कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ‘कमवा व शिका’ कानमंत्र!
विद्यार्थ्याला महाविद्यालयात, विद्यापीठात शिक्षणासह, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता, श्रम संस्कारांचे महत्त्व कळावे, यासाठी कमवा व शिका योजनेचा प्रारंभ झाला. पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवाहारीक ज्ञान मिळणं अत्यंत गरजेचं असतं, या विचारातून तसंच आर्थिक दुर्बल घटकांना उत्तम प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः शिकत कमवावं हा पायंडा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पाडला, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन मार्गी लागले…
- सायली क्षीरसागर- कोकीळ
आताच्या शहरात वाढलेल्या पिढीला कमवा व शिका योजनेबद्दल अप्रुप वाटणं कमी झालं असेल, किंवा आता ही योजना सगळीकडे सुरू आहे की नाही ही शंका आहे, मात्र ज्यांनी कमवा व शिका योजनेत भाग घेतला आणि खरंच त्यांचं आयुष्य सार्थकी लागलं असे लोक आजही या योजनेच्या ऋणात आहेत. घरची परिस्थिती कशीही असली तरी आपल्या कष्टाने कमावलेला पैसा हा अधिक आनंद देतो. यामुळे एक प्रकारे जबाबदारी घेण्याची सवय लागते.
‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’ हा भाऊरावांचा मंत्र होता. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा आणि शिका’ ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांच्या या सर्व कार्यावरून लक्षात येते की विद्यार्थ्यांबद्दलची त्यांची ओढ, आपुलकी, त्यांनी मोठं होऊन नाव कमवावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं असं त्यांना नेहमी वाटे! त्यांच्या या महान शैक्षणिक कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना “कर्मवीर’ ही पदवी दिली, कृतिशील राजा असाच त्याचा अर्थ आहे.
भाऊरावांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका जैन कुटूंबात झाला. त्यांचे वडिल इस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या रूपात शिक्षणाचं रोप लावलं आणि आज ते वटवृक्षात रूपांतरीत झालंय. महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. आज ९ मे, भाऊरावांचा स्मृतिदिन… आजही त्यांचा शिक्षणरूपी वारसा सुरू आहे आणि तो असाच अखंडपणे सुरू राहो हेच त्यांना अभिवादन!