चातुर्य, पराक्रम, निष्ठा, धाडस आणि गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा अचूक वापर या गुणांमुळे सरसेनापती संताजी घोरपडे यांनी आपले नाव इतिहासात अजरामर केले आहे. त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने...
- मोहन शेटे

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशहा औरंगझेबाशी प्रखर झुंज देणारे नरवीर म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे !
संताजीचे वडील म्हाळोजी घोरपडे शिवरायांच्या सेवेत होते. संताजीने तरुण असताना कोप्पळ आणि जालना मोहिमेत आपल्या पराक्रमाची चमक दाखवली होती. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तुंगभद्रा नदीपर्यंतच्या प्रदेशावर वर्चस्व स्थापन करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शाबासकी मिळवली होती.
छत्रपती संभाजीराजांवर संगमेश्वर येथे मोगलांचा छापा पडला तेव्हा छत्रपतींचे रक्षण करताना म्हाळोजी घोरपडे ठार झाले. संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येने संतप्त झालेल्या संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी तुळापूर येथील बादशहा औरंगझेबाच्या छावणीवरच हल्ला चढवला. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांत प्रत्यक्ष बादशहाच्या शामियान्याचे कळस कापून ज्वलंत मराठबाण्याचे उग्र प्रदर्शन त्यांनी घडविले होते.
संताजीने राजधानी रायगडला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकारखानावर अचानक हल्ला करून त्यांचे पाच हत्ती पळवले. संताजीच्या पराक्रमाने प्रसन्न झालेल्या छत्रपती राजाराम महाराजांनी संताजीला ‘ममलकतमदार’ (राज्याचा आधारस्तंभ) हा किताब दिला.
छत्रपती राजाराम महाराज तामिळनाडूमधील जिंजी येथे जात असताना बेदनूरची राणी चन्नम्मा हिने मदत केली. त्यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने राणी विरुद्ध जाननिसारखानास पाठवले. अशा वेळी संताजीने त्याचा धुव्वा उडवून बेदनूरच्या राणीचे रक्षण केले.
संताजीला कर्नाटकाऐवजी महाराष्ट्रात गुंतवून ठेवण्यासाठी औरंगजेबाने सर्जाखान या मातब्बर सरदाराला सातारच्या किल्ल्यावर पाठवले. पण तेथेही संताजीने प्रखर झुंज देऊन अखेर सर्जाखानालाच कैद केले. शेवटी एक लाख रुपये खंडणी घेऊन त्याची सुटका केली. मात्र आपल्या शौर्याचा मोगलांना हिसका दाखवला.

मोगलांच्या अनेक नामवंत सरदारांना संताजीने धूळ चारली. एका लढाईत तर तहव्वूरखान हा सरदार रणांगणावर प्रेतांमधे लपून बसला म्हणून त्यांचा जीव वाचला. छत्रपती राजाराम महाराजांनी संताजीला मराठी सेनेचे ‘सरसेनापती’ पद दिले. छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात आश्रयासाठी गेले असताना मोगलांनी तेथे वेढा घातला. तेव्हा संताजीने बाहेरून त्यांच्यावर हल्ले करून मोगलांना सळो की पळो करून सोडले.
संताजीने औरंगाबाद आणि बऱ्हाणपूर ही मोगलांची संपन्न शहरे लुटली. संतापलेल्या औरंगजेबाने संताजीला पकडण्यासाठी वंशपरंपरागत वतन, पंचहजारी मनसब, पन्नास हजार होन असे बक्षीस जाहीर केले.
अखेर औरंगजेबाने कासिमखानाच्या नेतृत्वाखाली अनेक सरदारांना एकत्र करून संताजी विरुद्ध मोहीम काढली. मात्र गनिमी काव्याच्या तंत्रात तरबेज असणाऱ्या संताजीने बेसावध शत्रू सैन्यावर तीन तुकड्यांसह अचानक आक्रमण केले व त्यांना चारी मुंड्या चित केले. कासिमखान व हिंमतखान ठार झाले.
संताजी-धनाजी या भीम-अर्जुनाच्या जोडीने दख्खन हिंदुस्थानात चालवलेल्या पराक्रमाच्या रणतांडवामुळे औरंगजेब रडकुंडीला आला. पण दुर्दैव या मराठी भूमीचे ! शिखर शिंगणापूर येथे संताजी स्नानासाठी आला असता एका मराठी सरदाराने त्याची हत्या केली.
एका इतिहासकाराने संताजीचे वर्णन ‘सर्वश्रेष्ठ सेनापती’ या शब्दात केले आहे. चातुर्य, पराक्रम, निष्ठा, धाडस आणि गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा अचूक वापर या गुणांमुळे सरसेनापती संताजी घोरपडे यांनी आपले नाव इतिहासात अजरामर केले आहे.
- मोहन शेटे
(लेखक इतिहास संशोधक, अभ्यासक, वक्ते आणि इतिहास प्रेमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
----
अतिशय चांगला लेख आहे.
Sambhaji salavi
19 Jun 2025 21:01