????जागर दिव्यदुर्गांचा????
कुटुंबाच्या प्रेरणेतून दिव्यांगावर मात करणाऱ्या उमाताई
कुटुंबियांचा भक्कम आधार असेल तर, कोणतीही कमतरता भरून यायला एक मोठी सपोर्ट सिस्टीम पाठीशी आहे. हा विश्वासच शारिरीक उणीवा बोथट करतो. याचा जीवनात पदोपदी प्रत्यय आला. उमाताई आपल्या वाटचालीविषयी भूतकाळापासून डोकावत आपली जीवनकहाणी सांगत होत्या.
"पहिलं म्हणजे देव, त्यानंतर माहेरची मंडळी आणि लग्न झाल्यानंतर सासरचे कुटुंब आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या मैत्रिणी यांनी मला दिव्यांग असल्याची जाणिव कधीच होऊ दिली आहे. असंख्य अडचणी आणि आव्हाने आली पण त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे त्यावर मी सहज मात करू शकले. माझ्या सकारात्मकतेचा खरा स्त्रोत हाच आहे", अशी भावना उमा प्रसन्न मुळे यांनी व्यक्त केली.
पुण्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या उमाताई सध्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) येथे सहाय्यक पदावर कार्यरत आहे. १९९१ पासून याच ठिकाणी त्या कार्यरत आहेत. आई-वडील, नातेवाईकांसह मैत्रिणींनी विशेष प्रेम केल्याचे त्या सांगतात. गुजराती माध्यमाच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. रोज शाळेत येण्याजाण्यासाठी त्यांना वडीलांचा आधार असायचा. आपण सरकारी नोकरी करायची, हे त्यांनी पक्के ठरवले होते. म्हणूनच मिळालेल्या मोकळ्या वेळेत त्यांनी अभ्यास चालू ठेवला. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. तसेच डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉचेही शिक्षण घेतले. पण याचवेळी त्यांच्या जीवनात मोठा टर्निंग पॉईंट आला. त्यांच्या भावाने नोकरीची जाहीरात पाहिली. स्वतः अर्ज केला आणि उमाताई यांना एलआयसीमध्ये नोकरी मिळाली. मैत्रिणींचे वलय नोकरीतही कायम राहिले. एलआयसीबद्दल भावना व्यक्त करताना त्या म्हणतात, "माझ्या कार्यालयातील स्टाफ सहकारी वृत्तीचा आहे.
एक जीवनसाथी म्हणून प्रत्येक आव्हानात पतींनी एक पाऊल पुढे येत उमाताई यांना साथ दिली आहे. पोलिओ असला काय किंवा अजून काही न्यूनता असली तरी समजून घेणारी माणसे आजच्या काळातही आहेत याचा अभिमान आहे. दिव्यांग असले तरी सासरच्या मंडळींनी मला आनंदाने स्विकारले. नणंदांसह कुटुंबीय माझ्या पाठीशी उभे राहिले. संसारातील असंख्य अडचणी त्यांच्या सर्वांच्या साथीने लीलया पार केल्या." उभयंतांची दत्तक घेतलेली मुलगी आता २४ वर्षांची आहे. कायद्याचे शिक्षण तिने घेतले आहे. पती आणि मुलीमुळे जीवन सुसह्य आणि समृद्ध झाल्याची भावना उमाताई यांनी व्यक्त केली.
- अर्पित होऊन जावे...
उमाताई यांना वैयक्तिक आयुष्यात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. आपल्यासारख्या इतरांनाही या अडचणी येऊ नयेत म्हणून त्या मदतीस सदैव तत्पर असतात. निवृत्तीनंतर अशा कार्याला अधिक वाहून घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. होतकरूंना वस्तूच्या स्वरूपात मदत करण्याबरोबरच लहान मुलांसाठी विशेष काही करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुलांना जीवनशिक्षण द्यावे, यासाठी वेळ देण्याचा त्यांचा मानस आहे.अर्पित होऊन जगण्याची त्यांची मनिषा पूर्ण होवो याच सदिच्छा.
सम्राट कदम