
शिवराज्याभिषेक दिन हा हिंदू साम्राज्य दिन, का आणि कसा...?
शिवराज्याभिषेक म्हणजेच खरं तर हिंदू साम्राज्य दिन आहे. पराभवाची एक दीर्घ परंपरा मोडून काढून हिंदू विजयाकांक्षी स्वभावाला 'स्वयमेव मृगेंद्रता' याची आठवण करून देण्यासाठी आजपासून ३५० वर्षांपूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी घडवलेला कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक. विजय साजरा करण्याची सवय मोडलेल्या हिंदू समाजात विजयी चैतन्य जागवण्यासाठी घडवून आणलेला चैतन्य जागरण कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक.
वडिलोपार्जित गादीवर वडिलांच्या नंतर वारसाहक्काने बसण्याचा एक तांत्रिक उपक्रम म्हणून हा राज्याभिषेक नव्हता. तर हिंदू सरदार असतील, फार तर मांडलिक असतील पण स्वघोषित राजा असू शकेल ? शक्यच नाही, हे उत्तर खोटे ठरवून दाखवण्यासाठी केलेला त्या सहस्त्रकातील सर्वात रोमांचकारी उपक्रम म्हणून या शिवराज्याभिषेकाचा आठव करावयाचा आहे. म्हणून एका अर्थाने हा हिंदू साम्राज्य उत्सव आहे.
म्हणून हा संपूर्ण भारत वर्षाने साजरा करण्याचा दिवस आहे. यात फक्त गडकोट, किल्ले किती जिंकले याचा हिशोब ठेवायचा नाही तर हिशोब ठेवायचा आहे शिवाजी महाराजांच्या उद्दिष्टांचा. जी उद्दिष्टे या शिवराज्याभिषेकात व्यक्त होतात. म्हणून शिवाजी महाराजांच्या कोणत्याही रणांगणातील पराक्रमापेक्षा राज्याभिषेक हा श्रेष्ठ पराक्रम आहे.
यात सप्त सिंधूंचे स्मरण आहे. काशी विश्वनाथ मंदिर मुक्तीचे स्वप्न आहे. धर्मपरावर्तनाच्या प्रक्रिया सुरू करायच्या होत्या. फक्त महाराष्ट्र ही सीमा नव्हती तर संपूर्ण देश हे स्वप्न होते. संस्कृत पुनर्जीवन हे उद्दिष्ट होते. हे सर्व जगासमोर मांडण्याचे व्यासपीठ म्हणजे शिवराज्याभिषेक होय. म्हणून शिवशाहीतील सुवर्ण क्षण म्हणून हा दिवस साजरा करू या.
शिवराज्याभिषेक अनन्यसाधारण महत्त्वाचा
सर्व भारतीयांचा आत्मसन्मान जागवणारा राज्याभिषेक म्हणून हा राष्ट्रीय महोत्सव आहे. सन १६६६ साली शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करून घेतली व १६६९ साली औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदीराला भ्रष्ट केले. त्यानंतरची शिवाजी महाराजांची कृती आम्हाला सांगते की शिवाजी महाराज संपूर्ण हिंदू समाजाचा विचार करत होते न की फक्त महाराष्ट्र वा मराठी माणसांचा. मी आपला सेवकच आहे म्हणत शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे तक्रार काय केली तर जिझिया कर रद्द करा. हिंदुंवरील अन्याया विरूद्ध तक्रार केली आहे. डोळ्यासमोर संपूर्ण हिंदू समाज आहे. म्हणून शिवराज्याभिषेक हा अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे व राष्ट्रीयत्वाचा अर्थ उलगडवणारा आहे.
शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले पण राजगडावर पोहोचे पर्यंत एका अर्थाने शत्रूच्या मुलखातुन येत होते व दिवसेंदिवस प्रवास करत होते. हे कसे जमले ? याचे उत्तर आहे, आपला आणि परका हा फरक जाणणारा हिंदू समाज या सर्व वाटेवर होता. औरंगजेब परका व शिवाजी महाराज आमचे हे कळणारा समाज हेच शिवाजी महाराजांचे संरक्षण कवच होते. म्हणून त्यांना विश्वास देण्यासाठी शिवराज्याभिषेक होता. संपूर्ण देश आपला सोहळा म्हणून राज्याभिषेक पहात होता.
संभाजीराजे थोडे थोडके नाहीत वर्षभर मथुरेत औरंगजेबापासून हाकेच्या अंतरावर रहात होते. हे कसे घडले ? कारण मथुरेतील हिंदूना आपला राजा संभाळायचा होता. मोरोपंत पिंगळे यांच्या बहिणीने सांभाळले पण अख्ख्या मथुरेच्या हिंदूंचा कोट होता.
आग्रा ते राजगड हा प्रवास फक्त युध्दस्य कथा रम्या नव्हत्या तर पराभूत देश असतानाही सांस्कृतिक राष्ट्र पूर्ण जाणीवांनिशी जिवंत होते याचे प्रतिक आहे. म्हणून हा प्रवास सांगतो शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ.
का शिवराज्याभिषेक साजरा करायचा तर शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट कळावे म्हणून. शत्रू-मित्र भाव कळावा म्हणून. सांस्कृतिक एकात्मता कळावी म्हणून.
अशावेळी महाराष्ट्रातील काही गणंग हा हिंदू सांस्कृतिक सण तारखेने करा असा आक्रोश करत असतात. भारतीय हिंदू समाज त्यांचे ऐकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी जर सर्व भारतीय गणना ही तिथीनुसार होत होती तर ती आजही शिवराज्याभिषेक दिन तिथीलाच साजरी व्हायला हवा ना? शिवराज्याभिषेक हा जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला झाला तर तो आजही तिथीनुसार साजरा व्हायला पाहिजे व होतो व होणार आहे. सरकारनेही तसे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र शासनाने अधिकृत शासननिर्णय काढून गेल्या वर्षीच रायगडावरील शासकीय राज्याभिषेक सोहळा हा तिथीनुसार होईल असे जाहीर केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासनाने बोधचिन्ह तयार केले. त्यातही 'ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी' हा तिथीचाच उल्लेख आहे. ६ जून या तारखेचा नाही. गेली तीन दशकाहून अधिक काळ रायगडावरील राज्याभिषेक हा तिथीनेच साजरा होत आला आहे.
महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे पण संस्कृती भक्षकांना विषयाचे गांभीर्य नासवायचे असते. संपूर्ण देश जो आनंद सोहळा करत असतो तो यांना विघ्न संतोषी म्हणून जातीयतेच्या विषात घोळायचा असतो. म्हणून हा हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवाद जागृती उपक्रम हिंदू समाज तिथी नुसारच साजरा करणार. शिवाजी महाराजांनी दास्याच्या मानसिकते विरुध्द जनमत उभे करण्यासाठी अभिषेक करुन घेतला. तसेच आजचा हिंदू सुद्धा इंग्रजी तारखेच्या गुलामी विरुद्ध सांस्कृतिक पंचांगानुसार तिथीनेच हिंदू साम्राज्य दिन साजरा करणार.
सुनील देशपांडे
(लेखक इतिहास, समाज, संस्कृती या विषयांचे अभ्यासक आणि ब्लॉगर आहेत.)