जणू काही विठ्ठलचं माझ्याकडून फोटो काढून घेतो....
पंढरीची वारी हा माझ्यासाठी ऊर्जेचा सळसळता सोहळा असतो. अर्थात प्रत्येकासाठी हा असाच असतो, पण मी फोटोग्राफर असल्यामुळे माझ्यासाठी अधिकच खास असतो. पण खरंतर प्रत्येक फोटोग्राफरसाठी ही वारी अधिक खास असते. पण त्या फोटोग्राफर्समध्ये माझ्यासाठी ही वारी नक्कीच इतरांपेक्षा विशेष असते, कारण ही वारी माझ्या आयुष्यात ज्याने सुरू केली, तो साक्षात पांडुरंग माझ्या सोबत असतो...हा पांडुरंग दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेता संदीप पाठक आहेत.
- अक्षय परांजपे, छायाचित्रकार

"एक तरी वारी अनुभवावी" असं म्हटले जाते. वारी ही अनुभवण्याची गोष्ट आहे. पण माझ्या आजारामुळे ही वारी केवळ दुरून पहाणे असाच अनुभव राहिला असता. मला विल्सन्स नावाचा दुर्मिळ आजार आहे, या आजारात शरीर स्थिर राहतात नाही, सतत हालचाल सुरू राहते, बोलण अस्पष्ट होतं, लिव्हर आणि मेंदूमये कॉपर डिपॉसिशन होतं... अशा परिस्थितीत पण एक वर्षी अभिनेता संदीप पाठक यांनी मला त्यांच्यासोबत वारीला नेले... आणि अनुभूतीचा एक वेगळा सोहळा माझ्या मनात आणि माझ्या फोटोत साकारू लागला.
संदीप हे वारीत माझी प्रचंड काळजी करतात, पण तितकीच माझी काळजी घेतातही. इतक्या गर्दीत त्यांचे माझ्यावर संपूर्ण लक्ष असते. त्यांना माहितेय की मी फोटो काढताना त्यात पूर्ण हरखून जातो. मनाचे समाधान होईपर्यंत एका फोटोच्या मागे लागणे हा माझा स्वभाव त्यांना माहितेय आणि हाच माझ्यातील गुण त्यांना आवडतो. फोटोग्राफर म्हणून माझ्यासाठी ही वारी पर्वणी बनून येते. स्टुडिओत फोटो टिपणे आणि वारीत एखाद्या फोटोसाठी, एखाद्या परमोच्च क्षणासाठी जीव ओतून मागे लागणे हा एक अवर्णनीय आनंद आहे.

वारीत यत्रतत्र-सर्वत्र मला विठ्ठल दिसतो, इतकं या वारीत हरखून जायला होतं. मी तर तहान-भूक विसरून फोटो काढण्यात दंग होतो. एखादा फोटो मनात भरला तर तो काढण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. याचे दोन किस्से मला आठवतात.
शनिवारवाडा ते दगडूशेठपर्यंत मी उलट पळत येऊन अत्यंत देखणा फोटो मिळवला आहे. ज्यात माझ्या मते जगातील सुंदर बाई विठलं-रखुमाईच्या छोट्या मूर्तीला शिरपेचावर घेऊन मिरवत चालली आहे. हा फोटो टिपण्यासाठी मला खूप कष्ट पडले, पण मी त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि शेवटी मला हवा तसा फोटो माझ्या कॅमेऱ्यात कैद झाला. असाच वारीतील माझा आणखी एक फोटो मला सर्वाधिक भावतो, तो म्हणजे माऊलींच्या पादुकांचा फोटो. माझ्या तीन वर्षाच्या वारीचे चीज झाल्यासारखे त्यावेळी मला वाटले. कारण इतक्या गर्दीत ज्या पादुकांच्या फोटोसाठी फोटोग्राफर डोळे लावून बसलेले असतात, तो फोटो मात्र मला इतक्या गर्दीतही सहज मिळाला. याची मलाच माझे अनेकवेळा अप्रूप वाटते. माऊलींच्या पादुकांचा फोटो सहज मिळणे हे माझे भाग्यच, आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान हा फोटो मला देतो!
दरवर्षीची वारी नवीन अनुभव, आश्चर्य, भक्तीचे परमोच्च क्षण घेऊन येतात. प्रत्येकवर्षी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन पांडुरंग भेटून जात असतो. फक्त आपले डोळे आणि मन उघडे हवे. मला असा अनुभव माउलींच्या पादुकांचा फोटो काढताना आला होता.
संभाजी महाराज पुतळ्याजवळ अफाट गर्दी होती. त्या दरम्यान माझ्या कानाच्या मशीनचा पाईप निघून यायचा. चालता-चालता मशीन हातात यायची. एकदा का मशीन कानातून निघाली की मला संपूर्ण ऐकायला येणे बंद होते आणि मला वावरणे कठीण होऊन बसते. त्यामुळे मशीन कानाला असणे गरजेचं असतं. परंतु प्रचंड गर्दीमुळे हे अशक्य होते. पण काहीवेळानंतर लक्षात आले की मशीन व्यवस्थित कानावर आहे. जणूकाही विठ्ठलाने ती मशीन कानावर हात ठेवून धरून ठेवली होती आणि माझ्या तीन वर्ष वारी करण्याचे चीज झाल माऊलींच्या पादुकांचा फोटो एवढ्या गर्दीतही मला सहज काढता आला.
वारीत अनेक वारकरी रस्त्यावर भेटत असतात, आपल्याला त्यांचे अप्रूप वाटत असते, कारण पंढरपूरपर्यंतचा प्रवास हे वारकरी पायी करतात. पण त्यातील एका माऊलीने माझ्या गालावर हात फिरवून अगदी मायेने म्हटले की लेकरा किती धडपट करतोय, दोन घास माझ्यासोबत भाकर-झुणका खाऊन घे. ४ वाजता जस काय ती आमच्यासाठी जेवणाची थांबली होती आणि आम्हाला जेवू घालून ती स्वतः जेवली. हा अनुभव माझ्यासाठी खरंच सुखदायी होता.

त्यामुळे दरवर्षीची मी वारीची आतुरतेने वाट बघत असतो. यंदाची वारीही माझ्यासाठी निश्चित काही खास
घेऊन आली असणार, माझा विठ्ठल माझ्या भेटीसाठी उभा असेल. पुन्हा नवी ऊर्जा, नवं चैतन्य मी माझ्यात साठवून घेणार आहे.
-अक्षय परांजपे, फोटोग्राफर