“सेवाव्रती भगिनी निवेदिता”
२८ ऑक्टोबर हा दिवस भगिनी निवेदिता यांची जयंती त्यानिमित्त
.भगिनी निवेदिता स्वामी विवेकानंदांच्या शिष्या पूर्वाश्रमीच्या मार्गारेट एलिझाबेथ नोबल एक समर्पित व्यक्तिमत्त्व... आयरिश कुटुंबात जन्म होऊन हि, रंगाने गोऱ्या असूनही भारतात येऊन ज्यांनी आपले आयुष्य भारतीय गोरगरीब, अशिक्षित, वंचित आणि पीडित लोकांच्या सेवेसाठी समर्पित केलं त्या “सेवाव्रती भगिनी निवेदिता”.
मूळच्या आर्यलंडच्या राहणाऱ्या. मार्गारेट एलिझाबेथ नोबल यांचा जन्म १८६७ सालचा ; वडील साम्युएल नोबल तर आई मेरी. त्यांचे वडील हे स्थानिक कॉलेजात प्रोफेसर होते. नोबल कुटुंब सुशीलता, सात्त्विकता आणि धर्मजिज्ञासा यासाठी पंचक्रोशीत विख्यात होते. अशा कुटुंबात मार्गारेट वाढत होती. मार्गारेटचं प्राथमिक शिक्षण मँचेस्टर इथं झालं तर महाविद्यालयीन शिक्षण चर्चतर्फे चालविण्यात येणाऱ्या हॅलिफॅकस महाविद्यालयात झाले. बालवयात स्वदेश प्रेम, जगातील विविध प्रश्न, त्यातून त्या त्या प्रदेशात निर्माण होणाऱ्या विचारसरणी यांची माहिती त्यांना वडिलांकडून कळत होती पण त्या काहीतरी शोधात असाव्या.
स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत भारतीय तत्त्वविचार मांडून स्वतःची छाप उमटविली त्यांची व्याख्याने ऐकायला मार्गारेट जाऊ लागली. तिला स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वविचारांचे आकर्षण वाटू लागले. एक आदर्श दार्शनिक म्हणून स्वामीजींकडे ती आदराने पाहू लागली. त्यानंतर तिचे आयुष्य कायमचे बदलत गेले. अनेक शंकांचे समाधान होत गेले. हिंदू धर्मातील तत्त्वे तिला, तिच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटत गेली. तिने गौतम बुद्धाची शिकवणही आत्मसात केली. ती जे शोधात होती ते तिला या भारतीय तत्व विचारात गवसले असावे आणि संपूर्ण विचारांती २८ जानेवारी १८९८ रोजी ती भारतात आली ती कायमचीच.
स्वामी विवेकानंदानी मार्गारेटला हिंदूधर्माची शिकवण दिली. समाजाप्रती कर्तव्याची जाण त्यांच्यात निर्माण केली. भारताच्या सेवेसाठी सज्ज झालेली मार्गारेट स्वामी विवेकानंदांची शिष्या “भगिनी निवेदिता” झाली. स्वामी विवेकानंदांनी भारतातील सेवेसाठी त्याना समर्पित होण्यासाठी मार्गदर्शन केले. ब्रह्मचर्याची शपथ दिली.
स्वामीजी ब्रह्मचारिणी दीक्षेपूर्वी निवेदितांना म्हणाले होते, “तुला अंतर्बाह्य ‘हिंदु’ व्हायला हवे ! ऐहिक निकडी, विचारधारणा आणि स्वभाव, यांचेही हिंदुकरण करायलाच हवे. त्यासाठी तुला स्वतःचा संपूर्ण भूतकाळ, त्यातील प्रत्येक घटना यांचा विसर पडायला हवा. संपूर्ण स्मृतिभ्रंश !”
स्वामीजीच्या सांगण्यावरून त्यांनी स्वत:ला अंतर्बाह्य बदलविले. हिंदू धर्म स्वीकारून हिंदू चालीरीती, पद्धती ग्रहण केल्या. संस्कृती व कला हे निवेदितांचे आस्थेचे विषय होते. भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करून त्याद्वारे समाज परिवर्तन आणि राष्ट्र जागरण करता येईल असे निवेदितांचे मत होते. ही साधना अवघड होती पण निवेदितानी आपलेपणाने ह्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि हिंदुस्थान हेच तिचे आजीवन कार्यक्षेत्र बनले.
भारतीय कलेतील प्राचीन परंपरा, पूर्णत्वाच्या कल्पना, यांच्याशी निवेदिता एकरूप झाल्या. या सर्वांचा अभिमान बाळगत त्यांनी स्वदेशी वस्तूंची गाडीतून फिरून विक्री केली. स्वामीजींच्या महानिर्वाणानंतर त्यांनी ‘उत्तिष्ठत जाग्रत…’ हा संदेश आठवून त्यांचेच कार्य पूर्ण करण्यासाठी जोमाने स्वतःला राष्ट्रकार्यात झोकून दिले. स्वामीजींचा संदेश हिंदुस्थानभर सांगण्यासाठी त्यांनी दौरेही केले. साहित्य आणि कला क्षेत्रातही निवेदितांनी स्वतःचा ठसा उमटवला.
त्यांनी १३ नोव्हेंबर १८९८ ला कलकत्त्यामध्ये शाळा सुरु केली. शाळेत अनेक प्रयोग त्यांनी केले. हि शाळा खास करून बाल विधवासाठी होती. महिलांचे कलागुण ओळखून त्यांनी शिवणकाम व इतर कित्येक कला शिकवल्या. सरकारने वंदे मातरम् गीतावर बंदी घातली, तेव्हा शाळेत दररोजच्या प्रार्थनेत वंदे मातरम् गीत सुरू केले.
सेवाव्रती निवेदितांनी सेवा कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. कोलकाता शहरात 1899 मार्च मध्ये प्लेग पसरला. निवेदितांनी तेथे वैयक्तिकरित्या झोपडपट्ट्यांची साफसफाई सुरू केली. स्थानिक तरुणांना त्याची लाज वाटू लागली आणि त्यांनीही त्यांच्याबरोबर रस्त्यांची साफसफाई सुरू केली. स्वत:चे आरोग्य,सुरक्षितता इ.ची काळजी न करता त्यांनी रुग्णांची सेवा केली.
निवेदितांच्या सेवेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या डॉक्टर राधा गोबिंदाकर यांनी लिहिले की, "मागे मी बाजारपेठे जवळच्या झोपडपट्टीत गेले. त्यावेळी मला निवेदिता मांडीवर एक लहान मुलीसह झोपडीच्या ओल्या जागेत बसलेल्या दिसल्या. तेथे त्या रात्रंदिवस त्या मुलीची सेवा करीत होत्या. एका शिडीच्या सहाय्याने झोपडीच्या भिंतीदेखील त्यांनी तेथे साफ केल्या. पुढे दोन दिवसानंतर ती मुलगी निवेदितांच्या मांडीवरच मरण पावली." त्यांच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या. .
1906 मध्ये पश्चिम बंगालमध्येही दुष्काळ आणि पुराने हाहाकार माजला होता. त्या काळात निवेदितांनी अनेक गावात पाण्यात जाऊन लोकांची सेवा केली. अनेक स्त्रियांच्या मनामध्ये या संकटातही त्या आशा निर्माण करत परीणामतः त्या सर्व निवेदितांना आपली बहीण मानत. एका गावातून दुसर्या गावी जेव्हा त्या जात, तेव्हा गावातील सर्व स्त्रिया त्यांना बोटीपर्यंत सोडायला येत असत.
१८९८ मध्ये भारतात आलेल्या भगिनी निवेदिता यांनी १३ ऑक्टोबर १९११ रोजी वयाच्या ४४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. केवळ १२-१३ वर्षं त्यांनी भारतात केलेले सेवाकार्य आज १०० वर्षानंतर हि स्मरणात आहे हीच त्यांच्या कार्याची महत्ता म्हणता येईल.
निवेदितांच्या कार्याचे विविध अंग पाहिल्यावर जाणवते की, या प्रत्येक अंगात त्यांनी प्रत्येक वेळी नव्याने समर्पण केले होते.
“व्हावे जीवन यज्ञ समर्पण समिधा मय हि काया साधन” या उक्तीनुसार या “सेवाव्रती भगिनी निवेदिता” यांनी आपल्या जीवन रुपी देहाच्या समिधा भारतभूमी साठी समर्पित केल्या.
विनम्र अभिवादन
- सौ. अपर्णा नागेश पाटील – महाशब्दे
९८२३७६६६४४