
श्रीरामपूर (अहिल्यानगर), ता. १७ : "राष्ट्राचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर केवळ विचार करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. आजचा समाज अधिक प्रगल्भ, संवेदनशील आणि सुदृढ बनवण्यासाठी 'पंच परिवर्तन' ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांनी येथे केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 'संघशताब्दी मंथन - परिवर्तनाच्या दिशेने' या जिल्हास्तरीय प्रमुखजनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता. १७) श्रीरामपूर येथील निर्मळ संकुलात करण्यात आले होते. या वेळी मुख्य वक्ते म्हणून अतुल अग्निहोत्री ते बोलत होते. व्यासपीठावर संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला (दिल्ली) आणि उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा संघचालक किशोर निर्मळ उपस्थित होते.
अग्निहोत्री यांनी आपल्या संबोधनात पंच परिवर्तनातील सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, स्व-बोध (स्वत्वाचा भाव) आणि नागरी शिष्टाचार या पाच मुख्य सूत्रांवर प्रकाश टाकला. हे विषय केवळ उपदेशाचे नसून, दैनंदिन जीवनात आणि समाजात त्यावर प्रत्यक्ष कृती कशी करता येईल, याची उदाहरणे त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधत विविध शंकांचे निरसन केले.

ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला यांनी संघाच्या कार्यपद्धतीचा आणि विविध आयामांचा आढावा घेतला. भारतीय संस्कृतीतील 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेचा संदर्भ देत त्यांनी देशाच्या उभारणीसाठी आणि प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने राष्ट्रकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
प्रारंभी, दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा प्रचार प्रमुख मंगेश भिडे यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. श्रीरामपूर तालुका प्रचार प्रमुख महेश तारगे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. या 'शताब्दी मंथन' कार्यक्रमाला उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकार, संपादक, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलावंत, कायदेतज्ज्ञ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. प्रणव जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश भिडे यांनी आभार मानले. जिल्हा सह बौद्धिक प्रमुख विजयराव ढोले व वाद्यवृंदाच्या सामूहिक 'वंदे मातरम' गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.