
पंढरपूर: "भारतीयत्व ही संकल्पना समाजात दृढ झाली, तर राष्ट्रीय सुरक्षा आपोआप निर्माण होईल. यासाठी प्रसार माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावावी," असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय तांबट यांनी व्यक्त केले. शेजारच्या देशातील राजकीय अस्थिरता पाहता, शब्दांचा शस्त्राप्रमाणे कसा वापर होतो हे लक्षात घेऊन माध्यमांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न जनतेसमोर आणणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
विश्व संवाद केंद्र, पुणे आणि विठाई बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अरिहंत पब्लिक स्कूल, पंढरपूर येथे झालेल्या माध्यम संवाद परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वेरीचे सचिव डॉ. बी. पी. रोंगे, अरिहंत पब्लिक स्कूलचे सचिव उज्वलभई दोशी, कार्यशाळा मार्गदर्शिका प्रांजली देशपांडे आणि माध्यम संवादचे नरेंद्र जोशी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या परिषदेत झालेल्या 'एआय (AI) कार्यशाळेत' प्रांजली देशपांडे यांनी पत्रिकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर कसा करावा, त्याचे फायदे-तोटे, शक्यता आणि विश्वासार्हता यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
या माध्यम परिषद व कार्यशाळेसाठी पंढरपूरसह माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा तालुक्यांतील बातमीदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत ॲड. महेश वाळुजकर, परिचय डॉ. सचिन लादे, प्रास्ताविक नरेंद्र जोशी, सूत्रसंचालन सोमनाथ गायकवाड यांनी केले, तर आभार स्वानंद कुलकर्णी यांनी मानले.
