जनजाती कल्याण आश्रमातर्फे म्हाडाच्या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन

२,००० जनजाती शेतकरी कुटुंबांना १० हजार फळझाडांचे वाटप; शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
नाशिक :
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या पुढाकारातून आणि जनजाती कल्याण आश्रम – ग्रामविकास आयाम, पश्चिम महाराष्ट्र यांच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या दुर्गम जनजाती भागातील सुमारे २,००० शेतकरी कुटुंबांना १० हजार फळझाडांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल जनजाती कल्याण आश्रम, नाशिक यांनी म्हाडाचे मनःपूर्वक अभिनंदन करत हा उपक्रम जनजाती समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.
जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, प्रांत सचिव श्री. शरद शेळके, पश्चिम महाराष्ट्र ग्रामविकास प्रमुख श्री. संजयभाई शाह तसेच श्री. धनंजय जामदार यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिवकुमार वर्मा यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेला हा उपक्रम दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबांना दीर्घकालीन आर्थिक आधार देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकरी कुटुंबाला पाच फळझाडे देण्यात आली असून केसर आंबा, चिकू आणि जांभूळ या उच्च दर्जाच्या रोपांचे वितरण करण्यात आले. या फळझाडांमुळे भविष्यात शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.
या उपक्रमाच्या नियोजनामध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते समाजसेवक श्री. चैत्रामजी पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच जनजाती कल्याण आश्रमाच्या ग्रामविकास आयामामार्फत दुर्गम गावांपर्यंत रोपे सुरक्षितपणे पोहोचविण्याचे नियोजन प्रभावीपणे करण्यात आले.
जनजाती कल्याण आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था यांच्यातील समन्वयातून जनजाती समाजाच्या विकासासाठी अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले गेले, तर स्वावलंबी आणि समृद्ध गावांची उभारणी करण्यास निश्चितच मोठी मदत होईल. म्हाडाने सामाजिक बांधिलकी जपत घेतलेला हा पुढाकार इतर शासकीय संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास कल्याण आश्रमाचे नाशिक जिल्हा ग्रामविकास प्रमुख श्री अजित गावित यांनी व्यक्त केला.