पर्यावरण रक्षणाचा हिंदू दृष्टीकोन
जगभरात २२ एप्रिल हा 'जागतिक वसुंधरा दिवस' (World Earth Day) साजरा केला जातो. गेल्या पाच दशकांपासून पर्यावरण संरक्षणाचा जागर करण्यासाठी हा दिवस पाळला जात असला, तरीही भारताची प्राचीन हिंदू संस्कृती ही हजारो वर्षांपासून पर्यावरण-जागरूक होती. ‘वसुधैव कुटुंबकम्’ — म्हणजेच संपूर्ण पृथ्वी हेच आपले कुटुंब — ही केवळ एक तत्त्वज्ञानाची संकल्पना नसून, ती जीवनाच्या प्रत्येक अंगात पसरलेली एक जीवनशैली होती.
हिंदू दृष्टिकोनात निसर्गातील प्रत्येक घटक — झाडे, नद्या, पर्वत, प्राणी आणि अगदी वारे-तारेसुद्धा — हे सजीव आणि पवित्र मानले गेले आहेत. या भावनेतूनच निसर्गाशी एक सख्यतेचे, भावनिक आणि नैतिक नाते निर्माण झाले. हे नाते पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अत्यंत मूलभूत ठरते. वेद, उपनिषदे, पुराणे आणि स्मृतिग्रंथांतून निसर्गसृष्टीचे देवत्व मान्य करून तिचे रक्षण एक नैतिक आणि धार्मिक कर्तव्य म्हणून सांगितले गेले आहे. आज जेव्हा मानवजात विविध पर्यावरणीय संकटांशी झगडत आहे, तेव्हा आपल्या या पारंपरिक विचारांची पुनःप्रत्यय मिळवणे आणि त्यांचे आधुनिक संदर्भात पुनरावलोकन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. पर्यावरण ही केवळ वैज्ञानिक वा तांत्रिक बाब नसून ती एक संस्कृतिक, नैतिक आणि आध्यात्मिक गोष्ट आहे — ही जाणीव आपल्या प्राचीन वारशात खोलवर रुजलेली आहे.
पंचमहाभूत आणि जीवनाची आंतर-जोडणी प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा, हिंदू विचारांचा आधार पंचमहाभूतांच्या संकल्पनेवर आधारित आहे. पृथ्वी (स्थायित्व), जल (प्रवाह), अग्नी (ऊर्जा), वायू (गती) आणि आकाश (अवकाश) ही पाच मूलभूत तत्त्वे आहेत. ज्यांपासून हे संपूर्ण ब्रह्मांड आणि त्यातील सर्व सजीव-निर्जीव वस्तू बनलेल्या आहेत. मानवी शरीर देखील याच पंचमहाभूतांचे बनलेले आहे. आपले आरोग्य या तत्त्वांच्या संतुलनावर अवलंबून असते. पर्यावरणातील हे घटक आणि मानवी शरीर यांच्यात एक अतूट संबंध आहे. या तत्त्वांचा समतोल बिघडल्यास केवळ मानवी आरोग्यच नव्हे, तर पर्यावरणाचा समतोलही ढासळतो.
हिंदू तत्वज्ञानानुसार, सृष्टीतील सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. एकाच वैश्विक चेतनेचे (ब्रह्मन्) अविभाज्य भाग आहेत. हा अद्वैतवादी किंवा एकात्मवादी दृष्टिकोन निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देतो. जिथे मानव हा निसर्गाचा स्वामी नसून त्याचाच एक भाग आहे. या जाणिवेतून निसर्गाप्रती आदर आणि सहजीवनाची भावना वाढीस लागते.
हिंदू संस्कृती आणि पर्यावरण तत्वज्ञान:
पंचमहाभूतांचे सविस्तर विवेचन: हिंदू तत्वज्ञानानुसार, संपूर्ण सृष्टीची निर्मिती पाच मूलभूत तत्त्वांपासून झाली आहे. ज्यांना 'पंचमहाभूत' म्हटले जाते; पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. हे केवळ जड पदार्थ नसून, ते चैतन्याचे आणि ऊर्जेचे विविध अविष्कार आहेत.
१) पृथ्वी (Prithvi): स्थिरता, घनता, जडत्व आणि गंधाचे प्रतीक. सर्व सजीवांना आधार आणि भौतिक जगाचे प्रतिनिधित्व. मानवी शरीरातील हाडे, स्नायू आणि त्वचा पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतात.
२) जल (Jal/Apah): प्रवाहीपणा, शीतलता, स्निग्धता आणि चवीचे प्रतीक. जीवनासाठी आवश्यक आणि भावना व अनुकूलनक्षमतेशी संबंधित. शरीरातील रक्त, लाळ आणि इतर द्रव पदार्थ जल तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतात.
३) अग्नी (Agni/Tejas): ऊर्जा, उष्णता, प्रकाश, रूपांतरण आणि दृष्टीचे प्रतीक. पचन, चयापचय आणि शरीराचे तापमान नियंत्रित करते. इच्छाशक्ती, धैर्य आणि महत्त्वाकांक्षा अग्नी तत्त्वाशी जोडलेल्या आहेत.
४) वायू (Vayu): गती, चलनवलन, श्वास (प्राण) आणि स्पर्शाचे प्रतीक. श्वसन, रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आवश्यक. स्वातंत्र्य, लवचिकता आणि विचारांचा प्रवाह वायू तत्त्वाशी संबंधित आहे.
५) आकाश (Akash/Vyom): सर्वात सूक्ष्म तत्त्व, अवकाश, पोकळी, अमर्यादता आणि ध्वनीचे (शब्द) प्रतीक. इतर सर्व तत्त्वांना सामावून घेते आणि त्यांच्या कार्यासाठी अवकाश प्रदान करते. शरीरातील पोकळ्या आणि चेतना, अंतर्ज्ञान आकाश तत्त्वाशी संबंधित आहेत.
या पंचमहाभूतांचा समतोल केवळ सृष्टीच्या संतुलनासाठीच नव्हे, तर मानवी आरोग्यासाठीही अत्यावश्यक आहे. आयुर्वेद आणि योगशास्त्रानुसार, शरीरातील वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष पंचमहाभूतांच्या संयोजनातूनच तयार होतात आणि त्यांचे संतुलन आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पंचमहाभूतांचा समतोल साधण्यासाठी निसर्गात वेळ घालवणे, शुद्ध पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, प्राणायाम करणे आणि ध्यान करणे यांसारखे उपाय सांगितले जातात. वास्तूशास्त्रामध्येही घराची रचना करताना या पाच तत्त्वांच्या दिशा आणि संतुलनाचा विचार केला जातो, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि सुसंवाद निर्माण होतो. पंचमहाभूतांची ही संकल्पना केवळ विश्वाच्या भौतिक रचनेचे वर्णन करत नाही, तर ती एका सखोल नैतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाकडे निर्देश करते.
प्रत्येक तत्त्वाला स्वतःचे महत्त्व आणि कार्य आहे आणि त्यांच्यातील सुसंवाद हा केवळ भौतिक समतोल नसून तो एक वैश्विक सुसंवाद आहे. या तत्त्वांचा आदर करणे आणि त्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करणे, हे मानवाचे नैतिक कर्तव्य ठरते. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यास त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर आणि अस्तित्वावर होतो. या विचारांमध्ये निसर्गातील प्रत्येक घटकाला स्वतंत्र अस्तित्व आणि महत्त्व दिले आहे. पृथ्वी केवळ माती नाही, जल केवळ पाणी नाही, तर ते जीवनाचे आधारस्तंभ आहेत, ज्यात स्वतःचे जीवन आणि रूप आहे. हा दृष्टिकोन आधुनिक 'डीप इकॉलॉजी'चा विचार आहे, जो निसर्गातील सर्व घटकांना आंतरिक मूल्य देतो. मानवाला निसर्गाचा एक भाग मानतो, स्वामी नाही.