
पर्यावरण दिन
रेल्वेतून प्रवास करीत असतांना समोरच्या बाकावर एक गृहस्थ प्लास्टिकच्या पिशवीतील काही पदार्थ खात होते. खाऊन झाल्यावर ती पिशवी त्यांनी खिडकीतून बाहेर फेकली . त्यानंतर चहा घेतला. प्लास्टिकचा ग्लास पुन्हा बाहेर फेकणार तेवढ्यात त्या गृहस्थाच्या शेजारी बसलेल्या एकाने त्यांना सांगितले , अहो ," तो प्लास्टिकचा ग्लास किमान प्लॕटफॉमवर तरी फेका. या निर्जन ठिकाणी कोणीही साफसफाई करण्यास येणार नाही." प्रसंग छोटा मात्र शिकण्यासारखे खूप काही. ती व्यक्ती पर्यावरण प्रेमी होती. प्लास्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे २६ जुलै २००५ मुंबईत पावसाने जेव्हा हाहाकार घातला त्यावेळी मुंबईतील मिठी नदीभोवती पुराने जो फास आवळला होता त्याला प्लास्टिकच्या पिशव्या कारणीभूत होत्या.पर्यावरणाच्या सध्याच्या समस्येत प्लास्टिकचा कचरा व ई -कचरा ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे निसर्गाच रुप ओंगळ होऊ लागले आहे.
निसर्ग ही एक विलक्षण गोष्ट आहे. त्याचे वर्णन करण्यास शब्द कमी पडतील. वारे ,वादळ , हवा , ढग , तलाव , ओढे ,समुद्र ,डोंगर ,द-या , पठारे , खडक , माती ,झाडे ,वृक्ष, वेली ,फुले , वनस्पती आणि असंख्य प्रजातींचे पशुपक्षी , कीटक ,माणूस ,मानवनिर्मित अनेक सारेच निसर्गाचे अविभाज्य घटक असतात यासर्व गोष्टींना पर्यावरण असे म्हणतात . अगदी सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी त्यांच्या भोवतालाची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.
निसर्ग अपुला सखा सोबती !
सदैव धरावी त्याची संगती !!
संत तुकाराम महाराजापासून सर्वांनी आपल्याला हीच शिकवण दिली. तरीसुद्धा आपल्या प्रगतीसाठी माणूस निसर्गावर घाला घालून अधोगतीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहचत आहे.
आजकाल आपल्याला वेगळेच वातावरण अनुभवायला येत आहे. उन्हाळा , पावसाळा व हिवाळा ही तिन्ही ऋतू एकाच दिवशी अनुभवला मिळत आहे.पाऊस कधी पडेल याचा काही नेमच राहिला नाही. संपूर्ण ऋतूचक्र बदले गेले आहे.कोणते बरे कारण असेल या ऋतूचक्राला ? निसर्गातील झालेला हा "केमिकल लोचाला " माणसाची हावरेपणाची वृत्तीच कारणीभूत आहे.
मानवापुढील ही समस्या मानवाने निर्माण केल्या आहेत . निसर्गाबरोबर सुखात रमलेल्या या माणसाच्या स्वार्थी वृत्तीला पंख फुटले. स्वतःच्या भोवतालच्या निसर्गाचा नाश करु लागला. आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. आज संपूर्ण जग पर्यावरणाशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करीत आहे. या सर्व समस्या एकमेकांशी संबंधित असून निसर्गातील मानवी हस्तक्षेप हे त्यांमागचे महत्त्वाचे कारण आहे. त्यापैकी सर्वात मोठी समस्या" ग्लोबकरता वॉर्मिग" होय.तापमानाची वाढ सातत्याने होत आहे. जंगल क्षेत्र कमी झाल्यामुळे वन्य प्राणी नागरी भागात घुसत आहे. वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धनाकडे पुरेसे लक्ष नाही. दरवर्षी पावसाळ्यात झाडे लावण्याचा उत्सव साजरा केला जातो. वर्तमानपत्रात छान फोटो येतो. ३३ कोटी झाडे लावण्याचा ढोल बडवला जातो. मात्र त्यांतील किती रोपांचे संरक्षण व संवर्धन हा संशोधनाचा भाग आहे. अर्थात इतरांना दोष देऊन या समस्येची उकल होणार नाही.
सर्वप्रथम मी पर्यावरणाचा एक घटक आहे हे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. ज्याप्रकारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाचा घटक असल्याचे भान ठेवून वागतो. त्यामुळेच त्या कुटुंबात सुख , समृद्धी व स्थिरता दिसून येते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबादारपणे वागला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते. पर्यावरणाचे सुद्धा थोडेफार तसेच आहे. पर्यावरणाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचे आहे हे प्रत्येकाने ध्यानात असू द्यावे. पर्यावरणाचा -हास होण्यास वाढती लोकसंख्या कारणीभूत आहे.
" लेकुरु उदंड झाली , लक्ष्मी निघून गेली "
असे सार्थ वर्णन लोकसंख्या वाढीबाबत समर्थ रामदासस्वामींनी केले आहे.जागतिक लोकसंख्या वाढ हा चिंता व चिंतनाचा विषय आहे. लोकसंख्या वाढीमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर होतो. त्यामुळे पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पेट्रोल ,डिझेल यासारख्या इंधनाचा मर्यादित साठा भविष्यात संपण्याचा धोका आहे अशावेळी त्यांचा मर्यादित वापर करुन सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजेत . प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबणे. झाडांचे संगोपन व संवर्धन केले पाहिजे . आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरण प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. त्यामुळे देव धर्माला आपण जेवढे महत्व देतो. त्याच प्रमाणेच आपले जीवन सुखी होण्यासाठी पर्यावरणाचे रक्षणाची प्रतिज्ञा प्रत्येकाने केली पाहिजेत .
कारण शेवटी
पर्यावरण रक्षण हेच!
सुखी जीवनाचे लक्षण होय!