पर्यावरण दिन विशेष

पर्यावरणीय जाणीव घडवणारी माणसं
आपल्या शहराच्या पर्यावरणासाठी आपणच काहीतरी केले पाहिजे, या जाणिवतेून कोल्हापुरात काही मंडळींनी एकत्र येऊन विविध उपक्रम सुरू केले. 'अर्थ वॉरियर' या नावाने सुरू असलेल्या या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. या स्वयंसेवी कामाची ही ओळख... पर्यावरण दिनाच्या निमित्ताने.
----
समविचारी मंडळी एकत्र आली की, अनेक सकारात्मक गोष्टी घडतात. अशा गोष्टी समाजालाही उपयुक्त ठरतात. अशी अनेक उदाहरणे आपल्या आवतीभोवती घडत असतात. कोल्हापुरातले असेच एक उदाहरण म्हणजे 'अर्थ वॉरियर' ही संस्था. कोरोनाने अनेकांना अनेक प्रकारचे विचार करण्यास भाग पाडले. कारण माणसाने निर्माण केलेली सृष्टी ही किती क्षणभंगुर आहे हे या आपत्तीने दाखवले. निसर्गाची सृष्टी हेच आपले मूळ असून आपण त्यातीलच एक घटक आहोत याची जाणीव तीव्र झाली. त्यातूनच काही जणांनी एक व्हॉट्स अप समूह तयार केला.
'स्वच्छ कोल्हापूर अभियान'
पर्यावरण संवर्धनासाठी जे काम करू इच्छितात अशांचा हा व्हॉट्स अप समूह तयार झाला. वेळ, विचार आणि वित्त या तिन्हीचे योगदान देणारे अनेकजण कोल्हापूर शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी या समूहाच्या माध्यमातून कटिबद्ध झाले. कामाची सुरुवात 'स्वच्छ कोल्हापूर' ही संकल्पना राबवून झाली. यासाठी या समूहातर्फे 'मी गाडगेबाबा - स्वच्छ कोल्हापूर अभियान' राबवले. शहरातील विविध संस्था, संघटनांना बरोबर घेऊन या अभियानात पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव, शहरातील ऐतिहासिक वास्तू यांची नित्यनेमाने स्वच्छता सुरू झाली.
हळूहळू ही सामाजिक चळवळ बनत गेली. चळवळीमध्ये सर्व स्तरातील नागरिक सहभागी होत गेले. त्यामुळे अभियानाची व्याप्ती वाढली. आता 'स्वच्छ कोल्हापूर' हा शहराचा स्वभावच बनला आहे. प्लास्टिक या समस्येने सर्वांनाच ग्रासले आहे. घरात रोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्लास्टिक येऊन पडते. बहुतांशी नागरिक कचऱ्यात हे प्लास्टिक टाकून देतात. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने महापालिकेच्या कचरा प्रकल्पात ते तसेच पडून राहते. सर्वत्र प्लास्टिक विखुरलेले दिसून येते. हे लक्षात घेऊन 'अर्थ वॉरियर'ने प्लास्टिक संकलन असा उपक्रम सुरू केला. सध्या संस्थेकडे महिन्याला दीडशे किलो पेक्षा जास्त प्लास्टिक संकलित होते. हे प्लास्टिक एका कंपनीला दिले जाते. ही कंपनी त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावते.

ई कचरा संकलन
इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आता सर्व घरातून होतो. काही कालावधीनंतर ही उपकरणे निकामी होतात आणि त्याची अडगळ बनते. त्यातील बॅटरी ही आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे शासनाने ई कचऱ्याला घातक कचरा असे संबोधले आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने ई कचरा संकलनाची केंद्र उभी करायची आहेत. मात्र असे होत नाही. ही समस्या लक्षात घेऊन 'अर्थ वॉरियर'ने ई कचरा संकलनाची सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत संस्थेकडे महिन्याला ६० ते ७० किलो ई कचरा जमा होतो. हा कचरा ते सांगली येथील एका शासनमान्य कंपनीला देतात. ही कंपनी या कचऱ्याची विल्हेवाट लावते.
लहान मुलांना घरातील प्लास्टिक इतरत्र न टाकता एकत्र करण्याची सवय लागावी यासाठी 'अर्थ वॉरियर'ने 'इको ब्रिक्स' ही संकल्पना पुढे आणली. घरातील कचरा प्लास्टिकच्या बाटलीत भरून अशा बाटल्या तयार करायच्या आणि त्याचा उपयोग सुशोभीकरणासाठी करायचा, अशी ही ती संकल्पना आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वटपौर्णिमेला वडाची रोपे वाटणे, दसऱ्याला आपट्याची रोपे वाटणे असे उपक्रमही संस्थेतर्फे सुरू आहेत.
'प्लास्टिक मुक्त कोल्हापूर' या उपक्रमांतर्गत संस्थेने कापडी पिशव्यांच्या प्रचार-प्रसाराचे कामही हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी महाद्वार रोड या व्यापारी मार्गावर कापडी पिशवी पुरवणारे यंत्रच बसवले आहे. यामध्ये पैसे टाकले की कापडी पिशवी मिळते. समाजातील विविध संस्था संघटनांसमवेत 'अर्थ वॉरिअर' ही संस्था वृक्षारोपणाचेही मोठे उपक्रम राबवते. पर्यावरण संवर्धन या विषयांमध्ये अनेक व्यक्ती, संस्था, संघटना काम करत आहेत. या सर्वांना बरोबर घेऊन एका दिशेने काम करण्याचा प्रयत्न 'अर्थ वॉरियर' या संस्थेकडून केला जातो. या सर्व संस्था, संघटनांचा समन्वयही या माध्यमातून केला जातो. समाजाच्या जाणिवा समृद्ध करण्याचे काम 'अर्थ वॉरिअर' संस्था खूप चांगल्या पद्धतीने करत आहे.