नारी ते नारायणी : भारताचा शक्तिशाली शंखनाद

नुकतीच दिल्ली येथील विज्ञान भवनात पार पडलेली 'भारती - नारी ते नारायणी' ही राष्ट्रीय परिषद आधुनिक भारताच्या जडणघडणीत महिलांच्या केंद्रस्थानाचा एक शक्तिशाली हुंकार ठरली. देशभरातील १५०० हून अधिक महिलांची उपस्थिती, विविध प्रांतांतील वेशभूषा आणि भाषांचा संगम यामुळे हे व्यासपीठ 'मिले सूर मेरा तुम्हारा' चा प्रत्यय देणारे ठरले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आणि राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्या उपस्थितीत पार पडलेले हे वैचारिक मंथन स्त्रीच्या सर्वांगीण भूमिकेच्या अधिष्ठानाचा शोध घेणारे होते. 'भारती - नारी ते नारायणी' 'भारतीय विद्वत परिषद' आणि 'राष्ट्र सेविका समिती - शरण्या' यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
भारतीय संस्कृतीत 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' असे म्हटले जाते. मात्र, आजचा भारत, स्त्रीला 'नारायणी' म्हणजेच सृजन आणि सत्तेचे अधिष्ठान मानून तिच्या नेतृत्वाखाली प्रगतीची शिखरे सर करत आहे. भारतीय स्त्री आपल्या सांस्कृतिक मुळांशी घट्ट जोडलेली राहून भविष्यातील तंत्रज्ञानावर हुकूमत गाजवत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ महिला आणि ग्रामीण भागातील 'ड्रोन दीदी' एकाच व्यासपीठावर या परिषदेत दिसून आल्या.
परिषदेची 'अष्टभुजा नारायणी' ही संकल्पना होती. देवीच्या अष्टभुजा ज्याप्रमाणे विविध शस्त्रांनी आणि आशीर्वादाने सज्ज असतात, त्याचप्रमाणे आजची भारतीय स्त्री विविध आठ गुणांच्या सामर्थ्याने राष्ट्राला दिशा देत आहे. विद्या(शक्ती म्हणून ज्ञान), मुक्ती(स्व-मुक्ती), चेतना (स्त्रीशक्तीचाजागर), शक्ती(आत्मनिर्भरता), संस्कृती(मुळांचे सक्षमीकरण), प्रकृती (निसर्ग ते संगोपन), सिद्धी(यशोगाथा) आणि कृती (कार्ययोजना) या विषयावर परिषदेत पार पडलेले विविध परिसंवाद हे या अष्टभुजांच्या प्रवासाचे टप्पे होते.
शिक्षण, अध्यात्म, राजकारण, प्रशासन, उद्योजकता, संस्कृती, आरोग्य आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील महिला विचारवंत यात सहभागी झाले होते. प्रख्यात कुलगुरू, संसद सदस्य, शास्त्रज्ञ, क्रीडापटू, आदरणीय साध्वी आणि विविध परंपरांतील आध्यात्मिक नेत्या, विदुषी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी या अधिवेशनात आपले सखोल विचार आणि अनुभव मांडले.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, अनुजा अहुजा, साध्वी ऋतंभरा डॉ. मनीषा कोठेकर, प्रा. निरजा गुप्ता, ॲड. क्षमा नाडगुंड, प्रा. श्रीनिवास वारखेडी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, समितीच्या कार्यवाहिका सीताक्का, लक्ष्मीपुरी, रेवा सूद, मृदुला प्रधान, डॉ. रूपा रावल, भरतनाट्यम विशारद डॉ. संध्या पुरेच्या, पंजाब केसरीच्या संचालक किरण चोप्रा, खासदार राकेश सिन्हा, डॉ.तेजस्विनी कुमार, मोनिका अरोरा, अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावेळी परिसंवादात सहभाग घेतला.
किरण चोप्रा यांनी माध्यम केवळ समाजाचा आरसा नसून समाज घडविण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. आजच्या 'रील' संस्कृतीत सत्याची पारख करणे आवश्यक असून, महिलांनी माहितीच्या महापुरात विवेक टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे मत मांडले.
राकेश सिन्हा यांनी भारतीय संस्कृती प्रकृतीशी जोडलेला धागा सांगत आधुनिक तंत्रज्ञान शिकणे म्हणजे प्रगती नव्हे, तर प्रगतीला परंपरेची आणि संस्कारांची जोड देणे कसे महत्त्वाचे आहे, याची मांडणी केली. डॉ. संध्या पुरेचा आणि डॉ. मनीषा कोठेकर यांनी भारतीय स्त्री प्राचीन वारसा आणि आधुनिक जग यांचा सुवर्णमध्य साधण्यात यशस्वी ठरली आहे, असा विश्वास व्यक्त केला.
या परिषदेने 'स्व'ची जाणीव करून देत भारतीय स्त्री ही केवळ 'घर सांभाळणारी' व्यक्ती नसून ती 'राष्ट्रनिर्माती' आहे, हा आत्मविश्वास जागा केला. करिअर आणि कौटुंबिक मूल्ये यांचा योग्य समतोल साधण्याचे मार्गदर्शन महिलांना मिळाले. आपण महान संस्कृतीचे वारसदार आहोत या भावनेतून महिलांचा स्वाभिमान जागृत झाला.
सोशल मीडियाचा प्रभाव आणि नकारात्मकता यावर नियंत्रण मिळवण्याचे भान परिषदेतून मिळाले. विज्ञानाची कास धरताना भारतीयत्वाचा त्याग करण्याची गरज नाही, उलट तीच आपली शक्ती आहे, ही जाणीव दृढ झाली.
परिषदेने महिला विचारवंतांना स्वावलंबन आणि सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. महिलांच्या यशाचा उत्सव आणि 'उद्याचा भारत' घडविण्यासाठी ही परिषद महिलांच्या नेतृत्वाखालील सर्वसमावेशक विकास आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणारी ठरली.
स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून एकाच रथाची दोन चाके आहेत. स्त्री ही राष्ट्राला ऐश्वर्य मिळवून देणारी मुख्य शक्ती आहे, हा विचार येथे पुनःप्रस्थापित झाला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत केवळ जमिनीचा तुकडा नसून हे एक 'जिवंत राष्ट्र' आहे आणि त्याच्या प्रगतीसाठी स्त्रीमधील 'नारायणी' तत्त्व जागृत होणे अनिवार्य आहे. स्त्रिया केवळ समाजाचा पायाच नाहीत, तर राष्ट्राच्या भविष्याच्या निर्मात्याही आहेत. 'नारी टू नारायणी' ही परिषद म्हणजे २०४७ च्या विकसित भारताचा संकल्प आहे, जिथे नारी ही राष्ट्राची खऱ्या अर्थाने 'महाशक्ती' असेल. असे प्रतिपादन समारोपाप्रसंगी केले.
राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी महिलांनी समाजाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा स्वीकार करावा. आपण आपली क्षमता वाढवली की सन्मान आपोआप मिळतो. आपले वर्तन समाजाने आपल्याला साथ देण्यासाठी प्रेरित करणारे असावे आणि त्या आधारावर आपण समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले पाहिजे, अशी भावना अधोरेखित केली.
"विज्ञानाने पंख पसरा, पण संस्कृतीने पाय जमिनीवर ठेवा," हाच या परिषदेचा मूलमंत्र होता. स्त्रीने विज्ञान शिकावे, निर्भीड पत्रकार व्हावे, कलेतून संस्कृती जपावी, परंतु हे सर्व करताना स्वतःमधील 'भारतीयत्व' अधिक प्रखर करावे, हाच या राष्ट्रीय परिषदेचा शंखनाद आहे.
अंजली तागडे
संपादक विश्व संवाद केंद्र, पुणे