
पुणे, शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ — समरसता मंच व भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने सालाबादप्रमाणे पुणे महानगरातील गणेशोत्सवात सामाजिक समरसतेचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. मानाच्या गणपती मंडळांत भटके विमुक्त समाज बांधवांना श्रींच्या आरतीचा मान देण्यात आला. कसबा, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, केसरीवाडा, गुरुजी तालीम, दगडूशेठ व विंचूरकर वाडा या मंडळांनी सत्कार करून समरसतेचा संदेश दिला.
या उपक्रमात पुणे शहर व परिसरातील भोर, पुरंदर, पिंपरी-चिंचवड, हडपसर, विद्यापीठ, कात्रज, येरवडा, पर्वती भागातील भटके विमुक्त समाज घटक—वैदू, वडार, रामोशी, कोल्हाटी, पारधी, बहुरूपी, गोसावी, डवरी गोसावी, नाथपंथी, लमान बंजारा, कंजार भाट, शिकलकर, बैरागी, भोई, गोंधळी, कैकाडी, मसणजोगी, पद्मशाली, धनगर—यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रसाद खंडागळे यांनी करताना सांगितले की, “ही आरती केवळ धार्मिक विधी नाही, तर सामाजिक समतेचा दीपप्रज्वलन आहे.” डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी भटके विमुक्त विकास परिषदेच्या कार्याची माहिती दिली आणि ३१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या "भटके विमुक्त दिना"बद्दल अभिनंदन व आभार व्यक्त केले.

समरसता मंचाचे अखिल भारतीय संयोजय प्रा. रमेशजी पांडव यांनी आपल्या भाषणात भारतीय परंपरेतील संयुक्त समाजरचनेचा गौरव करताना सांगितले, “भारतीय समाजरचना ही व्यवसाय, कौशल्य, बुद्धिमत्ता आणि कलागुणांवर आधारित होती. आज भटके विमुक्त समाजाला मागास मानले जाते, पण याच समाजाने इतिहासात अग्रगण्य योगदान दिले आहे. समता युक्त समाजनिर्मितीसाठी संविधान हे मार्गदर्शक आहे. प्रत्येक समाजबांधवाने न्यूनगंड न ठेवता भारताच्या विकासात सहभागी व्हावे, हीच खरी समरसतेची आरती आहे.”
प्रमुख उपस्थित मान्यवर:
- समरसता मंच चे अखिल भारतीय संयोजय प्रा. रमेशजी पांडव
- पी.एस.आय. श्री शिवराज हाले
- श्री. खंडोबा देवस्थान, जेजुरीचे विश्वस्थ डॉ. राजेंद्र खेडेकर
- केसरी संपादक रामदास नेरुरकर
- ह.भ.प.नाराण महाराज
- कसबा गणपती अध्यक्षा संगीताताई ठाकरे

कार्यक्रमाचे नियोजन समरसता मंचाचे डॉ. प्रसाद खंडागळे , श्री महल्ले, श्री शरद शिंदे, श्री रवीजी ननावरे, भटके विमुक्त विकास परिषदेचे प्रशांत सहस्त्रबुद्धे (पश्चिम महाराष्ट्र प्रांत संपर्कप्रमुख), श्री अरविंद देवकर (पुणे महानगर संयोजन), श्री अभय जामगावकर (पश्चिम महाराष्ट्र प्रांत कोष प्रमुख), श्री स्वामी धनगर(पश्चिम महाराष्ट्र संयोजक), डॉ. जितेंद्र ठाकूर (पश्चिम महाराष्ट्र प्रांत रक्षा प्रमुख) व श्री किशोर शिंदे(पालावरची शाळा गटनायक) व इतर कार्यकर्त्यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता विंचूरकर वाड्यात एकत्रित सहभोजनाने झाली, जिथे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या परंपरेला समरसतेचा नवा अर्थ मिळाला!