
पुणे, दिनांक १७ मे २०२६ : "संघाचे सक्षम नेतृत्व, हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान आणि तळागाळातील 'शाखा' या तीन भक्कम स्तंभांवर संघाची शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल उभी आहे. 'राष्ट्र प्रथम' ही भावना रुजवून व्यक्ती निर्माणातून राष्ट्र उभारणी करणे, हेच संघाचे मुख्य ध्येय आहे," असे प्रतिपादन अखिल भारतीय प्रचार विभाग टोळीचे सदस्य अजिंक्य कुलकर्णी यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत, हडपसर भागाच्या वतीने रविवारी हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात 'संघशताब्दी मंथन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर मनोज पोस्ट आणि हडपसर भाग संघचालक प्रवीण पाताळे उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, "कुठल्याही संस्थेचे मूल्यमापन तिचे नेतृत्व, विचारसरणी आणि तळागाळातील कार्यावरून ठरते. संस्थापक डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांनी प्रसिद्धीपासून दूर राहत निरलसपणे संघटना उभारली. 'हा देश हिंदूंचा असून हिंदुत्वाच्या संघटनातून देशाला परमवैभवाकडे नेणे' ही संघाची स्पष्ट विचारधारा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणून राष्ट्रीय दृष्टिकोन रुजवण्याचे काम संघाने शतकभरात अविरत केले."
वीज निर्मितीच्या ग्रीडचा दाखला देत ते म्हणाले, "वीज निर्मितीचे स्रोत अनेक असले तरी ग्रीडमध्ये आल्यावर तिचे स्वरूप एकच होते. त्याचप्रमाणे विविध राज्यांतून, वेगवेगळ्या जाती-वर्गांतून आलेला स्वयंसेवक शाखेत आल्यावर सर्व भेद विसरून केवळ 'भारतीय' म्हणून एकत्र येतो." हडपसर आणि पूर्व पुण्यात मर्यादित असलेले संघाचे काम आज अत्यंत व्यापक झाले असून, हजारो कुटुंबे संघाशी जोडली गेल्याचे त्यांनी नमूद केले.
मनोज पोचट यांनी संघ शताब्दीनिमित्त समाजात 'पंच परिवर्तन' होणे आवश्यक असल्याचे सांगत सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्य या पंचसूत्रीची मांडणी केली. उत्तरार्धात प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्रा. महेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी हडपसर भागातील पत्रकार, वकील, प्राध्यापक, सोशल मीडिया प्रतिनिधींसह ६५ प्रबुद्ध नागरिक उपस्थित होते.
-----
- शाखा : व्यक्ती निर्माणाचे मुख्य केंद्र
"संघाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची 'शाखा' पद्धती होय. शाखा हे केवळ एकत्र येण्याचे ठिकाण नसून, देश आणि समाजाबद्दल प्रेम निर्माण करणारे 'व्यक्ती निर्माण' केंद्र आहे. या शाखेतून घडलेले स्वयंसेवक आज देशाच्या विविध क्षेत्रांत राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवून निस्वार्थपणे कार्य करत आहेत. समाजात एकोपा टिकवून ठेवण्यात या शाखांचे मोठे योगदान आहे," असे अजिंक्य कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
----------