वर्षभरात १८,८४२ संघ स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पूर्ण
प्रांत प्रचारक बैठकीत जनसंख्या असंतुलन, अमली पदार्थांचा प्रभाव आणि राममंदिर दानचोरी प्रकरणावर चिंता

व्हीएसके वृत्तसेवा
बेलगावी (कर्नाटक), १३ जुलै २०२६ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक रविवारी कर्नाटक मधील बेलगावी येथे संपन्न झाली. या तीन दिवसीय बैठकीत देशभरातील जनसांख्यिकी असंतुलन (डेमोग्राफिक इमबॅलन्स), अमली पदार्थांचा वाढता प्रादुर्भाव आणि अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील दानपेटीच्या रकमेत झालेल्या कथित अनियमिततेच्या प्रकरणावर सखोल चर्चा करण्यात आली.
१०, ११ आणि १२ जुलै दरम्यान आयोजित या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांच्यासह देशभरातील २२६ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या समारोपानंतर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या संदर्भातील माहिती दिली.
- देशभर शाखा विस्ताराचा निर्धार; प्रशिक्षण वर्गांचा आढावा :
या बैठकीत मार्च २०२६ नंतर संघाच्या विविध स्तरांवर संपन्न झालेल्या प्रशिक्षण वर्गांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या वर्षी देशभरात एकूण ८३ 'संघ शिक्षा वर्ग' आणि १२ 'कार्यकर्ता विकास वर्ग' आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण १८,८४२ स्वयंसेवकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. या वर्गांमध्ये प्रामुख्याने शाखा संचालन, संघ कार्यपद्धती, ग्रामविकास, कुटुंब प्रबोधन, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
येत्या सप्टेंबर महिन्यात देशभरात व्यापक स्तरावर 'कमाल शाखा विस्तार योजना' राबवण्यावर बैठकीत एकमत झाले. तसेच संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमांची समीक्षा करण्यात आली आणि उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. या शताब्दी वर्षात संपर्कात आलेल्या नागरिकांना सामाजिक कार्यात आणि 'पंच परिवर्तन' (सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी आणि नागरिक कर्तव्य) या विषयांमध्ये सक्रिय करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. यासोबतच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वर्ष २०२६-२७ च्या देशव्यापी प्रवास योजनेलाही अंतिम रूप देण्यात आले.

- सामाजिक आव्हानांवर मंथन; जनसांख्यिकी असंतुलनावर चिंता :
बैठकीत देशासमोरील सद्यस्थिती आणि विविध आव्हानांवर महत्त्वपूर्ण मंथन झाले. आगामी जनगणनेच्या संदर्भातील सद्यस्थिती आणि देशातील वाढत्या जनसांख्यिकी असंतुलनामुळे निर्माण होणारी आव्हाने यावर बैठकीत विशेष चर्चा झाली. याशिवाय, तरुणाईमध्ये वाढणाऱ्या ड्रग्जच्या (अमली पदार्थ) विळख्याबद्दल संघाने तीव्र चिंता व्यक्त केली. समाज नशामुक्त करण्यासाठी प्राधान्याने विशेष प्रयत्न आणि मोहिमा राबवण्याची आवश्यकता लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी अधोरेखित केली. तसेच संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त देशभरात विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबतही या बैठकीत योजना आखण्यात आली.
- राम मंदिर दानपेटी गैरव्यवहारप्रकरणावर चिंता
अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी मंदिरात दानपेटीतील चढाव्याच्या (देणगी) मोजणीत झालेल्या कथित अनियमिततेच्या आणि गैरव्यवहाराच्या घटनेवर संघाने या बैठकीत तीव्र दुःख व्यक्त केले. तीर्थक्षेत्र न्यासाच्या (ट्रस्ट) तक्रारीवरून सध्या या प्रकरणाची जी विशेष तपास पथक (SIT) आणि पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे, ती कायदेशीर कारवाई लवकरच निर्णायक टप्प्यावर पोहोचेल, असा विश्वास संघाने व्यक्त केला. तसेच, भविष्यात अशी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे जगभरातील कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेला आणि आस्थेला तडा जाईल, याची कडक खबरदारी तीर्थक्षेत्र न्यासाने घ्यावी, अशी अपेक्षाही संघातर्फे या वेळी व्यक्त करण्यात आली