•  23 May 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

स्वाभिमानी लढवय्या राघोजी भांगरे

विश्व संवाद केंद्र - पुणे 23 days ago
दिन विशेष   व्यक्तिविशेष  

वाघाचा जबडा फाडणारा पराक्रमी

अकोले तालुक्यातील देवगाव हे दोनशे ते तीनशे लोकांचे गाव असेल. शोण नदीच्या किना-यावर वसलेल्या महाकाळ डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेकडील या गावात ८ नोव्हेंबर १८०५ रोजी रामजी व रमाबाई यांच्या पोटी राघोजी भांगरे यांचा जन्म झाला. त्या काळातील जव्हारच्या मुकणे संस्थानच्या राजूर प्रांताचे रामजी सुभेदार होते. सुभेदाराच्या घरात थोरल्या मुलीनंतर मुलाचा जन्म झाल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राघोजीवर लहानपणापासून चांगले संस्कार करण्याकडे घरातील सर्वांचे खास लक्ष्य होते. त्याकाळात गावात शिक्षणाची सोय नसतानाही राघोजीसाठी खास घरी शिकण्याची सोय करण्यात आली होती. खेळण्याबागडण्याच्या वयात राघोजी तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालवणे, बंदुकीने निशाणा साधने, घोडेस्वारी शिकून तरबेज झाली. त्यांच्या अंगातील धाडसी गुण लहानपणीच गावकऱ्यांना दिसून येत होते. लहानपणापासून राघोजीला व्यायामाची आवड होती. त्यामुळे त्याचे शरीर सुदृढ होते. महाकाळ डोंगराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल होते. विविध प्रकारचे पक्षी व प्राणी या जंगलात वास्तव्य करत होते. एकदा राघोजी शिकारीसाठी आपल्या काही सोबत्यांना घेऊन गेला होता. रानात फिरता फिरता त्यांना वाघ दिसला. आपल्या बंदुकीचा चाप ओढून राघोजीने गोळी झाडली. परंतु यांच्या पायांच्या आवाजाने सावध झालेल्या वाघाने ती गोळी चुकवली. ती गोळी वाघाच्या मानेजवळ चाटून गेली. जखमी झालेला वाघ चवताळला व त्याने परत हल्ला करत राघोजीवर झेप घेतली. अंगावर चालून आलेल्या वाघाला घाबरून न जाता अतिशय सावधरीतीने वाघावर प्रतिहल्ला केला. दोघांमध्ये धरपकड सुरू झाली. काही क्षणात राघोजीने वाघावर आपले वर्चस्व सिद्ध करत त्याचा खालचा जबडा एका हाताने व वरचा जबडा एका हाताने धरून फाडला. रक्ताच्या थारोळ्यात वाघ जागेवर पडला होता. राघुजीच्या या धाडसी पराक्रमाचे कौतुक सर्व परिसरातील लोक करू लागले होते.

वडिलांच्या अनुपस्थितीत राघोजी भांगरे आपल्या गावात पोलीस पाटील या पदाचा कारभार चालवीत होता. गावातील भांडणे मिटविणे, न्याय निवाडा करणे, गावचा महसूल गोळा करून तो सरकारच्या तिजोरीत जमा करणे अशी कामे तो करत होता. आपल्या वडिलांचे राजूर प्रांताचे पद जाऊन त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्याची सल त्यांच्या मनाला सतत बोचत होती. आपल्या चोख कारभारामुळे राजूर पोलीस ठाण्यात राघोजीला इतरांपेक्षा अधिक मान होता. सुमारे एक वर्षापासून रिक्त असलेल्या राजूर प्रांताच्या पोलीस अधिकारी पदासाठी राघोजीने अर्ज केला. या अर्जात त्याने माझ्या वडिलांचे पद मलाच मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी केली होती. परंतु सरकारने ही मागणी फेटाळून लावली.

कोकणामध्ये एक दिवस मोठा दरोडा पडला. या दरोड्यात राघोजी भांगरे यांचा हात असल्याचा खोटा अभिप्राय अमृतराव कुलकर्णी यांनी सरकारला पाठवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरता तपास न करता राघोजीला तातडीने अटक करण्याचा आदेश दिला. त्या आदेशानुसार अमृतराव कुलकर्णी यांनी आपल्या हवालदारास राघोजीला नोटीस बजावण्यास सांगितले. आपल्यावरील खोट्या आरोपाची माहिती राघोजीच्या कानावर पडताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. राघुजीच्या मनातील घालमेल ओळखून देवजी नाना यांनी त्यास पोलिसांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला. या दगाबाज इंग्रज सरकारला धडा शिकवायचा असा बेत मनात आखून राघोजी दुस-या दिवशी राजूर पोलीस स्टेशनला हजर झाला. आपल्यावरील खोट्या आरोपाचा जाब विचारायला लागल्यावर पोलीस अधिकारी राघोजीला कायद्याची भीती दाखवू लागले. या दरम्यान राघोजी व अमृतराव कुलकर्णी यांच्यात बाचाबाची झाली. याचे रूपांतर शेवटी झटापटीत झाले. वाघाशी दोन हात करणारा राघोजी पुरता पेटून उठला होता. त्याने एका झटक्यात साहेबाचं नरडं दाबून त्याला मारून टाकलं. राघोजीचा असा अवतार पाहून बाकीचे हवालदार कधीच पळून गेले होते. परत फिरताना राघोजीने पोलीस स्टेशनमधील सात रायफली व काडतुसांची पेटी हातात घेतली. इंग्रजांनी केलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी राघोजी सज्ज झाला होता. येथून पुढचा प्रवास अधिक संघर्षमय असेल याची जाणीव त्याला झाल्याने त्याने आईचा आशीर्वाद घेऊन घर सोडले व बाडगीच्या घनदाट जंगलाचा रस्ता धरला. यावेळी त्याच्यासोबत तरणाबांड तुफान ताकदीचा नेमबाजीत पटाईत असलेला शूर लढवय्या राया ठाकर होता. तसेच देवजी आव्हाड यांचे मोलाचे मार्गदर्शनही लाभत होते.

राघोजी भांगरे याचे संघटन कौशल्य खुपच चांगले व त्याच्या कार्याची जाणीव सर्वांना असल्याने आठ दिवसात मुळा खोरे, चाळीसगाव डांगाण म्हणजे प्रवरा खोरे, बारागाव पठार म्हणजे प्रवरा खोरे या परिसरातून विविध जाती जमातीचे अनेक तरुण त्यांना येऊन मिळाले. अन्यायी, अत्याचारी सरकार, सावकार, जमीनदार यांच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राघोजीच्या नेतृत्वाखाली सर्वजण करू लागले. जंगलात राहून वेळप्रसंगी भाजी-भाकरी, चटणी खाऊन, तर कधी उपाशी पोटी जनसंपर्क करत होते. सरकारवर विसंबून राहू नका, सरकारला कोणताही कर भरू नका...तुमचा कर राघोजीला द्या...तो तुम्हाला मदत करील असे आवाहन सगळीकडे करण्यात येऊ लागले. अगोदरच सावकारांच्या जाचाला व इंग्रजांच्या अन्यायी धोरणाला वैतागलेले सामान्य लोक न्याय मागण्यासाठी राघोजीकडे येऊ लागले. गावोगावी फिरून राघोजींनी महादेव कोळ्यांची संघटना उभी केली, शस्त्रे जमा केली आणि विजयादशमीच्या दिवशी हिवाळ्या घाटाच्या खोल दरीत सर्वांचे एकत्रीकरण केले. प्रत्येकी 50 सैनिकांच्या 15 तुकड्या केल्या, प्रत्येक तुकडीला प्रमुख अधिकारी नेमले, महाड पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत भाग ठरवून जबाबदार्या दिल्या आणि स्वतःचे राज्य घोषित केले. इंग्रजांवर हल्ले, पोलिसांवर हल्ले, सावकारांचे खजिने लुटणे, फितुरांवर हल्ले असे धाडसी कार्य सुरू झाले. इंग्रजांना पुण्याला पळून जाणे भाग पाडले. राघोजी छ. शिवाजी महराजांना आदर्श मानणारे होते. ते हरिश्चंद्र गडावरील शंकराचे ,त्र्यंबकेश्वराचे,जेजुरीच्या खंडोबाचे आणि पंढरपूरच्या विठोबाचे भक्त होते. सामान्य जनतेवर प्रेम करणारे होते आणि म्हणूनच सर्वांचे त्यांच्यावर प्रेम होते. जव्हारच्या मुकणे राजांची, सुरगाण्याच्या पवार राजांची आणि साताऱ्याच्या छत्रपतींची त्यांना साथ होती. राघोजी भांगरे यांच्या कार्याचा प्रभाव वाढत असताना इंग्रज सरकारच्या समोर त्याला रोखायचे कसे याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, प्रसंगी बक्षिसांचे आमिष दाखवले, परंतु कोणीही राघोजीचा ठावठिकाणा सांगण्यास पुढे येत नव्हते. यामुळे इंग्रज अधिका-यांसाठी पेच प्रसंग निर्माण झाला होता. अनेकदा राघोजीला पकडण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळ्या तुकड्या पाठवल्या. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी अपयश आले. या प्रकारामुळे आलेली नामुष्की पचविणे इंग्रज अधिका-यांना जड जाऊ लागले होते. त्यांनी आता राघोजीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अत्याचारी पवित्रा अवलंबिला होता. राघोजीच्या घरातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. बाया माणसांच्या वक्षस्थळांना टिप-या लावल्या. वारंवार राघोजीच्या घरी धाडी घातल्या. तरीही हाती काही लागत नसल्याने शेवटी त्याची आई रमाबाईला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिच्या अंगावर चाबकाचे फटके मारले. तिच्यावरही शक्य तितके क्रूर अत्याचार केले. परंतु आई रमाबाई डगमगली नाही. तिने इंग्रज अधिका-यांना त्यांच्या अन्यायी वागण्याबद्दल खडे बोल सुनावले. गावागावात जाऊन महादेव कोळी व ठाकर समाजातील लोकांना छळण्यात आले परंतु त्याचा काहीही एक फायदा इंग्रजांना झाला नाही.

राघोजीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी एक दिवस इंग्रजांनी बितनगडाच्या पायथ्याशी असणा-या बितींगा या गावातील बुधा पेढेकर याच्या घरी धाड टाकली. बुधा हा राघोजीचा खास मित्र असल्याची टीप कोणीतरी इंग्रजांना दिली होती. राघोजी राहत असलेली जागा दाखवून देण्यासाठी बुधाला मोठ्या रकमेचे आमिष दाखविण्यात आले. जर त्याने जागा दाखविण्यास नकार दिला तर गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. अशा परिस्थितीत बुधा डगमगला नाही. त्याने क्षणभर मनात विचार केला व जागा दाखविण्याची सहमती दर्शविली. त्या सर्व इंग्रज शिपायांना व अधिका-याला घेऊन तो गडाच्या उंच कड्यावर गेला. तेथून त्याने राघोजी या कड्याच्या एका गुहेत राहत असल्याची माहिती दिली. इंग्रजांनी त्या गुहेपर्यंत जाण्याचा मार्ग कोणता असा प्रश्न करताच बुधा पेढेकर याने त्या कड्यावरून उडी मारून आपला जीव संपवला. राघोजी भांगरे याची माहिती इंग्रजांना मिळू नये म्हणून बुधाने आपल्या प्राणाची आहुती दिली होती.

राघोजीच्या पराक्रमाची माहिती हळूहळू आता मावळ मुलुखाच्या बाहेर जाऊ लागली होती. राघोजीने हाती घेतलेले स्वातंत्र्याचे कार्य सातारचे राजे प्रतापसिंह भोसले यांना खूप आवडले होते. इंग्रज सरकारने कपट कारस्थाने करून भारतातील अनके संस्थाने खालसा केली होती. साता-याचे संस्थान देखील असेच खालसा केल्याने राजे प्रतापसिंह दुखावले गेले होते. त्यांनी आपल्या खाजगी गुप्तहेरामार्फत राघोजी भांगरे यांना खलिता पाठवून साता-याला भेटीला येण्याचे आमंत्रण दिले. निरोप मिळताच राघोजीने साता-याला जाऊन राजे प्रतापसिंह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराजांनी राघोजीला दोनशे पन्नास घोडे, हत्यारे, बंदुका, तलवारी, भाले आदींची भेट देऊन मोठ्या सन्मानाने बोळवण करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. राघोजी भांगरे यांची ताकद व दरारा आता अधिक वाढला होता. आज पर्यंत इंग्रजांशी छुप्या मार्गाने आपण लढत आलो आहोत, आता समोरासमोर दोन हात करण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली होती. सन १८४५ मध्ये चार जिल्ह्यांचे कलेक्टर, गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट व राज्यपाल एलफिंस्टन यांना जुन्नर येथे आपण जाहीर उठाव करणार असल्याचे पत्रही पाठविले. सदर उठाव मोडीत काढण्याचे आवाहनही त्याने पत्रांतून इंग्रज सरकारला केले होते. जुन्नर ही त्या काळात एक महत्त्वाची बाजारपेठ असल्याने इंग्रजांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले होते. या उठावाला सामोरे जाण्यासाठी व राघोजीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी धूर्त व धाडसी अधिकारी कॅप्टन मॅकींतोष(Mackintosh )याच्यावर सोपविण्यात आली.

जुन्नरच्या बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास केला व हा उठाव कसा रोखायचा व राघोजी कसा जाळ्यात अडकावायचा याचे नियोजन केले. यासाठी सोबत त्याने दहा हजारांची फौज व तोफखाना घेतला होता. तिकडे राघोजीकडे फक्त दोन हजार सैनिक होते. शेवटी ठरलेला दिवस उगवला. राघोजी भांगरे व त्याच्या सर्व साथीदारांनी जुन्नरच्या बाजारपेठेत 'हर हर महादेव'ची गर्जना करत प्रवेश केला. कॅप्टन Mackintosh ने जुन्नरला बाहेरून वेढा दिला व राघोजी भांगरे आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. दोन्ही सैन्य समोरासमोर येताच एकच लढाई सुरू झाली. राघोजीचे मावळे आपले सारं देहभान हरपून लढत होते. एकीकडे कॅप्टन Mackintoshची फौज कमी कमी होत होती तर दुसरीकडे राघोजीचे शंभर एक मावळे शिल्लक राहिले होते. देवजी आव्हाड यांनी वस्तुस्थितीचे भान राघोजीच्या लक्षात आणून दिले. ऐंशी टक्के फौज कामी येऊनही कॅप्टन Mackintoshच्या हाती राघोजी भांगरे लागला नव्हता. जुन्नरच्या बाजारपेठेचा फायदा उठवत तो सहीसलामत बाहेर पडला होता. जुन्नरच्या उठावात मोठ्या प्रमाणात साथीदार गमावल्याने राघोजी दुखी झाला होता. आता भूमिगत राहून काम करण्याचा निर्णय घेतला. राया ठाकर व देवजी आव्हाड यांच्या सोबत त्याने गोसाव्याचे रूप धारण केले. मावळ प्रांतात गावोगावी फिरून लोकांना जागृत करण्याचे काम करू लागले. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रजांनी दहा हजार रुपये व गाव ईनाम देण्याची घोषणा केली होती.

महानायक राघोजी फिरता फिरता पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनाला पोहचला. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. बारीत उभे असताना दुरून एक पोलीस राघोजीचे निरीक्षण करत होता. राघोजीचे मात्र त्या पोलिसाकडे लक्ष्य नव्हते. पोलिसाला दर्शन रांगेत राघोजी भांगरे उभा असल्याची खात्री पटली. क्षणाचाही विलंब न करता त्याने कॅप्टन गिलला निरोप दिला. त्यावेळी गिलची नेमणूक तिथेच होती. निरोप मिळताच कॅप्टन गिल शेकडो पोलिसांना घेऊन मंदिरात हजर झाला. सर्वांनी राघोजीला वेढा दिला व त्याच्याकडे बंदुका रोखल्या. राघोजी निशस्त्र असल्याने तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. साखळदंडात कैद करून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात राघोजीला ठाण्याच्या कारागृहात आणण्यात आले. त्याच्यावर खटला भरण्यात आला. राघोजी भांगरे याच्या कोणत्याही मताचा विचार न करता एकतर्फी निकाल घोषित करण्यात आला. दुर्दैव म्हणजे राघोजीला वकील मिळू नये म्हणून येथीलच उच्च वर्णीय लोकांनी प्रयत्न केले होते. कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा जाहीर केली. राघोजीला फाशी देण्यापूर्वी वरिष्ठ इंग्रज अधिका-यांनी राघोजी भांगरे हा एक महान, शूर, लढवय्या, धाडसी वीर असल्याने त्याचे तैलचित्र काढून कारागृहात लावण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाला देखील येथील उच्च वर्णीय लोकांनी हाणून पाडले. फाशीपूर्वी राघोजीला शेवटची इच्छा विचारण्यात आली.

  "फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने एकदम वीर पुरुषासारखे मरण द्या"

असे त्याने इंग्रज अधिका-यांना ठणकावून सांगितले. शेवटी दि. २ मे १८४८ रोजी ठाणे येथील कारागृहात राघोजीला फाशी देण्यात आली. अशा प्रकारे हसतहसत सह्याद्रीचा वाघ आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी हुतात्मा झाला.

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा

( संदर्भ –स्वतंत्रता लढ्यातील जनजातींचे योगदान )


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • स्वाभिमानी लढवय्या राघोजी भांगरे
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (34), सामाजिक (72), माध्यमे (15), रा. स्व. संघ आणि परिवार (23), संस्कृती (22), जनजाती (7), महिला (9), उद्योग (2), शिक्षण (9), विज्ञान (4), हिंदुत्व (20), कम्युनिझम (2), राष्ट्रीय संरक्षण (9), इस्लाम (8), कला (2), राजकारण (5), सेवा (8), साहित्य (2), कृषी (1), पर्यावरण (4), क्रीडा (2), ख्रिस्ती पंथ (2),

दिनविशेष

trending

स्मरण देवर्षी नारदांचे ! समाजहितैषी संज्ञापक तत्त्वांचे !!

स्मरण देवर्षी नारदांचे ! समाजहितैषी संज्ञापक तत्त्वांचे !! - देवर्षी नारद हे...
विद्याधर ताठे 10 दिवसांपूर्वी

 दिन विशेष
Read more

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.