कोल्हापूरच्या रा.स्व. संघ कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात; रुग्णोपयोगी साहित्य केंद्राच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन

लोक उत्कर्ष समितीचा उपक्रम; माजी सैनिक शिवाजीराव पाटील व सहसंघचालक भगतराम छाबडा यांच्या हस्ते ध्वजारोहण
कोल्हापूर (प्रतिनिधी) :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येथील 'राजाभाऊ भोसले स्मृती भवन' कार्यालयात स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात पार पडला. लोक उत्कर्ष समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माजी सैनिक शिवाजीराव पाटील आणि संघाचे विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत ‘राजाभाऊ भोसले रुग्णोपयोगी साहित्य केंद्राच्या’ दुसऱ्या शाखेचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास निवृत्त पर्यवेक्षक संजय जाधव आणि प्राध्यापिका डॉ. शैलजा मंडले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात लोक उत्कर्ष समितीचे अध्यक्ष विद्यानंद देवधर यांनी समितीच्या सामाजिक कार्याचा व विस्ताराचा आढावा घेत नागरिकांना या कार्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. सेवा प्रमुख रवी मिसाळ यांनी रुग्णोपयोगी साहित्य केंद्राच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मिळणाऱ्या मदतीविषयी माहिती दिली.
- ‘सज्जनशक्तीच्या बळावर देशपुनरुत्थान’ ः
प्रमुख पाहुणे संजय जाधव यांनी, "समाजाला संघटित करून देशहितासाठी कार्यरत राहणे हीच संघाची कार्यपद्धती असून हे कार्य तळागाळापर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा म्हणाले, "संघाचे कार्य कामगार, शेतकरी आणि वनवासी अशा समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी पसरलेले आहे. पूर्वांचलासारख्या दुर्गम भागात संघाने सेवेच्या माध्यमातून एकात्मतेची भावना रुजवली, ज्यामुळेच आज पूर्वेकडील सात राज्ये भारताचा अविभाज्य भाग आहेत. समाजातील सज्जनशक्तीच्या आधारे देशाचे पुनरुत्थान करणे हेच संघाचे ध्येय आहे."
- उत्साही वातावरण अन् राष्ट्रभक्तीचा निनाद ः
विजय पुजारी यांनी पूर्ण 'वंदे मातरम्'चे गायन केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन कार्यवाह दीपक सांगलीकर यांनी केले, तर अनुप हळदीकर यांनी आभार मानले. या प्रसंगी लोक उत्कर्ष समितीचे उपेंद्र सांगवडेकर, सुनील पाटील, राम खांडेकर यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.