संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू जरी असले तरी ते त्यांचे गुरु होते. ज्ञानेश्वरांचे अध्यात्मिक कार्य आणि ग्रंथांचे लेखन यामागे श्री निवृत्तीनाथ यांचा आशीर्वाद होता. गहिनीनाथ यांच्या भेटीनंतर निवृत्तीनाथांमध्ये बदल घडून आला. गुरु गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना नाथपंथीय योगमार्गाची आणि ज्ञानमार्गाची दीक्षा दिली. गुरुंनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या तिन्ही भावंडांना ज्ञान देण्याची जबाबदारी सोपवली. गुरुआज्ञेनुसार निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांना गुरुमंत्र दिला.
संन्याशाची मुले म्हणून समाजाने शुद्धिपत्र नाकारल्यावर श्री निवृत्तीनाथ यांनी ब्रह्मवृंदां समोर केलेले भाष्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ते ब्रह्मवृद्धांना म्हणतात," आम्ही वर्ण, जाती, देवगण, कुळ, किन्नर, यक्ष, ऋषी, निशाचर या भेदाच्या पलीकडे गेलेलो आहोत. आम्ही अविनाशी अव्यक्त आणि जुनाट असून आमचे स्वरूप स्वबोधाने इष्ट (योग्य) बनलेले आहे. यावरून श्री निवृत्तीनाथ भेदाच्या पलीकडे पोचले होते हे स्पष्ट होते. त्यांनी भेदाभेद, जातीपाती, वर्णभेद मिटवले.
संत ज्ञानेश्वर आपल्या ग्रंथांचे श्रेय आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांना देतात. निवृत्तीनाथच माझ्या लेखनामागचे खरे कर्ते करविते आहेत असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.
आपल्या सद्गुरुंची थोरवी सांगताना माऊली म्हणतात,
ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरुंनी केलें कोडें ।
माथा हात ठेविला ते फुडे । बीजचि वाइले ।।
(ज्ञानेश्वरी अध्याय ६ - ४९२ )
ज्ञानेश्वरांनी स्वतःचा उल्लेख निवृत्तिदास असा केला आहे. गुरुंमुळेच माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत असे ज्ञानेश्वरीत म्हटले आहे. कां चिंतामणी जालियां हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं । तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे ॥२४॥
॥१-२४॥
निवृत्तीनाथांचे एकूण ३७४ अभंग उपलब्ध आहेत त्यांच्या अभंगातून निराकार, निर्गुण ईश्वराचे तसेच योगिक अनुभूतीचे दर्शन घडते.
संत निवृत्तीनाथांच्या कार्याची ओळख म्हणजे त्यांनी नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा समन्वय साधून, शैव आणि वैष्णव भक्तांना एकत्र आणले. त्या काळात कट्टर शैव आणि कट्टर वैष्णव यांच्यात टोकाचे वैर होते , मतभेद होते. अशा टोकाच्या भूमिका असलेले दोन संप्रदाय निवृत्तीनाथांनी एकत्र आणून समन्वय साधला. हा समन्वय म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक ऐक्य साधण्याचा अवघड असा प्रयत्न यशस्वीपणे साध्य केला. या दोन्ही संप्रदायांचे ऐक्य ही केवळ आध्यात्मिक क्षेत्रातील नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाची घटना होय.
या ऐक्यभावामुळे त्या काळात महाराष्ट्रात एक नवे स्थित्यंतर घडून आले. त्यामुळे याबरोबर इतर स्तरांवरही आपोआप समन्वय साधला गेला. यामुळे नाथ आणि वारकरी समन्वयाचे शिखर गाठले. दोन्ही भक्तीपंथांची विचारधारा जुळून अद्वैतवाद उभा राहिला. ऐक्य साधल्यामुळे दोन्ही कट्टरवादी संप्रदायात परस्परविरोधी विचारधारांतील दुरावा संपुष्टात आला. सामाजिक स्तरावर त्यामुळे समरसतेचे वारे वाहू लागले.
ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून श्री निवृत्तिनाथांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, शैव- वैष्णव, सगुण-निर्गुण, योग -भक्ती या परस्परविरोधी विचारांना एकत्र आणून, आध्यात्मिक क्रांती बरोबरच सामाजिक आणि धार्मिक क्रांती घडवून आणली. सर्व जातीतील संत एकत्र आले आणि संतांची मांदियाळी जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह कष्टवित राहिली.
ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मिक सामाजिक आणि धार्मिक कार्याच्या मागे त्यांचे सद्गुरु श्री संत निवृत्तीनाथ यांची प्रेरणा होती हे विशेष.
शके 1216, ज्येष्ठ वद्य द्वादशी ला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्यांना समाधी घेतली. संत नामदेवांनी त्यांच्या समाधीचे वर्णन खालील अभंगात केले आहे.
परिसा भागवत करीतसे शोक | म्हणती देवा दु:ख फार झालें ||१||
द्वादशी समाधी दिधली निवृत्तीसी | झाले उदासी अवघेजण ||धृ||
देव म्हणे उठा करा आतां पूजा | घालुं पुष्पशेजा समाधीसी ||३||
उठले सकळ होती ती विकळ | गेले तें गोपाळ समाधीसी ||४||
घेतली समाधी सव्य वैष्णवांसी | पुजीताती सुमनीं समाधीसी ||५||
नामा म्हणे अवघे करा प्रदक्षिणा | चला आचमनी पुष्करणीसी ||६||
राम कृष्ण हरिll
हिंदुराव गोळे, सातारा