समाजात बदल घडविण्यासाठी पंचसूत्री अवलंबवावी - महेश कर्पे

नाशिक - संघ शताब्दी वर्षानिमित्त रा.स्व.संघ नाशिक शहर जिल्हा सेवा विभागाच्या वतीने प्रमुख जनसंवाद सेवा संगम या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.मुंजे इन्स्टिट्यूट भोसला कॉलेज येथे करण्यात आले होते. नाशिक शहरातील पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अश्या विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या १४० सामाजिक संस्थांनी यात सहभाग नोंदवला. सेवा संगम या कार्यक्रमास प्रमुख वक्ते रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह महेश कर्पे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रा.स्व.संघ नाशिक विभाग सहकार्यवाह राजेश राव, रा.स्व.संघ नाशिक शहर जिल्हा मा. संघचालक डॉ. विजयराव मालपाठक, जिल्हा कार्यवाह सुहास वैद्य, सह कार्यवाह रोहित गायधनी, रा.स्व.संघ नाशिक शहरजिल्हा सेवा विभाग प्रमुख अनिल पाटील, सह प्रमुख योगेश गर्गे उपस्थित होते.
संघाच्या वतीने भारतात एकूण ८९७०६ सेवा कार्य विविध आयामात चालू आहे यातील पश्चिम महाराष्ट्रात १४४१ सेवा कार्य संघाच्या वतीने चालू आहे. नाशिक शहरात संघाच्या वतीने श्रीगुरुजी रुग्णालय, सेवा भारती, राष्ट्रीय विकास मंडळ, व्यंकटेश बापट चॅरिटेबल ट्रस्ट, कुर्तकोटी शंकराचार्य न्यास, जनकल्याण रक्तकेंद्र, सेवा सहयोग, भटके विमुक्त विकास परिषद यांच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात एकूण ९० पेक्षा अधिक सेवाकार्य चालते. शहरातील १५५ सेवावस्ती पैकी ५० सेवा वस्ती मध्ये सेवा कार्य चालू आहे अशी माहिती रा.स्व.संघ नाशिक महानगर सेवा विभाग प्रमुख अनिल पाटील यांनी प्रास्ताविक मनोगतात दिली.
समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली १०० वर्ष अविरत कार्य करत आहे. संघ शताब्दी निमित्ताने कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्य, स्व-बोध हे पंच परिवर्तनाचे बिंदूवर काम करण्याची आवश्यकता आहे. हे पंच परिवर्तन अर्थात पाच बदल आपल्या दैनंदिन व्यवहारात अमलात आणण्यासाठी आपणा सर्व नागरिकांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, कारण हा केवळ विचार, चिंतन किंवा वादविवादाचा विषय नसून आपल्या वागण्यात त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. समाजाच्या वागण्या बोलण्यातून संपूर्ण समाज आणि देशाप्रती आपुलकीची भावना व्यक्त व्हावी, प्रत्येक घरात आठवड्यातून एकदा तरी पूजा किंव्हा धार्मिक कार्यक्रम व्हावा. कुटुंबातील सदस्यांचा सकारात्मक संवाद असावा. दैनंदिन वापरात पाण्याची बचत करून, प्लास्टिकचा वापर बंद करून झाडे लावून निसर्गाशी असलेले नाते टिकवून ठेवणे. स्वदेशीच्या आचरणाचा आग्रह धरावा. कायदा, सुव्यवस्था व नागरी नियमाचे पालन करावे. आपण आपल्या कुटुंबियांसह सेवा देणाऱ्या बांधवांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत चहापान करावे. आपण आपल्या या बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आपल्या कुटुंबात आमंत्रित करून त्याचा आदरसत्कार करावा. भारताला विश्वगुरू होण्यासाठी आपण सर्वानी या पंचपरिवर्तन बिंदूचे मूल्य जोपासले पाहिजे असे प्रतिपादन रा.स्व.संघ नाशिक विभाग सहकार्यवाह राजेश राव यांनी आपल्या मनोगतात केले.
येणाऱ्या काळात आपल्या नाशिक शहरामध्ये सामाजिक समस्यांचे, आव्हानाना सामना करण्यासाठी आपल्या सारख्या चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या सगळया संस्था, संघटना व्यक्ती यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. आपल्या संस्थेच्या संस्कार संघटनेचे जे कार्यक्षेत्र आहे जे आपले कार्यकर्ते आहे त्यांच्यापासून आपल्याला कामाची सुरवात करावी लागणार आहे. समाजाला देशभक्त बनविण्यासाठी कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्य, स्व-बोध या पंचपरिवर्तनाचे पालन करणे गरजेचे आहे. समाजातील मातृशक्ती अभिमानाने उभी राहिली पाहिजे असे प्रेरणादायी कार्य आपल्या माध्यमातून उभे राहिले पाहिजे. समविचारी संस्थांनी एकत्र येऊन विचारमंथन केले पाहिजे. बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला सक्षम बनविण्यासाठी प्रयन्त करणे. महिला सुरक्षितता, व्यसनमुक्ती, कुटुंब व्यवस्था, गोदावरी संवर्धन, स्वछता , पर्यावरण संवर्धन या विषयात काम करणे आवश्यक आहे. असे मत प्रमुख वक्ते रा.स्व.संघ पश्चिम प्रांत सहकार्यवाह महेश कर्पे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास रा.स्व.संघ नाशिक विभाग सहकार्यवाह राजेश राव, रा.स्व.संघ नाशिक शहर जिल्हा मा. संघचालक डॉ. विजयराव मालपाठक, जिल्हा कार्यवाह सुहास वैद्य, सह कार्यवाह रोहित गायधनी, रा.स्व.संघ नाशिक शहरजिल्हा सेवा विभाग प्रमुख अनिल पाटील, सह प्रमुख योगेश गर्गे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. प्राची बेलन यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.