बचत गटांचे पुनर्रचना अशा विविध क्षेत्रांत त्यांनी नवे प्रयोग केले आहेत. "सोच बदलो, बाकी सब बदल जायेगा" हे कल्याण आश्रमाचे वाक्य त्यांच्या कार्यात प्रेरणादायी ठरले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ७८ देशांच्या सर्वेक्षणात बारीपाडा गावाला दुसरा क्रमांक, तर IFDA पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र व भारतभरातील अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
मुलाखतीत त्यांनी सांगितले की –
"विकास म्हणजे शुद्ध अन्न, शुद्ध हवा आणि शांत झोप. ग्रामविकास व शाश्वत प्रगतीसाठी ग्रामीण व शहरी विभागांचे परस्पर जोडणे अत्यावश्यक आहे."
त्यांनी स्थापन केलेल्या शबरी नॅचरल ग्रामउद्योगा*तून पर्यावरणपूरक पदार्थांचा प्रसार होत असून, गिरीशजी कुबेर यांच्या सहकार्याने *वनांचल विज्ञान केंद्रांना शासनमान्यता मिळवण्यात त्यांनी यश मिळवले आहे.
कार्यक्रमाच्या अखेरीस श्री. प्रकाशजी खिचडे यांनी नाशिक जिल्ह्यातील गुही गावातील शाळा प्रकल्पासाठी मदतीचे आवाहन केले. श्रीमती तुषारिका लिमये यांनी आभारप्रदर्शन केले.
---
संपर्क : नीता मोहरे – ९७६२४२२४५४