
अनादी मी अनंत मी अवध्य विनायक सावरकर
क्रांतीसुर्य, स्वातंत्र्यवीर हिंदू हृदय सम्राट, श्री. विनायक दामोदर सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी योध्दा, निर्भिड सशस्त्र क्रांतिकारक, प्रखर वक्ता, मनस्वी महाकवी, संपूर्ण देशाला प्रेरक इतिहास लेखक , प्रगल्भ कादंबरीकार , अमर गीत लेखक , धेय्यवादी नाटककार, भाषा प्रभू , मराठी नव शब्दांचा निर्माता , द्रष्टा विचारवंत, स्वयंभू नेता, हिंदुत्व विचार मार्गदर्शक , हिंदूराष्ट्र उद्गाता , पुरोगामी हिंदू विचारवंत, बंडखोर समाजसुधारक, चाळीसहून अधिक मराठी व इंग्रजी ग्रंथांचा लेखक, व्यासंगी अभ्यासक , स्वतंत्र भारताचे लष्कर , अर्थशास्त्र , राजकारण, परदेश निती यांचा उद्गाता, हिंदू मुस्लिम द्विराष्ट्रवादाचा समर्थक, अस्पृश्यता निर्मूलन प्रणेता, जातीवाद व अंधश्रध्दा निवारक, तर्कनिष्ठ राष्ट्रीय हिंदुत्व विचार दार्शनिक, क्रांतिकारकांचा गुरु व मार्गदर्शक, स्वदेशी चळवळीचा सक्रिय नेता, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष, अभिनव भारत संघाचा संघटक, व्यासंगी ललित लेखक, निर्भिड संपादक, कुटुंब वत्सल पिता, पती, बंधू, दीर, निरपेक्ष राजकारणी, संन्यस्त उत्तर आयुष्य जगून प्रायोपवेशन करुन मृत्युला सामोरा जाणारा ऋषितुल्य महामानव, म्हणजे वि.दा.सावरकर . प्रज्वलित अग्निहोत्र जणू !! आधुनिक दधिची ऋषी !!
" विनायक " हे नाव भारतीय संस्कृतीचे संपूर्ण द्योतक आहे. आपले लाडके दैवत श्री गणेशाचे हे नाव आहे .गणेश पूजनाने आणि श्री गणेश स्तवन करूनच कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ होतो. तद्वत, आपल्या आराध्य दैवत अशा भारतमातेच्या स्वातंत्र्य लढ्याचे स्तवन " विनायक सावरकर " यांचे स्मरण केल्याशिवाय होऊच शकत नाही एवढे त्यांचे उत्तुंग राष्ट्र कार्य आहे . " वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् l" असे तन मन धन अर्पून राष्ट्र कार्य करणारे स्वातंत्र्य सैनिक म्हणत असतात. ते स्वातंत्र्याचे ,हिंदुत्वाचे प्रखर मंत्र आणि तंत्र आपल्याला देणारा ,बुद्धिवादी , प्रतापी ऋषी म्हणजे विनायक दामोदर सावरकर !!
" स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवीनच ." अशी वेदोक्त गर्जना करणारे , लोकमान्य टिळक यांच्या मुशीतून घडलेले सावरकर हे स्वातंत्र्य विचाराचे वाहक बनले ! विनायक याचा एक अर्थ " वाहून नेणारा "असाही आहे. तो या विनायकाने सार्थ ठरवला !!

विनायक याचा अर्थ " मार्गदर्शक " असाही आहे .
वयाच्या अकराव्या वर्षा पासून विनायकराव सावरकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मरेपर्यंत झुंजत राहण्याची मित्रांसह प्रतिज्ञा घेतली होती. ती आजन्म पाळली. मदनलाल धिंग्रा, कान्हेरे सारखे स्वातंत्र्यासाठी जीव ओवाळून टाकणारे अनेक क्रांतिकारी त्यांनी घडवले . त्यांच्या धगधगत्या लेखनाने हजारो , लाखो भारतीय युवकांची मने आणि मनगटे प्रस्फुरीत झाली.
विनायक नावाचा एक अर्थ आहे "वाटाड्या "!! ..भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा " वेद " म्हणता येईल असे, सावरकरांचा "अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर " हा ग्रंथ इंग्लंड आणि भारतातील क्रांतिकारकांसाठी गुप्तपणे स्वातंत्र्य लढ्याचा वाटाड्या झाला होता . स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर , तोच ग्रंथ भारत राष्ट्र संघटित व जागरूक ठेवण्यासाठी राष्ट्रवादाचा " महामार्ग " सिद्ध झाला. विविधतेतील राष्ट्रीय एकत्व त्यातून जगासमोर आले. हा ग्रंथ मुळात युवा विनायक सावरकरांनी ब्रिटनमध्ये कायद्याचे शिक्षण घेता घेता लिहिला . इंग्लिश मध्ये भाषांतर करुन प्रसारित केला. त्याच्या पारायणाने अगणित क्रांतिकारक घडले. अठराशे सत्तावनच्या लढ्याला ब्रिटिशांनी शिपायांच्या कथित बंडाचा शिक्का मारुन कमी लेखले होते. त्या हिंदुस्थानी क्रांतिकारकांच्या लढ्याला आणि बलिदानाला "१८५७ चे स्वातंत्र्य समर " नावाचा ग्रंथ लिहून , याच विनायकाने गौरविले. आज तो ग्रंथ आमचा गौरवाचा इतिहास म्हणून सर्वांना प्रेरणा देत आहे आणि पुढेही देत राहील.
ब्रिटनमध्ये सशस्त्र क्रांतिकारक म्हणून पकडले गेल्यावर श्री विनायक दामोदर सावरकर यांना संशयित म्हणून कडक तपासणीला सामोरे जावे लागले . त्यांच्याकडे काही शस्त्र सापडले नाही. त्यांना ब्रिटिश सैनिकाने खिजवले. तेंव्हा सावरकरांनी आपल्या खिशातील पेन दाखवून त्या सैनिकाला बेडरपणे प्रत्युत्तर दिले. " तुम्ही जे शस्त्र शोधताय ते ही लेखणी आहे . ती तुम्ही जप्त नाही केली . माझे खरे शस्त्र तर ही लेखणी आहे “ हे लेखणीचे शस्त्र तुम्ही हिसकावून घेऊ शकत नाही या लेखणीने मी लढेन आणि खरेच त्यांची लेखणी ही ब्रिटिशांच्या बंदुका, तोफा, बॉम्ब , छळछावण्या यापेक्षा प्रभावी शस्त्र ठरली हे इतिहास सांगतो.
इदं शस्त्रम इदम शास्त्रम !! ही त्यांची बाणेदार वृत्ती होती. त्या लेखणीने ब्रिटिश साम्राज्याच्या पायाखाली स्वराज्याचा सुरुंग यशस्वीपणे पेरून, त्यांचे साम्राज्य सावरकरांनी लेखणीने खीळखिळे केले. त्यांनी लेखणीने स्वराज्याची ज्योत भारतीय मनामनात पेटवली .
विनायक नावाला आणखी एक अर्थ आहे
" स्वयंभू !! " विनायक सावरकर
अनादी मी अनंत मी ,अवध्य मी भला l
मारील रिपु जगति, असा कवण जन्मला ll
असे बेदरकार गीत लिहितात. त्यातच त्यांचा सगुणनिर्गुण रुपातील चिरंतन तात्विक आत्मविश्वास दिसतो. हाच विनायक एकमेव स्वयंभू देशभक्त. हा जन्मोजन्मी देशासाठी
" तुज साठी मरण ते जनन l
तुज विण जनन ते मरण ll
" गाणारा " स्वयंभू " विनायक सावरकरच केवळ असू शकतो. सावरकर यांनी अंदमान मध्ये दोन जन्मठेप स्वीकारताना म्हटले की , " पन्नास वर्षे मी तुरुंगात जिवंत राहणार का? या दाहक कुचेष्टे पेक्षा पुढील पन्नास वर्षे तुमची ब्रिटिश सत्ता, भारतासह तिसऱ्या जगावर अबाधित टिकून राहणार का याची तुम्ही काळजी करा " असे ब्रिटिश अधिकाऱ्यांना आव्हानच दिले. आणि ते खरे ठरले.
विनायक नावाचा एक अर्थ आहे , " बुद्ध " . जो स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतो. त्यांचे वैचारिक लिखाण , भाषणे , यांचा पगडा शंभर वर्षे होऊन गेली तरी , आजही कमी होत नाही .उलट आजच्या पिढीवर वीर विनायक सावरकर यांच्या गंभीर , तेजस्वी , राष्ट्र हिताचे लेखन , ललित, नाट्य , काव्य असो , आणि मुख्यत्वे त्यांचे हिंदुत्व विचार असोत , यांचे समाजावरील " गारुड वर्धिष्णू " होत होत, आज एक राष्ट्रीय पर्याय म्हणून तरुण निवडत आहेत. त्यांचे विचार कालातीत आहेत. भविष्यातील प्रबुद्ध भारतीयांचा हाच तो "दीपस्तंभ ", विनायक दामोदर सावरकर .
विनायक नावाचा एक अर्थ आहे " गरुड " किंवा . " वैनतेय " !! महाविष्णू यांचे वाहन !! विष्णू हे विश्वाचे पालक आहेत. त्यांच्या या कार्यात गरुडाचा मोठा सहभाग आहे . गरुडाचा भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेत स्वतःची विभूती म्हणून गौरव करतात . "..अहं वैनतेय च पक्षिणाम १०-३० ll गीता ll दूरदृष्टी , शक्ति , बुद्धी ,याचे गरुड प्रतीक आहे. श्री विष्णू यांनी वाहन म्हणून स्वीकारले , यातच त्यांची महत्ता समजू शकते . विनायक सावरकर हे " गरुडझेप " घेणारे नेते होते . स्वातंत्र्य लढा असो , यातना सहन करणे असो , लेखन करणे असो , स्वतंत्र आणि प्रबळ हिंदूराष्ट्राची रूपरेखा आखताना असो , मार्सेलीस मध्ये जहाजावरुन समुद्रात झेपावणे असो , पतित पावन मंदिर उभारताना असो, त्यांची प्रतिभा गरुडाप्रमाणे सर्वात उच्च स्थानी विहंग करीत असल्याचे दिसते.
अंदमान मध्ये मरणप्राय यातना सोसताना त्यांना वेदना होत नव्हत्या. स्वतंत्र व बलशाली भारताचे स्वप्न ते पाहत होते . अंदमान हे स्वतंत्र भारताचे उत्कृष्ट नाविक केंद्र होऊ शकते हे भविष्य स्वप्न त्यांनी त्याकाळी पाहिले. हीच ती गरुड दृष्टी. हाच तो द्रष्टा युगपुरुष विनायक !! गरुड जसे नाग , सर्प यांचा कर्दनकाळ होतो , तसे विनायक सावरकर हे राष्ट्रद्रोही , हिंदूद्रोही , स्वातंत्र्यद्रोही यांचे कर्दनकाळ होते.
आपली लेखणी., वाणी, कृतीद्वारे त्यांनी भारताचे हितशत्रूंपासून संरक्षण केले. आपल्याला सावध केले . एक अत्युच्च आदर्श घालून दिला. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व याचे बाळकडू आपल्या पिढ्यांना पाजले. हिंदू असण्याची अस्मिता दिली. वैज्ञानिक प्रगत हिंदू विचारांची कवचकुंडले दानशूर होऊन , हिंदुस्थान रुपी सूर्य देवाला देऊन ,मृत्यूला जिंकले. आयुष्यभर देव, देश , धर्मा साठी देह झिजविला . समाज सेवा हीच मुक्ती आणि देश सेवा हाच मोक्ष असे ज्वलंत विचार जन सामान्यांच्या तनमनात रुजवले . त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालून आपणही अभिमानाने म्हणुया , ... हो , मी आहे विनायक सावरकर !! अनादी मी...अनंत मी .....अवध्य मी ..मी विनायक सावरकर...
लेखक :- विवेक प्रभाकर सिन्नरकर ( आर्किटेक्ट )
१६ , रामार्पण , गणंजय सोसायटी , युनिट १ ,
कोथरुड , पुणे ४११०३८.
9371003748
sinnarkarvivek@gmail.com