पुणे ः राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे फक्त समर्थक, हितचिंतक होऊ नका, स्वयंसेवक व्हा, असे आवाहन राष्ट्रीय स्वसंसेवक संघ जनकल्याण समितीचे प्रांत संघटन मंत्री पराग कंगले यांनी केले. पुणे महानगरातील कात्रज भागातील सुखसागर नगराच्या वतीने आयोजित केलेल्या विजयादशमीच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात केले.
सुखसागर नगर कात्रज भागातील शस्त्रपुजन समारंभात व्यासपीठावर (डावीकडून) पराग भालचंद्र कंगले (प्रांत संघटक मंत्री , रा.स्व.संघ जनकल्याण समिती ), संतोष कुंजीर (लघु उद्योजक आणि गायत्री इंडस्ट्रीजचे संस्थापक), शिवाजीराव मालेगावकर (कात्रज भाग संघचालक), शैलेश गोखले (सुखसागर नगर कार्यवाह)
कार्यक्रमाला व्यासपीठावर कात्रज भागाचे संघचालक श्री. शिवाजीराव मालेगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष कुंजीर (लघु उद्योजक आणि गायत्री इंडस्ट्रीजचे संस्थापक), शैलेश गोखले (सुखसागर नगर कार्यवाह) उपस्थित होते. कंगले म्हणाले, "आपल्या परंपरेत विजयादशमी हा उपासनेचा दिवस आहे, असुरी शक्तीवरती विजयाचा दिवस आहे. रामाचा रावणावर म्हणजेच नीतिचा अनीतिवर विजय आहे. पूजनीय डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी याच दिवशी संघाची स्थापना केली. याच दिवशी पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी बंधू भावाचा उद्घोष करणाऱ्या बौद्ध मताचा स्वीकार केला. हिंदू समाज हा या राष्ट्रातच नाही तर जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि योग्य नीति स्थापित करण्यात अढळ ध्रुव ताऱ्याप्रमाणे आहे. त्यासाठी जगाला नेतृत्व प्रदान करण्याची क्षमता आपल्या हिंदू समाजात आहे." संघाचे काम असे राष्ट्रीय विचार वाढवणाऱ्या स्वयंसेवकांचा समूह निर्माण करणे, हे कार्यकर्ते देशाच्या विविध क्षेत्रात जाऊन कर्तृत्व व नेतृत्व गाजवून या मातृभूमीला संपन्न करतील असे व्यक्तिनिर्माण करणे हे आहे. असे सक्षम नेतृत्व हिंदू समाजातून येण्यासाठी आधी आपला समाज हा पूर्णपणे निर्दोष आणि संघटित असावा, असे मत यावेळी त्यांनी मांडले.
संघाच्या शताब्दी वर्षातील पंचसुत्री
१. कुटुंब प्रबोधन
२. सामाजिक समरसता
३. स्व-बोध
४. पर्यावरण रक्षण आणि संवर्धन
५. नागरिक कर्तव्य
हे करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी एकत्र यायला हवे. समाज निर्दोष व संघटित होण्यासाठी, ही आपली सर्वांची जबाबदारी समजून नित्यनियमाने करण्याची गोष्ट आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात याचा समावेश अगदी सहजपणे करता येईल. आणि त्याचा परिणाम फक्त कौटुंबिक पातळीवर नव्हे तर भविष्यात सर्व जगाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल यात शंका नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष कुंजीर यांनी सुद्धा आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले. एकूण २८१ स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. शस्त्र पुजन कार्यक्रमाच्या सुरवातीला ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर उपस्थित स्वयंसेवकांनी प्रत्युत प्रचलनम्, व्यायाम योग, दंड क्रमिका, घोष आणि सांघिक गीत आदी शारीरिक प्रात्याक्षिके सादर केली.