•  23 May 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

स्वातंत्र्यलढ्यातील पराक्रमी वीरः राघोजी भांगरे

विश्व संवाद केंद्र - पुणे 21 days ago
व्यक्तिविशेष  

स्वातंत्र्यलढ्यातील पराक्रमी वीरः राघोजी भांगरे 


भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्या हजारो ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी भारतमातेच्या चरणावर जीवनपुष्प अर्पित केले, त्यापैकीच एक म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील देवगाव येथील राघोजी भांगरे.

राघोजी भांगरे यांचा इंग्रजांविरुद्धचा संघर्ष म्हणजे पराक्रमाची कहाणी आहे. जनजाती किंवा वनवासी आणि शहरवासी यांच्यात जाणीवपूर्वक भेद उत्पन्न करून देश तोडण्याचे कुटिल प्रयत्न सुरू असताना राघोजींसारख्या जनजाती योद्ध्याची कथा साऱ्यांसाठीच प्रेरणादायी ठरेल अशी आहे.

सन १८१८ साली शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला. पाठोपाठ इंग्रजांचा जुलुमी कारभार सुरू झाला. मराठी साम्राज्याच्या सैन्याला हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळी समाजाच्या परंपरागत अधिकारात  असलेल्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या, वतनदाऱ्या काढल्या. पुणे जिल्ह्यातील गडांवर राज्य करणाऱ्या महादेव कोळी समाजाच्या हक्कांवर इंग्रजांची गदा आली. हे सगळे गडकरी पेशव्यांशी, मराठी साम्राज्याशी एकनिष्ठ होते. रामजी भांगरे आणि गोविंद खाडे या दोघा किल्लेदारांनी इंग्रजांच्या या अन्यायाविरुद्ध उठाव करून इंग्रजांचे वर्चस्व झुगारले. भिवंडी, मालेगाव येथून सैन्य आणून इंग्रजांनी त्यांचा उठाव मोडून काढला.

या उठावात अग्रणी असलेल्या रामजी भांगरे यांचा मुलगा म्हणजे राघोजी. वडिलांची कीर्ती ऐकतच तो मोठा झाला. त्याचा जन्म ८ नोव्हेंबर १८०५ या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवगाव येथे झाला. राघोजींवर बालवयातच चांगले संस्कार व्हावेत यासाठी घरातील सर्वच मंडळी आवर्जून लक्ष देत होती. गावात शिक्षणाची सोय नव्हती. म्हणून राघोजींसाठी खास घरी शिक्षणाची सोय करण्यात आली होती. बालवयातच राघोजी तलवारबाजी, भालाफेक, बंदुकीने लक्ष्य साधणे, घोडेस्वारी याचे शिक्षण घेऊन तरबेज झाले होते. त्यांच्या अंगात धाडस होते. व्यायामाचीही आवड होती.

रोघाजींच्या अंगात वडिलांचे बळ आणि देशभक्ती पुरेपूर उतरलेली होती. पण संधी मिळेपर्यंत ते शांत होते. कोकणात एक दरोडा पडला आणि इंग्रजांनी रामजीच्या कुटुंबियांवर संशय घेतला. रामजीचे भाऊ, नातेवाईक, घरातल्या महिला अशा सगळ्यांना पकडून त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. हे कळल्यावर राघोजींची सहनशक्ती संपली आणि इंग्रजांविरुद्धच्या संघर्षाचा प्रारंभ झाला. सह्याद्रीचे साम्राज्य हातात घेण्यासाठी पराक्रमाची शर्थ सुरू झाली.

सैनिकांच्या तुकड्या, इंग्रजांची माघार - 
प्रथम राघोजींनी गावोगावी फिरून महादेव कोळ्यांची संघटना उभी केली. लढाईसाठी लागणारी शस्त्रे जमा केली आणि सैनिकांच्या तुकड्या स्थापन केल्या प्रत्येक तुकडीत ५० सैनिक अशा अनेक तुकड्या त्यांनी केल्या. प्रत्येक तुकडीला प्रमुख अधिकारी नेमण्यात आले होते. कोकणातील महाड पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत भाग ठरवून जबाबदाऱ्याही ठरवून देण्यात आल्या होत्या. हे सर्व झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे राज्य घोषित केले. इंग्रजांवर हल्ले, पोलिसांवर हल्ले, सावकारांचे खजिने लुटणे, फितुरांवर हल्ले असे धाडसी कार्य राघोजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. त्याचा परिणाम म्हणून इंग्रजांना पुण्याला पळून जाणे भाग पडले.

हरिश्चंद्र गडावरील शंकराचे, त्र्यंबकेश्वराचे, जेजुरीच्या खंडोबाचे आणि पंढरपूरच्या विठोबाचे राघोजी भांगरे भक्त होते. सामान्य जनतेवर ते प्रेम करणारे होते आणि म्हणूनच सर्वांचे त्यांच्यावर प्रेम होते. राघोजी स्त्रियांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानणारे होते. त्यांना अटकाव करण्यासाठी आणि पकडण्यासाठी इंग्रजांनी मोहीम सुरू केली आणि त्यांचा सर्वत्र शोध सुरू झाला. सर्वसामान्य प्रजा राघोजींवर प्रेम करत होती. साऱ्या जनतेचे त्यांना सहकार्य होते. त्यामुळे ते इंग्रजांना सहजी सापडत नव्हते. 

इंग्रज कॅप्टन म्याकिंतोष याला त्यांनी आव्हान दिले आणि जुन्नर येथे त्याच्याशी युद्ध केले. या युद्धात राघोजींच्या सैन्याने इंग्रजांचे अतोनात नुकसान केले. परंतु इंग्रजांनी अधिक व्यवस्थापन कौशल्य दाखवले. लढाईत दोन्ही बाजू दमलेल्या असताना बाजूला विश्रांती घेत असलेले ताज्या दमाचे सैन्य त्यांनी रणांगणात आणले आणि राघोजींना माघार घ्यावी लागली. नवे सैन्य उभारणे, शस्त्रे जमवणे सुरूच होते. परंतु इंग्रज वरचढ होत गेले. राघोजींच्या सैनिकांची घरे जाळणे, गावे उद्ध्वस्त करणे असे प्रकार इंग्रजांनी सुरू केले. राघोजींची इंग्रजांशी लढाई सुरू असतानाच ते कधी हरिश्चंद्र गडावर महादेवाच्या दर्शनाला जात असत. कधी भीमाशंकरला जात असत. त्र्यंबकला आणि नाशिकला रामकुंडात स्नान करीत असत. जेजुरीला जात. अशी युद्धजन्य परिस्थिती असतानाच राघोजी वेष पालटून  पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला गेले.

२ जानेवारी १८४८ या दिवशी चंद्रभागेत स्नान करून विठोबाचे दर्शन घेऊन ते पुन्हा वाळवंटात आले. साध्या वेशातील सैनिक त्यांच्या मागावर होते. वाळवंटात त्यांनी निःशस्त्र राघोजींना पकडले. नंतर त्यांना पुणे मार्गे ठाण्याला नेऊन आणि एकतर्फी खटला चालवून ठाण्याच्या तुरुंगात २ मे १८४८ रोजी फाशी दिले. हा सह्याद्रीचा पराक्रमी वाघ स्वातंत्र्यासाठी आणि देशासाठी फासावर चढला, पण राघोजी भांगरे यांचे बलिदान वाया गेले नाही. सह्याद्री कधीही इंग्रजांच्या दबावाखाली शांत बसला नाही. 

संस्कृती टिकवून ठेवणारा समाज
भारतीय जनतेने देश स्वतंत्र होईपर्यंत विविध मार्गांनी लढाई आणि संघर्ष सुरूच ठेवला. महादेव कोळी समाज आजही देशभक्त, धर्मनिष्ठच आहे. ख्रिश्चनांनी आटोकाट प्रयत्न करूनही तो स्वतःचा हिंदू धर्म टिकवून आहे. हा समाज हिंदू धर्मापासून दूर गेलेला नाही. ‘आम्ही सारे एक आहोत’ हा भाव देशातील जनजाती समाजाने टिकवून ठेवला आहे. वनवासी बांधव या देशातील सनातन संस्कृतीचेच वाहक आहेत. ही संस्कृती त्यांनी टिकवून ठेवली आहे. ते परिश्रमी आणि सन्मार्गाने जगणारे आहेत. शौर्य आणि स्वाभिमान ही त्यांची विशिष्ट ओळख आहे. एका दिव्य आणि आदर्श समाजाचे दर्शन म्हणजेच वनवासी बांधवांचे दर्शन.

कावेबाजपणा ओळखायला हवा
राष्ट्रीय संघर्षातही वनवासी बांधवच सदैव अग्रणी राहिले आहेत. इंग्रजांची शक्ती वाढू लागल्यानंतर एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी इंग्रजांनी संपूर्ण भारतावर कब्जा मिळवला. मात्र यावेळी त्यांना सर्वात मोठा संघर्ष जनजातींशीच करावा लागला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओडिशा किंवा केरळ असेल किंवा नागालँड, आसाम, मेघालय वा अरुणाचल असेल. येथेच इंग्रजांना मोठा संघर्ष करावा लागला, हे लक्षात घ्यावे लागेल आणि हा संघर्ष जनजाती बांधवांनी केला होता. जनजातींचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान राहिले आहे. जनजाती विरुद्ध शहरवासी हा संघर्ष आज हेतूतः निर्माण केला जात आहे. इंग्रजांनीही हेच केले होते. दोघांमध्ये हा संघर्ष निर्माण करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याची ही खेळी आहे. हा कावेबाजपणा समजून घेणे ही गरज आणि आवश्यकता आहे.

 - युवराज लांडे 
(लेखक सामाजिक कार्यकर्ते असून ‘जनजाती कल्याण आश्रमा’च्या पश्चिम क्षेत्राचे सह हितरक्षा प्रमुख आहेत.)
 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • क्रांतिवीर
  • राघोजी भांगरे
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (34), सामाजिक (72), माध्यमे (15), रा. स्व. संघ आणि परिवार (23), संस्कृती (22), जनजाती (7), महिला (9), उद्योग (2), शिक्षण (9), विज्ञान (4), हिंदुत्व (20), कम्युनिझम (2), राष्ट्रीय संरक्षण (9), इस्लाम (8), कला (2), राजकारण (5), सेवा (8), साहित्य (2), कृषी (1), पर्यावरण (4), क्रीडा (2), ख्रिस्ती पंथ (2),

दिनविशेष

trending

स्मरण देवर्षी नारदांचे ! समाजहितैषी संज्ञापक तत्त्वांचे !!

स्मरण देवर्षी नारदांचे ! समाजहितैषी संज्ञापक तत्त्वांचे !! - देवर्षी नारद हे...
विद्याधर ताठे 10 दिवसांपूर्वी

 दिन विशेष
Read more

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.