कोल्हापूर-: अत्यंत खडतर काळामध्ये संघ कामाचा विस्तार झाला. मात्र या पुढील काळही आव्हानात्मक आहे. इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चुकीच्या गोष्टी घरात येत आहेत. राष्ट्रीय एकात्मता, कुटुंब व्यवस्था या समोर भविष्यात मोठी आव्हाने आहेत. संघ आपले काम करत आहे मात्र समाजानेही सिद्ध होणे आवश्यक आहे. असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापुरातील राजाभाऊ भोसले स्मृती भवन या संघ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय कुलकर्णी यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्तापर्यंत कोल्हापुरातील संघ कार्याचा त्यांनी आढावा घेतला. शहर संघचालक प्रमोद ढोले यांनी लोक उत्कर्ष समितीच्या कामाची माहिती दिली. यावेळी समितीच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. सुनील कुलकर्णी यांनी संघ प्रचारक राजाभाऊ भोसले, तत्कालीन जिल्हा कार्यवाह अण्णा ठाकूर, जिल्ह्याचे पहिले संघचालक ॲड.खासबरदार यांच्या कार्याची माहिती दिली. प्रांत संघचालक नाना जाधव म्हणाले, 'यज्ञ, तप आणि दान याला फार महत्त्व आहे. यज्ञ याचा अर्थ कर्तव्य. तप म्हणजे प्रयत्नातील सातत्य. आणि दान याचा अर्थ समाजासाठी अधिकाधिक योगदान असा आहे. या पद्धतीने प्रत्येकाने प्रयत्न केल्यास समाजाचे स्वास्थ्य चांगले राहील. ही भावना मनामध्ये तयार करण्याचे काम संघाने केले आहे.'
यावेळी सुहास हिरेमठ म्हणाले, 'संघ कार्याचा विस्तार हा कार्यालयांमुळे झाला नाही. तर तो संघ स्वयंसेवकांच्या कुटुंबामुळे झाला. संघ स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांनी संघासाठी फार मोठा त्याग केला आहे. रामायणामध्ये तर एक उर्मिला पाहायला मिळते. पण संघ कार्यकर्त्यांच्या प्रत्येक घरात एक उर्मिला आहे. घरातील कर्ता पुरुष संघ कामाला प्राधान्य देतो. त्यामुळे कौटुंबिक गोष्टींकडे दुर्लक्ष होते. मात्र तरीही या माता भगिनी आपले कर्तव्य पार पाडत असतात. संघाचे प्रचारक आपले कुटुंब सोडतात मात्र असंख्य कुटुंबांचे घटक बनतात. हे संघ कार्याचे वैशिष्ट्य आहे. संघ स्थापनेपासूनच पश्चिम महाराष्ट्रातील संघ काम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभे राहिले. मात्र यापुढील काळही आव्हानात्मक आहे. अमरावती सारख्या ठिकाणी जी विकृत घटना घडली त्यावरून लक्षात येते की समाजाची अवनिती किती झाले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चुकीच्या गोष्टी घरामध्ये येत आहेत. यासाठी सुसंस्कारित पिढी निर्माण होणे गरजेचे आहे. संघ स्वयंसेवक आपल्या परीने काम करत आहेत. अनेक सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकाला आधार दिला जात आहे. मात्र केवळ एवढे काम करून पुरेसे होणार नाही. भविष्यातील आव्हाने ओळखून समाजानेही सिद्ध झाले पाहिजे. संघाचे प्रचारक राजाभाऊ भोसले, अण्णा ठाकूर आणि खासबारदार यांचे जीवन कार्य समजून घेतले पाहिजे. ते कोणताही महापुरुषापेक्षा कमी नाही. संघ कार्यकर्त्यांसाठी आणि समाजासाठीही त्या आदर्शवत आहेत.
यावेळी विभाग संघचालक प्रताप उर्फ आप्पासाहेब दड्डीकर, विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा, जिल्हा संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ यांचे प्रमुख उपस्थिती होती.