उत्सव हवा, गोंगाट नको
फर्ग्युसनमध्ये 'जेन-झी'चा ध्वनिप्रदूषणविरोधी 'सेल्फी पॉइंट'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे:सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि डॉल्बीमुळे होणाऱ्या असह्य दणदणाटाविरोधात तसेच कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाच्या त्रासावर मात करण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयातील तरुणाई आणि पुणेकर नागरिक एकत्र आले आहेत. 'जागरूक पुणेकर नागरिक समिती' आणि फर्ग्युसन महाविद्यालयातील 'बाप्पा कॅन्टीन' यांच्या संयुक्त विद्यमाने "ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सव" या चळवळीला बळ देण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात 'उत्सव हवा, गोंगाट नको!' असा संदेश देणाऱ्या दोन अनोख्या सेल्फी पॉईंट्सचे उद्घाटन करण्यात आले.

उपक्रमाच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीचा (जेन-झी) सहभाग वाढवून व्यापक जनजागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला चित्रपट दिग्दर्शक वरुण नार्वेकर, चित्रपट निर्माते रणजित गुगळे, अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चारूल देशपांडे, करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले आणि रूपा दंताळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्सवांमधील ध्वनिप्रदूषणाचे भयावह वास्तव मांडणारी 'नकोत त्या भिंती' ही शॉर्ट फिल्म सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तिचे लेखक-दिग्दर्शक वरुण नार्वेकर आणि निर्माते रणजित गुगळे यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधला.

पारंपरिक वाद्ये आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा जपत उत्सव साजरा करणे हीच पुण्याची खरी अस्मिता असून, कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. या मोहिमेत महाविद्यालयीन तरुण ज्या जबाबदारीने आणि आवेशाने पुढे आले आहेत, ते पाहता समाजात सकारात्मक बदल नक्कीच घडेल, असा विश्वासही त्यांनी दर्शवला.अभिनेत्री चारुल देशपांडे व प्रा. विजय नवले यांनी विद्यार्थ्यांनी या सेल्फी पॉईंटवर फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर करत मोहीम व्यापक करण्याचे आवाहन केले, ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 'बाप्पा कॅन्टीन'चे विवेक कुलकर्णी आणि 'जागरूक पुणेकर नागरिक समिती'चे सौरभ वीरकर व सुमित डोळे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले होते. आम्हाला सुंदर व आनंददायी उत्सव हवेत, मात्र आरोग्याला घातक ठरणारा आवाज नको, असा निर्धार विद्यार्थ्यांनी या वेळी व्यक्त केला. हे सेल्फी पॉईंट्स पुढील काही दिवस महाविद्यालयात राहणार असून, त्याद्वारे 'जेन-झी' पिढी या शांततापूर्ण उत्सव चळवळीला मोठी ताकद देईल, असा विश्वास सौरभ वीरकर यांनी व्यक्त केला.