धन्य झालो हो संसारी । आम्ही देखीली पंढरी ।।
चंद्रभागे करू स्नान । पुंडलीकाचे दर्शन ।।
करू क्षेत्र प्रदक्षिणा । भेटू संत या सज्जना ।।
उभे राहु गरूडापाशी ।डोळे भरूनी पाहो हरी ।।
तुका म्हणे वाळवंटी । महालाभ फुकासाठी ।।
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक साधना म्हणजे वारी. पायी वाटचाल करीत देवाचे भजन करत चालत परमात्म्याकडे जायचे. त्यांचे दर्शन घ्यायचे क्षीण भाग घालवायचा. मन शुद्धीसाठी चंद्रभागेमध्ये अंघोळ करायची. कायिक, वाचिक, मानसिक संसर्ग नाहीसा करणे, विशुद्ध जाणतेपण निर्माण होणे, यालाच तर चंद्रभागेचे स्नान, शाही स्नान म्हणतात. क्षेत्र प्रदक्षिणा घालायची म्हणजे आत्मानुभवाचे आवर्तन करायचे, संतसज्जनाच्या भेटी घेऊन सुसंवाद साधायचा, आपणच आपल्यातला शोध घ्यायचा, पांडुरंगाला डोळे भरून पाहायचे भक्तियोग अनुभवायचा. हा असतो वारीतला अनुभव. संप्रदायातील ही भक्ती म्हणजेच खरे तर सामाजिक शक्ती असते. भक्तीचा हा महाकुंभ असतो. वारीमध्ये ना स्री पुरुष भेद असतो, ना गरीब-श्रीमंत भेद असतो. ना लहान-थोर भेद असतो. ना जाती-पातीची दरी असते. ना इथे निमंत्रण दिले जाते. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत सर्वांनी मिळून ध्येयापर्यंत पोहोचणे हा एकच भाव लाखो वारकऱ्यांच्या मनात असतो. असाच सामाजिक शक्तींचा महाकुंभ यंदा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये अनुभवायला मिळाला.
कुंभाचा अमृतयोग
महाराष्ट्रातील वारीचे स्वरूप जसे बदलत चालले. अगदी तसेच कुंभमेळ्याबाबतीत बदलले स्वरूप पाहायला मिळाले. कुंभमेळा म्हणजे साधूदर्शन असे आजपर्यंतचे चित्र होते. त्यामुळे दर १२ वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यात सर्व जातात असे नाही. पण यावर्षी प्रयागराज येथील १४४ वर्षानंतर येणारा महाकुंभमेळा हा भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि धार्मिकता नव्याने जगापुढे मांडणारा एक ऐतिहासिक सोहळा होता. या कुंभमेळ्याचे अवघ्या विश्वाला कोडे पडले होते. त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेकांनी यंदा कुंभमेळ्याला भेट दिली. सहा महिन्यांपासून शाही तयारी सुरू होती. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांतील लोक एकत्र आले आणि सामाजिक समरसतेचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेशाच्या भेदाभेदांवर मात करत कुंभमेळा एकतेचे प्रतीक ठरला.
भारतीय संस्कृतीचे प्रतीक
भारतात धार्मिक आणि आध्यात्मिकतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयागराज येथील महाकुंभमेळा हा केवळ धार्मिक मेळा नसून, तो भारतीय संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा पुढील हजारो वर्ष टिकेल याची प्रत्यक्ष प्रचिती पाहायला मिळाली. कुंभमेळ्याने समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एका वैशिष्ट्य समानस्तरावर आणले. ही क्रांतीच म्हणावी लागेल. तेथे केलेल्या अतिउच्च दर्जाच्या नियोजनासाठी आदित्यनाथ सरकारला देईल इतके धन्यवाद कमीच आहे. विक्रमी गर्दीमुळे भाविकांना सुखसुविधा अडचणी सगळ्याचा अनुभव घ्यायची संधी मिळाली. झालेला त्रास पण लोकांना आनंदाची अनुभूती देऊन गेला. लोकांची संख्या पाहून तेथे येणाऱ्या भाविकांकडून तक्रार करण्याचे धाडस होत नव्हते. प्रयागराजमधील संख्या कोणत्याच यंत्रणेने परिपूर्ण सुविधायुक्त करणे अशक्य होते.
आस्थेची डुबकी
महाराष्ट्रातील लोकांना विठुरायाच्या भेटीसाठी जाताना सर्व अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा सामना करायची सवय असते. एकदा का मंदिराचा कळस पाहिला की भाग गेला शीण गेला, अशी अवस्था होते. अगदी तसाच अनुभव कुंभमेळ्याला जाताना अनुभवायला मिळाला. त्रिवेणी संगमावर आस्थेची डुबकी मारुन शीण भाग गेल्याचा अनुभव आला. लहान बाळांपासून ते अगदी वयस्कर लोक, तरुण-तरुणी या डुबकीचा आनंद घेण्यात स्वतः ला धन्य मानत होते. भेदाभेद तर इथे पार संपून गेले होते. एकप्रकारे मी तर म्हणेन इथे वासनेचे अस्तित्वच संपले होते. स्वतःच्या आनंदात गंगा, जमुना,
सरस्वतीच्या त्या पावन तीर्थात स्वतःलाही पावन करून घेत होते. गंगेत अंघोळ केल्याने पाप धुतली जातात, असे म्हटले जाते. पण त्या पाण्याने मन मात्र निश्चित निर्मळ होते, याचा अनुभव आला.
त्रिवेणी संगमाचे दर्शन
कुंभमेळ्याचा उगम समुद्र मंथनाशी जोडला जातो. देवता आणि दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन केले. अमृतकुंभ मिळताच त्यावर ताबा मिळविण्यासाठी देव-दानवांमध्ये युद्ध झाले. या युद्धादरम्यान अमृताचे काही थेंब चार ठिकाणी पडले. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. त्यामुळे येथे दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. प्रयागराज येथील कुंभ विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचा संगम आहे.
विषमता हरपली
भारतीय समाजात जातिव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. काही प्रमाणात अजूनही आहे. मात्र, कुंभमेळ्यात सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र येऊन एकाच ठिकाणी स्नान करत होते. साधूंना भोजन देत होते, मनोभावे त्यांचे दर्शन करत होते .. जीवनशैली निरीक्षण करत ह़ोते.. येथे कोणताही भेदभाव दिसला नाही, त्यामुळे जातिव्यवस्थेचे निर्मूलन करणारा कुंभमेळा म्हटले तर वावगे ठरणार नाही. कुंभमेळ्यात केवळ हिंदू धर्मातील लोकच नव्हे, सर्व जातीचे, सर्व संप्रदायाचे लोकही सहभागी झालेले दिसले. येथे शैव, वैष्णव, नागा साधू, अघोरी, दशनामी संन्यासी यांच्यासह अनेक संप्रदाय एकत्र दिसले. भारत हा विविध भाषा बोलणाऱ्या लोकांचा देश आहे. महाकुंभमेळ्यात निरनिराळ्या भाषा एकत्र आल्या, संवाद साधला गेला, त्यावेळी खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता निर्माण झाली असे वाटले. त्यातून प्रादेशिक भिंतीही एकरूप झाल्या. महिलाही आघाडीवर होत्या. अनेक महिला संत आणि साध्वी याठिकाणी प्रवचन देत होत्या आणि विविध आध्यात्मिक चर्चासत्रांमध्ये भाग घेताना दिसल्या .परदेशी साधूंची उपस्थिती लक्षणीय होती. आस्थेच्या डुबकीसाठी कुंभमेळ्यात श्रीमंत आणि गरीब दोघांनाही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. येणाऱ्या प्रत्येकाने आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आनंद मिळविला. म्हणजेच आहे त्या स्थितीत स्वतःला बदलण्याची क्षमताच कुंभमेळ्याने दिली. कुंभमेळा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ बनला आहे. परदेशी पर्यटक येथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आले. यामुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर अधिक प्रभावी झाली.
सोशल मीडियाचा प्रभाव
आधुनिक काळात सोशल मीडिया, टीव्ही आणि वृत्तपत्रे यांमधून कुंभमेळ्याचा प्रचार मोठ्या प्रमाणावर झाला. ऑनलाइन माध्यमांमुळे विविध ठिकाणच्या लोकांना कुंभमेळ्याची माहिती मिळाली. लोक एकमेकांना जोडली गेली. त्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर धर्मादाय संस्था आणि स्वयंसेवी संस्थानी गरीब आणि गरजूंसाठी आरोग्यसेवा, मोफत अन्नछत्र, शिबिरे आणि शिक्षणाचे उपक्रम राबवले. त्यामुळे सामाजिक सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत्या, कोटींचा जनसमुदाय असताना स्वच्छ सुंदर प्रयाग अन् भिकाऱ्यांचे नसलेले अस्तित्व पाहून मन प्रसन्न झाले. आर्थिक विषमतेची भावना संपली. महाकुंभमेळ्यात भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. प्रयागराज येथील महाकुंभमेळा हा केवळ धार्मिक विधींचा उत्सव नसून तो सामाजिक समरसतेचे उत्तम उदाहरण ठरला.
साधूंची संयमता
कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंना पहाण्यासाठी कमालीची उत्सुकता असते. त्यात निरनिराळे आखाडे असतात. कुंभमेळ्यातील प्रमुख आखाडे हिंदू धर्मातील साधू-संतांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहेत. हे आखाडे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक आखाड्याचे वेगळे धार्मिक महत्त्व व भूमिका असते. प्रमुख आखाड्यांमध्ये जुना आखाडा, अवहान आखाडा, निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, आतल आखाडा, अग्नी आखाडा हे शैव आखाडे आहेत तर वैष्णव आखाड्यात निर्मोही आखाडा, निर्वाणी आखाडा, दिगंबर आखाडा हे येतात. शीख धर्माशी संबंधित उडासी आखाडा आहे. तसेच उडासी पंचायती आखाडा हाही एक प्रकार आहे. कपालिक व अन्य आखाड्यांमध्ये कपालिक आखाडा, भैरव आखाडा येतात. हे प्रत्येक आखाड्यांचे आपापले स्वतंत्र गुरू, अनुयायी आणि तत्त्वज्ञान असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या वेळी हे साधू आखाडे प्रमुख भूमिका बजावतात आणि सर्वात आधी स्नान करण्याचा मान त्यांना मिळतो. या साधूंच्या वैशिष्ट्य परंपरा आहेत. त्यामध्ये नागा साधूंची वेगळी परंपरा आहे. त्याची साधना वेगळी असते, त्यांची अनुग्रह घेण्याची प्रक्रिया वेगळी असते. त्यात काही अघोरी विद्यांचाही अभ्यास या साधूंनी केलेला असतो. मात्र, आत्यंतिक साधना आणि ज्ञानामुळे त्यांच्यात क्रोध असतो. कोणत्याही परंपरा नीट पाळल्या गेल्या नाही की या साधूंचा संताप होतो. त्यामुळे त्यांच्या स्नानाच्या वेळा काटेकोरपणे पाळले जाते. त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना सुविधा देण्याचे काम सरकारकडून केले गेलेले पाहायला मिळाले. साधूंच्यामध्येही यंदा सामाजिक भाव दिसून आला. जेव्हा शाही स्नानाच्या काळात चेंगराचेंगरी होऊन तीस लोकांचा मृत्यू झाला. त्याच रात्री सर्व आखाड्यांनी मिळून सामुदायिक निर्णय घेतला की दुसऱ्या दिवशी होणारे स्नान पुढे ढकलण्यात आले. त्याचे कारण होते चेंगराचेंगरीचे प्रकरण आणि संभाव्य चेंगराचेंगरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन साधूंनी हा निर्णय घेतला. ही अतिशय स्तुत्य बाब मानली पाहिजे. अन्यथा साधूंनी शाही स्नानाला अन्य कोणतेही असुविधेचे कारण मान्य केले नसते. मात्र, सामाजिक समरसता पाळून हा एकत्रित निर्णय घेतला होता. तेव्हा योगी आदित्यनाथ सरकारने सर्व आखाड्याचे आभार मानले. तसे हे साधू शाही स्नानाबाबत अतिशय आग्रही असतात. मात्र, तरीही त्यांनी हा निर्णय समाजासाठी घेतला असल्याचे दिसून आले.
अर्थव्यवस्थेत सधनता
कुंभमेळ्याने काय दिले नाही असे नाही. येथे येणाऱ्या भाविकांना पवित्र होण्याची संधी तर दिलीच पण कमालीचा आनंद दिला. तसेच येथे आलेल्या भाविकांमुळे केवळ प्रयागराजची नव्हे तर संपूर्ण उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था हलली. अब्जावधी रुपयांची उलाढाल या भागात झाली. त्याचा सर्वाधिक फायदा झाला तो येथील स्थानिक व्यावसायिकांना, नागरिकांना. १४४ वर्षांनी आलेल्या प्रयागराज येथील कुंभमेळा हा अतिशय मोठा भरला. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे स्नानाला आले. यावेळी प्रयागराज कमी पडले. रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. हाॅटेलमध्ये खाण्यापिण्याची हाल होत असले तरी कोणाचीही त्याबाबत तक्रार नव्हती. सर्वांना समोर असलेले चित्र हतबलतेशिवाय काहीच सांगत नव्हते. त्यामुळे आहे ते योग्य मानून सर्वांनी जे मिळेल ते प्रसाद समजून सेवन केले. प्रयागराजमधील स्थानिक प्रवासी व्यवस्था तोकडी पडली. त्यामुळे ये-जा करणे अवघड होते. कार, रिक्षा, मालवाहतूक टेंपो हे सर्व अपुरे पडले, शेवटी सायकल आणि मोटारसायकल सवारीची पद्धती रुजू झाली. यामध्ये स्थानिक नागरिकांचा अधिक फायदा झाला. इतक्या मोठ्या संख्येने या भागात लोक आल्याने व्यवसायाचा भाग काही पटीने वाढला. आपोआपच सधनता आली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने समृद्धी महामार्गाला ही मोठ्या प्रमाणात समृद्धी प्राप्त झाली. नागपूरच्या पुढे महामार्गावरील हाॅटेल ना. प्रसिध्दी मिळाली आधी जे गेले त्यांनी मागच्यांना मार्ग दाखवला. अनेक हाॅटेल व्यवसायिकांना समृद्धी प्रसिद्धी प्राप्त झाली. काशी, अयोध्या, चित्रकूट अशा सर्वच धार्मिक स्थळांना लोकांनी भेटी दिल्या. त्यामुळे आपोआपच त्या त्या ठिकाणची अर्थव्यवस्था मजबूत झाली. लोकांना हातांना कामे मिळाली. ही एक सामाजिक क्रांतीच आहे.
मनाची प्रसन्नता
शेवटी काय भारताची ही संस्कृती अतिशय अनमोल आहे. हे आपण तिथे जाऊनच पाहिले पाहिजे. अनेकांनी तिथे जाणे पसंत केले. त्यांनी टीका केली नाही. मात्र, न गेलेल्यांनी चांगल्या वाईटाबाबत खूप चर्चा केली. प्रत्यक्ष अनुभूती हे खरे ज्ञान असते, याची प्रचिती डुबकी मारल्यानंतरच आली. आतापर्यंत कुंभमेळ्यातील उघडे साधू हे समीकरण मनाला कधी पटले नव्हते. गंगेत स्नान केल्याने पापे धुतली जातात हा विचार ही कधी मनाला पटला नाही. पण आस्थेची एक डुबकी मारली शरीराला जो पाण्याचा स्पर्श झाला. तेव्हा मात्र मनाला प्रसन्नता लाभली, ती शब्दात सांगू शकत नाही. साधूंचे दर्शन झाले झाल्यानंतर जे अंतर बाह्य परिवर्तन झाले ते पुढील आयुष्यासाठी दिशादर्शक झाले. यातून एकच सांगता येईल. याचि देही, याचि डोळा अनुभवला आत्मानुभूतीचा महाकुंभ.
विद्या अरुण काशिद पाटील मु.पो .इंदोरी या.मावळ .जि.पुणे
कुंभ मेळ्याला तर गेलो नाही ..पण लेख वाचून पुढच्या महाकुंभाला जाण्याची इच्छा मात्र झाली ...ही स्पर्धा ही वेगळी संकल्पना राबवली विश्व संवाद केंद्राने ....असेच वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धा घ्याव्यात जेणेकरून लोकांच्या भावना सर्वांपर्यंत पोहचतात
प्रमोद मधुकर देशक
29 Apr 2025 19:16