पुणे, दिनांक १ मे २०२५ ः ज्ञान, विज्ञान आणि संस्कारांचा समृद्ध खजिना संस्कृत भाषेत उपलब्ध आहे. त्यामुळे लहान वयापासूनच त्यांना संस्कृतचे शिक्षण दिले, तर त्यांची कौशल्या आणि सुप्त गुणांचा विकास होईल, असे मत शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांनी मांडले.
गुरुवारी (दिनांक १) सायंकाळी डी. ई. एस्. सोसायटीच्या गणेश सभागृहात 'प्रथमकक्षातः संस्कृतशिक्षणम्' या प्रकल्पांतर्गत आयोजित छात्रकौतुक कार्यक्रमात ते बोलत होते. "उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि" या संस्कृत सुभाषिताचा अर्थ स्पष्ट करत काठमोरे यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी आणि उपस्थित पालकांशी संवाद साधला.
डॉ. माधव केळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पाल्यास संस्कृत शिकवण्याऱ्या पालकांची दूरदृष्टी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे, अशा शब्दांत कौतुक केले. केळकर म्हणाले, "इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षा लेखनाची माध्यम भाषा संस्कृत असावी, असा आग्रह विद्यार्थी आणि पालकांनी धरला पाहिजे. असे झाले तर विद्यमान शिक्षण पद्धतीमध्ये तो एक मैलाचा दगड ठरेल." भविष्यात भारतीय ज्ञान विज्ञान परंपरेच्या आधारे अध्ययन अध्यापनातील बदलांकडे केळकर यांनी लक्ष वेधले. तसेच संस्कृतचे भाषा म्हणून शिक्षण बालवयातच व्हायला हवे ही बाब देखिल अधोरेखित केली.
कार्यक्रमात प्रारंभी विद्यार्थ्यांचे प्रतिभाप्रदर्शन कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून सूत्रसंचालन, कथाकथन, गीतगायन करुन उपस्थितांची मने जिंकली. संस्कृतभारती पश्चिम महाराष्ट्र प्रान्ताचे अध्यक्ष कर्नल् सतीश परांजपे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. संस्कृतभारती पश्चिम महाराष्ट्र प्रान्तमन्त्री विनय दुनाखे, विद्यालय शिक्षण प्रमुख नितीन तारे, पुणे महानगर मंत्री डॉ. ओंकार जोशी यांच्यासह अनेक संस्कृतप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
'प्रथमकक्षातः संस्कृतशिक्षणम्' या प्रकल्पाच्या संयोजिका मुक्ता आशुतोष मराठे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्पाचा उद्देश, आजवरचा प्रवास आणि आगामी ध्येयधोरणे यांचा आढावा मांडला. सूत्रसंचालन अतुल म्हस्के यांनी केले, तर आभार सुवर्णा बोरकर यांनी मानले.