

सेवा सहयोग फाऊंडेशनची पर्यावरण रक्षण चळवळ
पाणी
सेवा सहयोग फाऊंडेशन संस्थेअंतर्गत चाळीसगाव तालुक्यात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाची सुरुवात सहा वर्षापूर्वी करण्यात आली. ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत पाणी या विषयाला धरून सर्व प्रथम कामाला सुरुवात झाली. खरेतर शिक्षण हा मूळ उद्देश होता. परंतु मुलांचं सतत शाळेत गैरहजर असण्याचे मुख्य कारण होत पालकांचे स्थलांतर. रोजगारासाठी हे स्थलांतर होत होते. रोजगार उपलब्ध करुन द्यायचा असेल तर त्यासाठी मुख्य साधन शेती होती.शेती करायची असेल तर पाण्याची गरज होती. मुळात खानदेश हा कोरडवाहू भाग किंवा दुष्काळी पट्टा आहे. जर विद्यार्थ्यांना शाळेत आणायचं असेल तर पालकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल. यासाठी शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन दिले पाहिजे. म्हणून २०१७ पासून सेवा सहयोग फाऊंडेशन अंतर्गत पाणी या विषयावर कामाला सुरुवात झाली.
"एक गाव एक तलाव"
चाळीसगाव तालुक्यातील जवळपास ४१ गावांमध्ये पाण्याची चळवळ पोहचवली आहे. यामाध्यमातून आठशे कोटी लिटर जलसाठा निर्माण करण्यात आला आहे. यामध्ये "एक गाव एक तलाव" ही मूळ संकल्पना राबविण्यात आली. ज्यात २१ गावांमध्ये २६ तलाव पुनर्जीवित करण्याचे काम करण्यात आले. पाण्यावर चालू झालेली ही चळवळ पूर्णपणे लोकसहभागातून चाललेली चळवळ आहे. भुजल अभियान ही लोकसहभागातून चाललेली चळवळ सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत सुरु केली. या चळवळीचा उद्देश वारकरी संप्रदायाच्या विचारांवर आधारित आहे. ज्याप्रमाणे वारकरी दरवर्षी वारीला देहू,आळंदी येथून सुरूवात करतात आणि माऊली,तुकोबा नावाच्या जयघोषाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे वाटचाल करत असतात,त्याच प्रमाणे गावागावात भूजल वारकरी तयार व्हावेत. ज्यातून पाण्याचा प्रत्येक थेंब अन थेंब जमिनीत जिरावा,पाणी वाहून जाणार नाही यासाठी प्रयत्न करावा आणि पर्यावरण सरंक्षण व्हावे यासाठी प्रयत्न करावा म्हणून भूजल वारकरी कार्यकर्ता तयार व्हावा यासाठी भूजल अभियानाची चळवळ सुरु झाली. या चळवळीत लोकसहभागाशिवाय कुठलेही काम केले जात नाही.
वृक्षदिंडी
पाण्यासोबतच वृक्षसंवर्धनाचे काम सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु आहे. ज्यात चाळीसगाव तालुक्यात साधारणतः तीस हजार झाडांचे संवर्धन करण्याचे काम "वृक्षदिंडी" या उपक्रमांतर्गत सुरु आहे.या अंतर्गत शेतकरी पती- पत्नी जोडप्यांना पाच फळझाडे देऊन लोकसहभागातून लागवड केली जाते.
यासोबतच ब्राम्हणशेवगे येथे निसर्गटेकडी प्रकल्प हा माळरानावर साकारण्यात येत आहे. या ठिकाणी २५ हेक्टर ओसाड व पडीक क्षेत्रावर २५ हजार झाडांचे वृक्षसंवर्धन करण्यात येत आहे.
जलसंधारणाच्या कामामध्ये सि.सि.टि.डिप सि.सि.टि.,गॅबियन बंधारे, नाला खोलीकरण,रुंदीकरण,बांधबंदिस्ती आदि कामे शेतकरी सहभागातून पाणी समिती करुन घेतात.
या कामांची दखल विविध स्थरावर घेण्यात येत आहे. युनायटेड नेशन हाय लेव्हल फोरममध्ये मागिल वर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याबाबत निवेदन करण्याची संधी मिळाली होती. तसेच दिल्ली येथे जनशक्ती मंत्रालयाने जलप्रहरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
सत्तर गावांपर्यंत चळवळ
सध्या हे काम चाळीसगाव तालुक्याबरोबरच धुळे,रायगड,परभणी, लातूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सुरु झाले आहे. या कामांसाठी विविध सामाजिक संस्था आणि सी.एस.आर मदत होत आहे. पाण्यापासून सुरु झालेले हे काम आता महिला सक्षमीकरण या विषयावर देखील सुरु झाले आहे. या अंतर्गत अडचशे महिलांना प्रशिक्षण व रोजगार देऊन सक्षम करण्याचे काम सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत सुरु आहे.
शेतकऱ्यांना शेती कशी करावी.जमिनीची धूप कशी थांबवावी. नैसर्गिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण फाट्यावर सुसज्ज कार्यालय असून या ठिकाणी ३ कार्यकर्ते पूर्णवेळ काम पाहतात. पुण्यात ग्रामोदय चळवळीत ६ कार्यकर्ते काम बघतात.
या माध्यमातून सत्तर गावांपर्यंत चळवळ पोहचली आहे.
गुणवंत सोनावणे