सुभाष लोहे
1 day ago
पंढरीची वारी ; हिन्दू समाजाच्या एकात्मतेचे विराट दर्शन...

परमेश्वर भक्तीमधे तल्लीन होणे हा हिन्दू समाजाचा सहज स्वभाव आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, या समाजात कुठलेही सुधारणेचे कार्य करायचे असेल तर त्याच्या देवभक्तीवर टीका करू नका. देवभक्तीला माध्यम बनवून कार्य करा.खरोखर हिन्दू समाजाच्या एकात्मतेचा देवभक्तीत हा भक्कम आधार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अठरा पगड जातीमधील संतांना एकत्र करून आळंदी ते पंढरपूर वारी प्रारंभ केली.१३ व्या शतकात पंढरपुर क्षेत्री चंद्रभागेच्या वाळवंटात समाजाच्या एकात्मतेचे विराट दर्शन घडविले. सर्व पंथ, संप्रदायातील लोकांना एकत्र करून समरसतेचे मूल्य प्रस्थापित केले. बंधुभाव राष्ट्रजीवनाला मजबूत करीत असतो.विस्कळीत समाज आव्हाने पेलू शकत नाही. अशा मंडळींनी मध्ययुगीन कालखंडात भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला एकत्र ठेवले व मनोबल मजबूत केले. म्हणूनच राष्ट्र म्हणून हिन्दू समाज परकीयांशी संघर्ष करीत राहीला. ज्ञानोबा ते तुकोबा असा चारशे वर्षांचा प्रवाह अखंडपणे वारीच्या रूपाने या संतांनी प्रबळ केला, आणि आज आठशे वर्षे पूर्ण झाली असतांना संपूर्ण समाजजीवन "राम कृष्ण हरी" च्या गजरात धुंद झाले आहे.

देवगिरीचे व पाठोपाठ विजयनगरचे हिन्दू साम्राज्य कोसळल्यानंतर हतबल झालेल्या समाजाला संजीवनी देण्याचे कार्य संत मंडळींनी कले. सतराव्या शतकात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्य निर्माण कार्यात संत तुकाराम महाराज व रामदास स्वामी यांनी प्रचंड लोकशक्ती उभी केली. आज महाराष्ट्राच्या अनेक पवित्र स्थनांवरून दिंड्या पंढरपुरकडे निघालेल्या आहेत. "राम कृष्ण हरी" हा मंत्र सर्वांच्या मुखातून एका स्वरात गायला जात आहे. वारीतील पालखीचे पूजन व स्वागतासाठी हजारो स्त्रीपुरूष ठिकठिकाणी जमलेले असतात.एकुणच हे दृष्य भारावून टाकणारे असते. अध्यात्म हे भारताचे अधिष्ठान आहे. धर्म हा भारताचा प्राण आहे. धर्म सर्वांना जोडून ठेवतो. वारकरी संप्रदायाने आध्यात्मिक चेतनेचे निरंतर जागरण केले आहे. समरस व एकात्म हिन्दू समाजाचे विलोभनीय दर्शन या वारीमधून घडत आहे. गेली आठशे वर्षे ही साधना अखंडपणे सुरू आहे.
जय हरी विठ्ठल....
प्रा.सुभाष लोहे, आष्टी, जि.वर्धा
- सुभाष लोहे
Share With Friends
अभिप्राय
अभिप्राय लिहा